You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेंनी एकदम विचार करुन 'सुंदर' चाल केली, असं उज्ज्वल निकम का म्हणाले?
ठाकरे विरुद्ध शिंदे वादाची आजची (21 फेब्रुवारी) नियमित सुनावणी घटनापीठासमोर सुरू झाली आहे.
यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली आणि काही मुद्द्यांबद्दल त्यांचे मत स्पष्ट केले.
एक-दोन दिवसात सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागण्याची शक्यता असल्याचाही अंदाज अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे.
कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या अपिलाबद्दल उद्या (22 फेब्रुवारी) सुनावणी घ्यावी अशी विनंती केली.
घटनापीठाची उद्याची सुनावणी संपल्यानंतर हे सुनावणीसाठी घेऊ असं न्या. चंद्रचूड यांनी सांगितलं.
पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण सुरू ठेवावे, अशी शिंदे गटाची विनंती आहे. तर, सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवावे, अशी ठाकरे गटाची विनंती होती.
पण 17 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याबद्दल निर्णय झाला नाही. याचाच अर्थ पाच न्यायाधीशांचं घटनापीठ पुढील सुनावणी करणार आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. याच पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने चिन्हाबाबतीतचा निर्णय आयोगाकडे सोपवला होता. त्यामुळे त्याला अयोग्य म्हणता येणार नाही. हां. त्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाला आव्हान नक्की देता येईल,
अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना त्या आमदारांना राज्यपाल शपथ देऊ शकतात का असं विचारल्यावर ते म्हणाले, “याबाबतीत 21 जून ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. कारण त्या दिवशी शिवसेनेचे (तेव्हाच्या) व्हीप सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर उपस्थित राहाण्यास सांगितले. काही आमदार तेव्हा सूरत, गुवाहाटीत असल्यामुळे उपस्थित राहिले नाहीत.
"त्या आधारावर त्यांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु परिशिष्ट 10 वे पाहिले तर फक्त स्वतःहून पक्ष सोडला तर आणि व्हीपविरोधात मतदान केलं तर सदस्यत्व जातं. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आपण पक्ष सोडलाच नाही म्हणतात.
"ही अत्यंत विचार करुन केलेली सुंदर चाल आहे. सुंदर अशासाठी म्हणतो की त्यांनी कदाचित यासाठी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मार्गदर्शन घेतलेलं दिसतं,” निकम म्हणाले.
ठाकरे गटाची कायदेशीर बाजू कमकुवत- राहुल शेवाळे
ठाकरे गटाची कायदेशीर बाजू कमकुवत असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात, दिल्ली उच्च न्यायालयात वेळ काढत होते. पण त्यांचा खोटारडेपणा या निकालाने उघड झाला, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.
ज्यावेळी त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही असं लक्षात आलं, तेव्हा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन-तीन दिवस आधीच माध्यमांसमोर येऊन सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावरही आक्षेप घेतले, अशी टीकाही राहुल शेवाळेंनी केली.
हे सरकार बेकायदेशीर असल्याचं वारंवार सांगितलं जातं, पण हे सरकार सर्व नियम पाळून स्थापन झालं असल्याचंही राहुल शेवाळेंनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)