You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘सॅक्रेड गेम्स’ वादात राहुल गांधींची उडी, म्हणे 'गळचेपी करणं हा भाजप-संघाचा स्वभाव'
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'नेटफ्लिक्स'च्या 'सॅक्रेड गेम्स' या सिरीजवरून नवा वाद उफाळून आला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य या सीरिजमध्ये केल्यानं काँग्रेस पक्षात नाराजी आहे.
दिवंगत पंतप्रधानांबद्दल चुकीची आणि वादग्रस्त विधानं या सीरिजमध्ये असल्याचा आरोप करत काही काँग्रेस नेत्यांनी रीतसर तक्रारही दाखल केली आहे. पण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे येत या सीरिजला पाठिंबा दिला आहे. आपापली मतं मांडण्याचं प्रत्येकाला अधिकार असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे.
या सीरिजमधल्या एका मुख्य पात्रानं राजीव गांधी 'फट्टू' (भित्रे) असल्याचं म्हटलं आहे. तसंच, बोफोर्स प्रकरण आणि शाह बानो प्रकरणांतील त्यांच्या भूमिकेवरून त्यांना लक्ष्यही केलं आहे.
IANS वृत्तसंस्थेच्या एका बातमीनुसार, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)चे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात या सीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, "नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेल्या 'सॅक्रेड गेम्स' सीरिजमधल्या चौथ्या एपिसोडमध्ये प्रमुख भूमिका असलेला नवाझुद्दीन सिद्दीकी माजी पंतप्रधान राजीव गांधींना फट्टू म्हणाला आहे. त्यामुळे माझ्या या तक्रारीवरून नेटफ्लिक्स, निर्माते, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात यावा."
त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील काँग्रेस समितीचे सदस्य राजीव कुमार सिन्हा यांनी देखील कोलकाताच्या गिरीश पार्क पोलीस ठाण्यात या वेब सीरिज विरोधात तक्रार दाखल केली आहे. "या सीरीजने फक्त माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल वाईट विधानच केलं नसून त्यामुळे भारतीय सिने क्षेत्राचा दर्जा ढासळला आहे," असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
भाजपनंही या संधीचा फायदा घेत या प्रकरणात अजून हवा भरण्याचं काम केलं आहे. भाजपच्या IT विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्यासाठी या सीरिजमधले ठराविक सीन ट्वीट केले आहेत.
दरम्यान, आपल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीरीजला पाठिंबा व्यक्त केला आहे. प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा मूलभूत अधिकार असल्याचं गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी म्हणाले, "भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना मत व्यक्त करण्याचा मूलभूत अधिकार दाबण्यात आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात अधिक रस असतो."
ते पुढे म्हणाले, "माझे वडील (राजीव गांधी) हे आयुष्यभर केवळ भारताच्या सेवेसाठी झटले. त्यामुळे एखाद्या वेब सीरिजमधलं काल्पनिक पात्र आपले विचार व्यक्त करून हा इतिहास बदलू शकत नाही."
गांधी यांच्या या विधानाचं अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यासह सीरिजचे निर्माते-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही कौतुक केलं आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली, राहुल गांधींसारखे मुख्य प्रवाहातले राजकारणी इतक्या स्पष्टपणे हा पुरोगामी विचार मांडत आहेत, हे पाहून आनंद झाला. ते लोकशाही अधिकारांसाठी वैयक्तिक मत बाजूला सारत आहेत, यावरून त्यांची परिपक्वता कळते."
तक्रारींनंतर सॅक्रेड गेम्सवर प्रतिबंध येणार का, असा विचार सीरिजचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मनात आला असावा. पण राहुल गांधी यांच्या ट्वीटमुळे त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, गांधींच्या या भूमिकेचं सर्व स्तरांवरून स्वागत करण्यात आलं.
पण अनेकांनी काँग्रेसच्या सत्तेदरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, ते क्षण राहुल गांधींच्या निदर्शनास आणून दिले.
आणि काहींनी तर आणीबाणीचीच आठवण करून दिली. दिलीप कुमार यांनी ट्वीट केलं, "जेव्हा तुमच्या आजींनी आणीबाणी लागू केली होती, तेव्हा तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं? तेव्हा लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा नव्हती आली का? आधी इतिहास नीट वाचा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)