बांगलादेश : अनेक दुर्गापूजा मंडपात तोडफोड, 150 हिंदू कुटुंबावर हल्ले 3 जणांचा मृत्यू

    • Author, प्रभाकर मणि तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी. कोलकात्याहून

बांगलादेशमध्ये एका फेसबूक पोस्टमुळं भडकलेल्या हिंसेमुळं अनेक मंडळांच्या दुर्गा पुजा मांडवांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. त्यात किमान 150 हिंदू अल्पसंख्याक कुटुंबावर हल्ले झाले आहेत. अधिकाऱ्यांनी यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

बांगलादेशच्या कोमिल्ला जिल्ह्यात एका दुर्गा पुजेच्या मांडवात कुरणाचा अपमान झाल्याची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

अनेक हिंदू मंदिरं, घरं आणि दुकानांची तोड-फोड केल्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणांत आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. या परिसरात प्रथमच धार्मिक हिंसाचाराची घटना घडली असल्याचं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे.

2011 ज्या जनगणनेनुसार बांग्लादेशच्या 14.9 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 8.5 टक्के हिंदू आहेत. कोमिल्ला जिल्ह्यासह त्याठिकाणच्या इतर अनेक जिल्ह्यांत हिंदू समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

पश्चिम बंगालच्या अनेक संघटनांनी बुधवारी रात्री या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषदेनं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

"हा अत्यंत लज्जास्पद प्रकार आहे. मात्र, सध्या बांगलादेशात ज्या पद्धतीनं कट्टरता वाढत आहे, त्यात काहीही शक्य आहे. सरकार आणि प्रशासनानं दुर्गापूजेच्या मांडवांच्या सुरक्षेची आधीच व्यवस्था करायला हवी होती. दंगली भडकवण्यासाठी काही कट्टरतावाद्यांचं हे कारस्थान आहे," असं कोलकात्यामध्ये दुर्गापूजा आयोजित करणाऱ्या भारत संघाचे सचिव सोमेन भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

"या भागामध्ये जात आणि धर्माच्या आधारावर कधीही तणाव निर्माण झाला नव्हता. लोक एकमेकांच्या उत्सवांमध्ये सहभागी होत होते. पण आता याठिकाणी कट्टरतावादी विचारसरणी वेगानं वाढत आहे. त्याठिकाणी राहणारे अल्पसंख्याक स्वतःला अत्यंत असुरक्षित समजत आहेत," असं कोमिल्लाच्या जवळच्या एका गावातून कोलकात्यात आलेले ज्येष्ठ सब्यसाची दत्त यांनी सांगितलं. सब्यसाची बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी कोमिल्ला सोडून आले होते. त्यांचे अनेक नातेवाईक अजूनही तिथंच राहतात.

माध्यमांतील वृत्तांनुसार एका मांडवामध्ये कुरण ठेवून त्याचा अपमान करण्यात आला असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर चांदपूरच्या हबीबगंज, चटगाँवच्या बांसखाली, कॉक्स बाजारच्या पेकुआ आणि शिवगंजच्या चापाई नवाबगंजसह अनेक भागांत हिंसाचार भडकला आणि मांडवांची तोडफोड करण्यात आली.

कारस्थानाचा आरोप

काही ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीचंही नुकसान करण्यात आलं आहे.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमान यांनी सरकार या घटनेची गांभीर्यानं दखल घेत असल्याचं, स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं, "कोमिल्लामध्ये हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक केली जावी, हा प्रकार हिंसा भडकवण्याच्या कटाचा भाग असू शकतो," असं ते म्हणाले.

बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदूंनी 13 ऑक्टोबर हा काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. हल्लेखोरांनी अनेक मांडवांमध्ये तोडफोड करत जवळपास 150 कुटुंबांवर हल्ले केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कोमिल्लामध्ये ज्या भागात या घटना घडल्या आहेत, त्याठिकाणी अनेक दशकांपासून हिंदू आणि मुस्लीम सौहार्दानं राहत आलेले आहेत. मुस्लीम समुदायाचे लोकही दुर्गा पुजेच्या मांडवांमध्ये जात असतात. त्यामुळंच याठिकाणी रात्री मांडवांमध्ये सुरक्षारक्षक नसतात.

