बशर अल-असद यांची सत्ता गेल्यानंतर शिया मुस्लीम सीरियाला का जाऊ शकत नाहीत?

फोटो स्रोत, MOHAMMED AL-RIFAI / AFP
- Author, सय्यद मोझीज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सिरियामध्ये झालेल्या सत्ताबदलाचा परिणाम भारतावर पण दिसून येत आहे. सिरियाला जाणाऱ्या शिया यात्रेकरूंवर हा परिणाम होत आहे.
काही दिवसांपूर्वी बंडखोर हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) ने बशर अल-असद यांची सत्ता उलथवून टाकली.
त्यानंतर माजी राष्ट्रपती असद यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागला. तसेच सीरियामध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना देखील भारत सरकारनं सुखरूप मायदेशी परत आणलं.
सध्या सीरियातील परिस्थितीवर भारत सरकारचं लक्ष असून नागरिकांना सीरिया प्रवास शक्यतो टाळावा असा सल्लाही दिला आहे.
सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता भारतीयांनी सीरियाला जाऊ नये, असा सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं 6 डिसेंबरला दिला होता.
यामुळे आता भारतातील शिया समुदायासाठी अडचण निर्माण झाली आहे. कारण, सीरियात शिया समुदायाची दोन पवित्र स्थळं असून ती सीरियाची राजधानी दमास्कसजवळ आहे.


पहिली कबर पैगंबर मोहम्मद यांची नात सय्यदा जैनब यांची आहे, तर दुसरी शिया समुदायाचे तिसरे इमाम हुसैन यांची मुलगी सय्यदा सुकैना यांची आहे.
दरवर्षी शिया समुदायातील हजारो मुस्लीम बांधव या कबरींच्या दर्शनासाठी जातात. पण, आता सीरियातील परिस्थिती बघता त्यांना दर्शनासाठी जायला अडचणी येत आहेत.
सध्या कोणालाही सीरियाला पाठवत नाही
शिया समुदायाला इराक, इराण आणि सीरियात घेऊन जाणारे लखनौचे काझमान परिसरातील मौलाना गुलाम सरवर म्हणतात, सध्या आम्ही कोणालाही सीरियात घेऊन जात नाही.
आधी ईरानवरून विमानानं थेट सीरियाला जाता येत होतं. पण, आता ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे.
मौलाना सरवर 2 नोव्हेंबरलाच सीरियावरून भारतात परत आले.
याआधी सीरियावर राज्य करणाऱ्या बशर अल असद यांना शिया देश इराणचा पाठिंबा होता. पण, आता सीरियात सत्तेत- असलेल्या एचटीएसचा कल सुन्नी इस्लामकडे आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील सेंटर फॉर वेस्ट एशियन स्टडीजच्या प्राध्यापक सुजाता ऐश्वर्या सांगतात, "बशर अल-असद यांच्या राजवटीवर ईराणचा प्रभाव होता. यामागे धार्मिक कारण होतं. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली होती.
त्यावेळी सीरियात बशर अल-असद यांचे वडील हफीज अल-असद यांचं राज्य होतं. ते सीरियातील अलसंख्याक अलावी समुदायातून येतात. त्यामुळे इराणनं त्यांचं समर्थन केलं होतं."
शिया समुदाय सीरियाला का जातो?
आम्ही लखनौमधल्या दुबग्गा इथं राहणाऱ्या 55 वर्षीय रजिया बानो यांना भेटलो. ते काही दिवसांपासून ट्रॅव्हल एंजटकडे चकरा मारत आहेत. कारण, त्यांना सीरियाला जायचं आहे.
मी धार्मिक यात्रा करेल तर सीरियाला नक्की जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे.
पण, सीरियातील परिस्थिती बघता तिथं जाणं धोकादायक आहे असं त्यांना सांगण्यात आलं. तरीही त्या तिथं जाण्यावर ठाम आहेत. त्या म्हणतात, मला माझ्या जीवाची भीती नाही.
शिया समुदायाचा सीरियाशी खूप जुना संबंध आहे. सीरिया हे उमय्या राजवटीचे केंद्र होते, असंही इतिहासात सांगितलं जातं. त्यांचं इस्लामचे चौथे खलिफा अली यांच्यासोबत संबंध इतके चांगले नव्हते. तसेच शिया अली यांना आपला पहिला इमाम मानतात.

