#MeToo मोहिमेला एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्यामुळे बळ - प्रिया रमाणी

कथित लैंगिक छळवणूक प्रकरणी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

काँग्रेस आणि समाजवादी पक्षांने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राजकारण्यांसह सर्वांवरच झालेल्या आरोपांची चौकशी होण्याची गरज असल्याचं मनेका गांधी यांनी म्हटलं होतं.

अकबर यांनी एक पत्रक जारी करून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

"माझ्यावर झालेल्या आरोपांविरुद्ध मी कोर्टात वैयक्तिक पातळीवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मी पदावर राहणंही योग्य नाही. त्यामुळे मी परराष्ट्र राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे. या देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानतो."

अकबर यांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेत त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या प्रिया रमाणी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

प्रिया रमाणी यांनी ट्विट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. "या राजीनाम्यामुळे महिलांच्या मोहिमेला बळ मिळालं आहे, आता कोर्टाकडून न्याय मिळण्याच्या मी प्रतिक्षा करत आहे."

अखेर 2 आठवड्यांनंतर राजीनामा, 20 महिलांचं शौर्य फळाला आलं आहे, असं पत्रकार बरखा दत्त यांनी ट्विट करून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

"लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांच हे यश आहे," अशी प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान छेडछाड करण्याचा आरोप केला होता.

त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकींच्या घटनांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीबाबत महिला आता समोर येऊ लागल्या आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीचं वर्णन करत आहेत. इतकंच नाही तर या दुर्व्यवहारात सामील असलेल्या पुरुषांचे नावही जाहीर करत आहेत.

प्रसारमाध्यमांशी निगडित अनेक महिलांनी या प्रकरणी ट्वीट केलं आहे. ज्या पुरुषांनी हे कृत्य केलं त्यांच्याबरोबर झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

याच साखळीमध्ये पुर्वाश्रमीचे पत्रकार आणि सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेले एम. जे. अकबर यांचंही नाव आलं होतं.

अकबर यांनी द टेलिग्राफ आणि द एशियन एज या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केलं आहे. त्याच काळात त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत. यात अनेक तरूण मुलींचा सहभाग आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रिया रामाणी यांनी सोमवारी पहिल्यांदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. वर्षभरापूर्वी व्होग या मासिकात लिहिलेला लेख रिट्वीट करत त्यांनी त्यात अकबर यांचा उल्लेख केला. त्या लेखात त्यांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या पहिल्या अनुभवाबद्दल लिहिले होते.

आजवर ज्या पुरूषांवर लैंगिक छळवणुकीचे आरोप झाले आहेत. त्यांच्यात कॉमेडिअन, पत्रकार, अभिनेते, लेखक, चित्रपटकर्ते यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये अकबर सर्वांत मोठया पदावर आहेत.

एम.जे. अकबर कोण आहेत?

ज्येष्ठ पत्रकार एमजे अकबर 2014 लोकसभा निवडणुकांपुर्वी भारतीय जनता पक्षाचा भाग झाले.

2015 मध्ये एमजे अकबर झारखंड मतदारसंघातून राज्यसभेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले.

एकेकाळी राजीव गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे एमजे अकबर 1989 मध्ये बिहारच्या किशनगंजमधून लोकसभेवर निवडून आले होते.

राजीव गांधी पंतप्रधान असताना एमजे अकबर त्यांचे प्रवक्ते होते.

ते 1991 मध्ये ते पुन्हा निवडणुकीत उतरले. मात्र त्यावेळी ते जिंकून येऊ शकले नाहीत. त्यानंतर ते पुन्हा पत्रकारितेत परतले.

#MeToo काय आहे?

#MeToo ही लैंगिक छळवणुकीच्या विरोधातली एक मोहीम आहे. या हॅशटॅगचा आधार घेत लैंगिक छळवणुकीला बळी पडलेले (विशेषत: कामाच्या ठिकाणी) लोक आपली व्यथा मांडत आहेत.

या अभियानामुळे त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बरीच मदत झाली आहे.

मागच्या वर्षी हॉलिवुड दिग्दर्शक हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळवणुकीचा आरोप केल्यावर या अभियानाने जोर पकडला.

त्यात सामान्य लोकांसकट अनेक प्रसिद्ध लोकांची नावं समोर आली आहेत. वाईनस्टीन यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.

भारतातल्या #MeToo चळवळीची लाट

भारतात या सगळ्या प्रकरणांची सुरुवात खरंतर कॉमेडिअन उत्सव चक्रवर्तीवर एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे झाली. या महिलेने ट्वीट करत आरोप केला की त्याने तिच्याकडे तिच्या नग्न छायाचित्रांची मागणी केली.

त्याबरोबरच उत्सवने स्वतःच्या गुप्तांगाचा फोटो संबंधित महिलेला फोटो पाठवला.

त्यानंतर अनेक महिलांनी आपल्याबरोबर झालेल्या घटनांची सोशल मीडियावर वाच्यता करण्यास सुरुवात केली.

पत्रकार संध्या मेनन यांनी ट्वीट करून एकेकाळी तिचे वरीष्ठ राहिलेले संपादक आर. श्रीनिवासन यांच्यावर आरोप केले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)