कोमिल्ला महानगर पूजा समितीचे सरचिटणीस शिवप्रसाद दत्त यांनी कुराणच्या अपमानाचा मुद्दा निराधार असल्याचं म्हटलं आहे. कोणीतरी मुद्दाम हिंसा भडकावण्यासाठी मामुआ दीघीर पार याठिकाणच्या मांडवात गुपचूप कुरआनची प्रत ठेवली होती. त्यावेळी मांडवात कोणीही नव्हतं, असं ते म्हणाले.

जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यांनीही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला आहे. मांडवामध्ये कुराण ठेवल्यानंतर कोणीतरी त्याचा फोटो काढला आणि व्हीडिओ तयार करून तिथून फरार झाला. त्यानंतर काही वेळातच फेसबूकवर कुरआनच्या अपमानाची पोस्ट व्हायरल झाली.

या हिंसेनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे बांगलादेश हिंदू युनिटी काऊन्सिलच्या ट्विटरद्वारे मुस्लीम समुदायाला अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. काऊन्सिलनं पंतप्रधानांकडे त्याठिकाणी लष्कर पाठवण्याची मागणीही केली आहे.

"मुस्लीम बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी आमची विनंती आहे. आम्ही कुराणचा सन्मान करतो. दुर्गा पुजेदरम्यान मांडवात कुराण ठेवण्याची काहीही गरज नाही. हा प्रकार दोन समुदायांमध्ये दंगली भडकावण्यासाठीचं कारस्थान आहे. कृपया हिंदूंवर आणि मांडवांवर हल्ले करू नका," असं काऊंसिलनं म्हटलं आहे.

काऊंसिलनं गेल्या 24 तासांत हिंसाचार प्रकरणी अनेक अलर्ट आणि अपडेटदेखील शेअर केले आहेत.

"कोमिल्लामध्ये सर्व हिंदूंना सतर्क राहण्याचे निर्देश दिले जात आहेत. सगळ्यांनी मंदिरात एकत्र राहा. आम्ही बांगलादेश पोलिसांना नानुआ दीघीर पार परिसरात मदतीची विनंती करत आहोत," असं काऊंसिलनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

"बांगलादेशच्या इतिहासात हा एक काळा दिवस आहे. अष्टमीच्या दिवशी विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी मांडवांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. हिंदू आता मांडवांचं संरक्षण करत आहे. पण संपूर्ण जग मौन आहे," असं परिषदेनं म्हटलं.

"बांगलादेशमध्ये हिंदूंबाबत एवढा द्वेष का आहे. हिंदू बांगलादेशात जन्मापासून राहत आहेत. 1971 मध्ये जीव गमावणाऱ्यांमध्ये बहुतांश हिंदू होते. बांगलादेशचे हिंदू मुस्लिमांना भाऊ मानतात. 90 टक्के मुस्लिमांसाठी 8 टक्के हिंदू हे समस्या कसे असू शकतात?" असं काऊन्सिलनं दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय.

"रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला दिसावं अशा पद्धतीनं कुराण ठेवण्यात आलं होतं. त्यावरून हे कारस्थान असल्याचं स्पष्ट होतं. त्यानं फेसबूकवर एक पोस्टमध्ये सर्वकाही सांगितलं," असं काझी तमीम या प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.

हिंसाचाराची माहिती दिल्यानंतरही पोलीस आणि प्रशासनानं हा प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात हिंसाचार भडकण्याची बांगलादेशमधली ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी याचवर्षी मार्चमध्ये एका हिंदू व्यक्तीनं हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेचे सरचिटणीस मौलाना मुफ्ती मोमिनुल हक यांच्यावर टीका केली होती.

त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनामगंज गावात 80 हिंदू कुटुंबावर हल्ले केले होते. टीका करणारा तरुण मौलानाच्या भाषणावर नाराज होता, त्यामुळं त्यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे टीका केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)