You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईला वादळाचा तडाखा, होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू, तर 43 जण जखमी
मुंबईला सोमवारी (13 मे) दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला. संध्याकाळी चार वाजल्यानंतर प्रचंड वादळ सुरू झाल्यामुळे सगळीकडे धुळीचे लोट पसरले. त्यानंतर जोरदार पाऊसही झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना घडली.
मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 43 लोक जखमी झाले आहेत. मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर येथील दुर्घटना स्थळावर पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दुर्घटनेतील जखमींची भेटही घेतली.
वादळ आणि पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर दुपारीच अनेक ठिकाणी अंधार झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
मुंबई बरोबरच ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी वादळासह पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर पणे, रायगड, पालघरमध्येही काही भागत वादळी वारे होते.
मान्सूनपूर्वीचा हा पहिला पाऊस आहे. त्यामुळं तापमान खाली आलं आहे. या वादळानंतर पाऊस सुरू होण्यापूर्वी ढग दाटून आल्यानं अचानक अंधारासारखी स्थिती निर्माण झाली होती.
नैर्ऋत्य मान्सून 19 मे 2024 च्या आसपास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि निकोबार बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
होर्डिंगखाली दबून 64 जखमी
वादळामध्ये काही ठिकाणी ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहत होते. या वेगवान वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळल्यामुळं गंभीर दुर्घटना घडली आहे.
या महाकाय होर्डिंगखाली जवळपास 100 जण अडकले होते. त्यातील सुमारे 60 जण जखमी असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. जखमींवर राजावाडीमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर पूर्व मधील रमाबाई नगर परिसरातील पेट्रोल पंपाच्यावरील जाहिराताचे हे भलेमोठे होर्डींग कोसळून ही दुर्घटना घडली.
हे होर्डिंग अनधिकृत असून संबंधित जाहिरात कंपनी, रेल्वे प्राधिकरण आणि या अनधिकृत होर्डिंगकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई महानगर पालिका विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे.
'मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करणार'
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला आमचं प्राधान्य आहे, असं सांगितलं.
मुंबईत जेवढे होर्डिंग आहेत, त्याचे विशेष स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. तसंच या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचंही शिंदे म्हणाले.
जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश - फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेनंतर रात्री घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ही घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले.
"या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून गरज पडल्यास या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. अशाप्रकारे लोकांचे जीव धोक्यात घालणं खपवून घेतलं जाणार नाही," असंही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
याठिकाणी अजूनही लोक आत दबलेले असल्याची शक्यता आहे. तसंच पेट्रोल पंप असल्यामुळं अतिशय काळजीपूर्वक बचाव मोहीम राबवून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार, असल्याचंही फडणवीस म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणात प्रथमदर्शनी अनेक अनियमितता दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत उच्च स्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
"या होर्डिंगसाठी परवानगी घेतली होता का? परवानगी कोणी दिल्या? परवानगी योग्य होत्या का? याची गंभीरपणे चौकशी केली जाईल. तसंच एवढं मोठं होर्डिंग लावताना अशाप्रकारे वेगाने येणाऱ्या वाऱ्यासंदर्भात अभ्यास केला होता का? याची माहिती घेतली जाईल," असं ते म्हणाले.
रेल्वे-विमान वाहतुकीलाही फटका
ऑफिस बंद होण्याच्या वेळीच हे वादळ आल्यानं अनेकांची गैरसोय झाल्याचं दिसून आलं. मुलूंड आणि ठाणे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर जोडणारा खांब कोसळल्यानं मुख्य उपनगरीय मार्गावर रेल्वे सेवा थांबवण्यात आली होती.
वादळी पावसाचा तडाखा मुंबईतील मेट्रोसेवेलाही बसला होता. पण काही वेळानं मेट्रोसेवा पुन्हा सुरळीत झाल्याचं मुंबई मेट्रोनं स्पष्ट केलं.
मुंबई विमानतळावरील वाहतुकीवरही या वादळाचा परिणाम झाला आहे. साधारणपणे 3.57 वाजेपासून काही काळासाठी लॅंडिंग आणि टेकॲाफ बंद होते, अशी माहिती मिळाली आहे. मुंबई विमानतळावरची वाहतूक साधारण अर्धा-पाऊण तास उशिराने झाली.
मान्सूनचे आगमन 19 मे रोजी?
मान्सूनपूर्वीचा हा पहिला पाऊस आहे. त्यामुळं तापमान खाली आलं आहे. या वादळानंतर पाऊस सुरू होण्यापूर्वी ढग दाटून आल्यानं अचानक अंधारासारखी स्थिती निर्माण झाली होती.
नैर्ऋत्य मॉन्सून 19 मे 2024 च्या आसपास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि निकोबार बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.