You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल, फडणवीसांची विधानसभेत माहिती
महात्मा गांधीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. ते म्हणाले, “संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ती भिडे यांनी स्वीकारली आहे. अमरावतीचे व्हीडिओ उपलब्ध नाहीत असे पोलिसांचं म्हणणं नाही. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याविरोधात जो बोलेल त्यांच्यावर कारवाई होईल. वीर सावरकरांवरही आक्षेपार्ह लिखाण केलं जात आहे. ज्याप्रमाणे संभाजी भिडेंवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे काँग्रेसचे मुखपत्र शिदोरीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल.
संभाजी भिडे यांचं हिंदूत्वाचे काम चांगले आहे. असंही ते यावेळी म्हणाले.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं होतं. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झाला होता.
या वादाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटल्याचे दिसले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्या.
संभाजी भिडे बाहेर कसा फिरू शकतो, त्याला अटक करा - पृथ्वीराज चव्हाण
संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाणांनी विधिमंडळात अधिवेशनादरम्यान उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "काल अमरावतीमध्ये संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने निदाजनक वक्तव्य केलंय. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशाप्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक केली पाहिजे. ही व्यक्ती अनेक वर्षांपासून हा प्रकार करतेय. ही व्यक्ती राष्ट्रपित्याबाबत असं वक्तव्य करू शकते, तर हा बाहेर कसा फिरू शकतो? त्याच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यास त्यास जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, या व्यक्तीला अटक करावी."
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, या तक्रारीची नोंद घेतली आहे. तपासणी करून गांभीर्य पाहून कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यानंतरही काँग्रेस आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मीही शहानिशा करून शासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
संभाजी भिडेंना एवढी मुभा का आहे? - यशोमती ठाकूर
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "अमरावतीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या मार्फत युवकांचे कान भरून अशांतता निर्माण करण्याचा कार्यक्रम संभाजी भिंडेंनी घेतलाय. संभाजी भिडेंना एवढी मुभा का आहे?"
"संभाजी भिडे म्हणतात की, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. ते पुढे म्हणतात की, हे करमचंद गांधी वेगळ्या समाजाचे होते. ते मुस्लिम समाजाचे होते. या दोन समाजात जाती तंटा वाढवण्याचे काम हे संभाजी भिडे करतायेत."
ठाकूर पुढे म्हणाल्या की, "देशाचे राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडे असं बोलत असतील, तर आपलं सरकार, गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई का करत नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केल्यानंतरही सरकारनं त्यावर उत्तर दिले नाही," असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला की, "असला प्रकार पुन्हा अमरावती किंवा महाराष्ट्रात झाल्यास आम्हाला सहन होणार नाही. मग त्याचे परिणाम काय होतील, हे सरकारनं मोजावेत."
संभाजी भिडे हे दंगली पसरवण्यासाठी असे करतात आणि सरकारचा त्यांना पाठिंबा आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
संभाजी भिडे ही विकृती आहे - बाळासाहेब थोरात
तर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे."
थोरात म्हणाले, "संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केलं आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे.
संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही."
थोरात पुढे म्हणाले की, "पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते.
असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती."
थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितलं, "एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल."
कोण आहेत संभाजी भिडे?
मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे.
संभाजी भिडे 1980च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सांगतात.
संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघाची स्थापना केली होती. 1984 मध्ये संभाजी भिडे यांनी श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली.
"बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात," असंही जोशी सांगतात.
'हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,' असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
शिवप्रतिष्ठानने रायगडावर 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्याबरोबरच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे, यांच्यावर पुण्यातल्या पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळेच संभाजी भिडे यांचं नाव चर्चेत आलं.
संभाजी भिडेंबद्दल अधिक वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.