कॅनडातील ओटावा शहरात राहणारे भारतीय वंशाचे मौलाना अली जफर झैदी बीबीसी हिंदीसोबत बोलताना म्हणाले, "शिया समुदायाची दोन महत्वपूर्ण पवित्र स्थळं सीरियात आहेत. एक म्हणजे सैयदा जैनब यांची कबर आहेत. त्या इमाम हुसैन यांची बहीण होत्या, तर दुसरी त्यांची मुलगी सुकैना यांची आहे. त्यांना अरबी लोक रुकैयाही म्हणतात."
पण, आता तिथं जाणं योग्य नाही, असंही ते सांगतात.

एका अंदाजानुसार, भारतात जवळपास दोन कोटी शिया मुस्लीम आहेत. त्यापैकी लखनौमध्ये सर्वाधिक आहेत. पूर्ण जगात जवळपास 15-17 कोटी शिया मुस्लीम आहेत.
हे मुस्लीमांच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के आहेत. सर्वाधिक शिया मुस्लीम भारत, इराण, इराक, बहरीन, अजरबैजान, सीरिया आणि यमनमध्ये राहतात.
तसेच अफगाणिस्थान, पाकिस्न, कतर, तुर्की, सऊदी अरब, कुवैत, लेबनन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्यही बऱ्यापैकी शिया मुस्लीम राहतात.
आफ्रिकेच्या देशांतही शिया मुस्लीम असून युरोप, अमेरिका आणि कॅनाडामध्ये शिया मुस्लीम विदेशी वंशाचे आहेत.
इराक, ईराण, सीरिया आणि शिया
लखनौ आणि शिया समुदायाचे संबंध फार जुने आहेत. महमुदाबादच्या आधीच्या राजघराण्यातील प्रोफेसर अली मोहम्मद खान म्हणतात की, "लखनौमध्ये अनेक कबरी आहेत. त्या इराक, इराण आणि सीरियामधील कबरींच्या प्रतिक आहेत.
आधी लोकांना सीरियाला जात येत नव्हतं. तिकडे जायला पैसे लागायचे आणि जाणंही काही सोपं नव्हतं. मग लखनौ आणि हैदराबादचे मुस्लीम लोक दर्शनासाठी कसे जाणार? त्यामुळे या लोकांसाठी नवाबी राजवटीत या कबर इथं बांधण्यात आल्या."

अली खान सीरियातील दमस्कस इथं अनेक वर्ष वास्तव्याला होते. ते पुढे म्हणतात, शिया आणि सुन्नी दोन्ही समुदायाचे लोक दर्शनासाठी सीरियाला यायचे. पण, आता एचटीएसचं सरकार आल्यानंतर तिथं जाणं अवघड झालंय.
इतकंच नाहीतर भारतातून धार्मिक यात्रेला जाणारे मुस्लीम समुदायातील लोक ईराण किंवा इराकला जाऊन सीरियाचा व्हिसा घेतात.
याआधी लोक बसने जात होते. पण, आता त्यावरही बंडखोरांनी ताबा मिळवला आहे, असं काही टूर ऑपरेटर्सने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
सिरियात सध्या काय परिस्थिती आहे?
शिया समुदायाच्या धार्मिक यात्रेत ईरानचा मशहद आणि कुम शहरांचाही समावेश असतो, तर इराकमधील नजफ, कर्बला आणि सामरा या शहरांचा समावेश असतो. तसेच सीरियातील दमस्कसजवळून काही अंतरावर सैयदा जैनब यांच्या नावानं एक शहर वसलं आहे तिथही हे लोक जातात.
बाराबंकी येथील हैदरगड येथील रहिवासी अज्मी जैदी काही दिवसांपूर्वी या देशामध्ये धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांनी 7 डिसेंबरला सीरियात दर्शन घेतलं आणि ते नजफला पोहोचले.
अझ्मी झैदी सांगतात, "आम्ही 16 जण त्यादिवशी जवळपास 5 वाजता सीरियातून निघालो. इराकमधील नजफ इथं उतरताच समजलं की दमस्कस इथलं विमानतळ बंद करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी समजलं की सीरियात सत्तांतर झालं. आम्ही सीरियात होतो तेव्हा बंडखोरांनी अलप्पो आणि दीगर या ठिकाणांवर ताबा मिळवला हे माहिती होतं. पण तिथं सत्तांतर होईल हा अंदाज आला नव्हता."
झैदी नेहमीच सीरियाला जातात. ते पुढे सांगतात की, यावेळी दहशतपूर्ण वातावरण होतं. तसेच तिथली परिस्थितीही फारच संवेदनशील होती.
नार्वे इथल्या ओस्लोमध्ये तौहीद केंद्र चालवणारे भारतीयचे वंशाचे शमसाद हुसैन रिझवी म्हणाले की, "आम्ही इराकच्या नजफ शहरात आहोत. सीरियातील परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे आम्ही सीरियाला जाऊ शकत नाही. एचटीएस यात्रेकरूंवर बंदी घालत नाहीत असंही समोर येत आहे. पण, त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण, ते ISIS चा भाग आहे."

