You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिरा रोड : अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा इशारा
मिरा रोड येथील नया नगर भागातील अतिक्रमण पालिकेकडून हटवण्यात आलं. बुलडोझरच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटवलं गेलं.
पोलिसांच्या संरक्षणात महानगर पालिकेनी ही कारवाई केली.
22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलला प्रतिष्ठापना कार्यक्रम होता.
त्याआधी, वाहनांवर 21 जानेवारीला रात्री मिरा रोड येथून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक झाली होती. या प्रकरणी 13 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली आहे.
नया नगर भागातील हैदरी चौकात ही कारवाई करण्यात आली. या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्याचेही सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला अनधिकृत शेड तयार करण्यात आल्या होत्या. त्या 15-20 शेड बुलडोझर फिरवून तोडण्यात आल्या आहेत.
या दुकानांवर आधीही एकदोनवेळा कारवाई झाली होती तसेच त्यांना नोटीसही देण्यात आलेली होती असं सांगण्यात येत आहे.
मंगळवारी ( 23 जानेवारी) याच परिसरातील काही अतिक्रमणांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. या घटनेवर अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. अफवांवर विश्वास ठेवू नये असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
रामलला प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने उत्साह आणि आनंद व्यक्त करणाऱ्या काही गाड्यांवर येथे हल्ला झाला होता.
यासंदर्भात सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या व्हीडिओत गाड्यांची नासधूस तसेच काही व्यक्तींवर हल्ला झाल्याचं दिसत होतं.
पोलीस अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, 21 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर 13 जणांना अटक केली असून एफआयआर नोंदवला गेला.
या परिसरात शांतता राहावी यासाठी आम्ही संचलन केले आहे. महानगरपालिकेने बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या परिसरातील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे, असं सांगितलं.
काल 22 जानेवारी रोजी देशभरात रामलला प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा होत असताना या मिरा रोड इथल्या घटनेची आपण गंभीर दखल घेत आहोत, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलं होतं.
‘मिरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.’ असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
या संदर्भात प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका उत्तरात, "अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अत्यंत कडक कारवाई केली जाईल. अवैध बांधकामं, अवैध धंदे करणाऱ्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल." असं सांगितलं आहे.
अफवा न पसरवण्याचं आवाहन
मिरा भाईंदर पोलिसांनी या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा कायदेशीर तपास सुरू असून पुराव्याच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लोक वेगवेगळे समज पसरवत असून कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे फोटो, व्हीडिओ, फोटो, स्टेटस प्रसारित करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
असं केल्यास व्हॉट्स अप अडमिन, आणि ग्रुपमधील सदस्यांवर कारवाई करण्यात येईल. आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हीडिओ पुरावा म्हणून सादर करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)