ईराणच्या सेहर रेडिओच्या प्रमुख राहिलेल्या भारतीय वंशाच्या जहरा झैदी सांगतात की "मी सध्या नजफमध्ये आहेत.
इथं मला अनेक भारतीय भेटले असून त्यांना सीरियाला जायचं असल्याचं सांगत होते. सीरियातील परिस्थिती पाहता यात्रेकरूंना मायदेशी परतावं लागेल. कारण, बंडखोर यात्रेकरूंसोबत कसे वागतील याबद्दल अजूनही संशय आहे."
लखनौचे मौलाना गुलाम सरवर म्हणतात की, "आम्ही तिथं गेलो तेव्हा बशर अल-असद यांचं सरकार होतं. तेव्हाच तिथली परिस्थिती तणावपूर्ण होती. आम्ही विमानातून उतरल्यानंतर सुरक्षा रक्षकच आम्हाला कबरीच्या दर्शनासाठी घेऊन गेले. रात्रभर हल्ले होत होते. आता तर परिस्थिती आणखी वाईट असेल."
आता सीरियाला जायचं की नाही याबद्दल कॅनडाचे मौलाना अली जफर झैदी म्हणतात की, "नागरिकांनी देशाच्या सूचनांचं पालन करावं. कारण, आता सीरियात सत्ता असलेल्या सरकारनं यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली नाही."
भारतानं सीरियातून 77 लोकांना बाहेर काढलं असून यापैकी 44 लोक धार्मिक यात्रा करायला गेले होते. त्यांना सीरियातून बैरूतला आणलं.
त्यानंतर तिथून मायदेशी परत आणलं.
आता सीरियात जे लोक अडकलेले आहेत ते दूतावासाच्या संपर्कात आहेत. ज्यांना परत यायचं आहे त्यांना भारत सरकार मदत करतंय, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 13 डिसेंबरला सांगितलं होतं.
सीरियातील शियांसमोर काय पर्याय?
न्यूज एजन्सी 'रॉयटर्स'च्या एका रिपोर्टनुसार, सीरियातील शिया आणि अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी लेबननमध्ये आश्रय घेतला आहे.
अनधिकृत आकडे यापेक्षाही जास्त असू शकतात. सीरियात जवळपास 23 लाख शिया मुस्लीम आहेत. ते याआधीचे राष्ट्रपती बशर अल-असद यांचे समर्थक मानले जातात.
दुसरीकडे एचटीएसच्या नेतृत्वाखालील पंतप्रधान मोहम्मद अल बशीर यांनी प्रसारमाध्यांना सांगितलं की, ते सगळ्या धर्माच्या अधिकारांचं रक्षण करतील.

फोटो स्रोत, Getty Images
'फ्रान्स-24' या न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार सय्यदा जैनबच्या कबरीचे संचालक दिब क्रेयाम यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आहे. सध्या कबर सुरू असून तिथं काम करणारे लोक येऊ शकतात.
अनेक टूर ऑपरेटर यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की शिया समुदायातील अनेक यात्रेकरून जानेवारीत सीरियाला जाणार होते. पण, त्यांना इराक आणि ईराणला जाऊन परतावं लागेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











