Tokyo Olympics : बजरंग पुनिया पराभूत, अझरबैजानच्या अलीयेवने केली मात

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानं 65 किलो वजनगटामध्ये उपांत्यफेरी गाठली होती. पण त्याला उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

बजरंगला अझरबैजानच्या हाजी अलीयेवने 12-5 अशी मात दिली.

अलीयेवने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत दोन-दोन गुण मिळवण्यावर भर दिला. बजरंगने त्याचा प्रतिकार करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

अखेर बजरंगला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. आज (7 ऑगस्ट) बजरंग कांस्य पदकासाठी लढणार आहे.

इराणी पैलवानाला हरवून मिळवला होता उपांत्य फेरीत प्रवेश

बजरंगनं इराणच्या मुर्तझा घैसी चेका याला चितपट करत उपांत्य फेरी गाठली.

पहिल्या तीन मिनिटांमध्ये इराकचा पहिलवान अधिक आक्रमक ठरला होता. त्याला आघाडीही होती. अखेरच्या तीन मिनिटांतही तो काहीसा आक्रमक होता.

मात्र बजरंग पुनियला संधी मिळताच त्यानं डाव टाकला आणि प्रतिस्पर्धी पहिलवानाचे दोन्ही खांदे मॅटला टेकवत त्याला चितपट केलं.

कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धी पहिलवानाचे दोन्ही खांदे एका सेकंदासाठी मॅटवर टेकवल्यास विजय मिळत असतो. प्रतिस्पर्धी पहिलवानाचे गुण किती आहेत, त्यानं फरक पडत नाही.

त्याआधी उपांत्यपूर्वी फेरीत बजरंगनं किरगिस्तानच्या एरनझार अकमातालेव्हला पराभूत केलं होतं. उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या तीन मिनिटांत बजरंगनं 3 गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र कझाकिस्तानच्या पहिलवानानं गुण मिळवत बरोबरी केली.

पण कुस्तीच्या नियमानुसार सहा मिनिटांच्या वेळात दोघाचे गुण सारखे असतील तर कोणत्या पहिलवानानं जास्त गुणांचा डाव टाकला होता, हे पाहिलं जातं. बजरंगनं 2 गुणांचा डाव टाकला होता, त्यामुळं तो या सामन्याचा विजेता ठरला.

दरम्यान, आज (6 ऑगस्ट) दुपारी 65 किलो वजनी गटाची उपांत्य फेरी होईल.

"बजरंगने भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. त्यानं सुवर्ण पदक जिंकावं," अशी प्रतिक्रिया बजरंगच्या वडिलांनी दिली आहे.

बजरंग पुनिया : कुस्तीसाठी शाळेतून पळून जाण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यापर्यंतचा प्रवास

प्रदीप कुमार,

बीबीसी प्रतिनिधी.

बजरंग पुनिया गेल्या 7-8 वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारा खेळाडू आहे आणि म्हणूनच टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून पदकाची आशा आहे. शिवाय रवी दहियाने पदक पटकावल्यामुळे स्वाभाविकच बजरंग पुनियावरही दबाव वाढला असणार.

मात्र, दबावात त्याचा खेळ आणखी बहरतो, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बजरंग पुनियाने ऑलिम्पिकमध्ये उपांत्य सामन्यात प्रवेश करून एकप्रकारे बालपणीच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल केली.

एपिक चॅनलवरच्या 'उम्मीद इंडिया' नावाच्या एका कार्यक्रमात वीरेंद्र सहवाग यांनी बजरंग पुनियाला कुस्तीचं आकर्षण कसं निर्माण झालं, हा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर देताना बजरंग पुनियाने सांगितलं होतं, "हरियाणातील गावांमध्ये प्रत्येक घरात तुम्हाला लंगोट दिसेल. त्यामुळे फक्त लंगोट घालून उतरायचं. आखाड्यात जिंकल्यावर काहीतरी मिळतच. माझी सुरुवातही अशीच झाली. पण, खरं सांगायचं तर शाळेत जावं लागू नये, म्हणून मी आखाड्यात जायचो."

हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील कुडन गावातील मातीच्या आखाड्यांमध्ये बजरंग पुनियाने वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच तालमीला जायला सुरुवात केली. त्याचे वडीलही पहलवान होते. त्यामुळे घरूनही विरोध नव्हता.

मात्र, मातीच्या आखाड्यांमध्ये मातीमुळे कुस्तीपटूंना बरीच मदत होत असली तरी मॅटवरची कुस्ती शिकावीच लागते. त्यामुळे वयाच्या 12 व्या वर्षी बजरंग पुनियाने मॅटवरची कुस्ती शिकण्यासाठी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम गाठलं. इथे कोच सतपाल यांच्या मार्गदर्शनाखाली मॅटवरच्या कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात झाली.

तिथेच योगेश्वर दत्तची ओळख झाली आणि कुस्तीबद्दल प्रेम आणखीन वाढलं. या भेटीविषयी एपिक चॅनलवरच्या 'उम्मीद इंडिया' कार्यक्रमात बोलताना योगेश्वर दत्त म्हणाले होते, "2008 साली कुडन गावातल्या माझ्या एका मित्राने त्याला मला भेटायला आणलं. तेव्हापासूनच त्याच्यात चिकाटी होती. तो आमच्यापेक्षा 12-13 वर्षांनी लहान होता. पण, मेहनत आमच्यासारखीच करायचा."

योगेश्वर दत्त बजरंग पुनियासाठी मॉडल, गाईड, मित्र सर्वच होते. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तच्या विजयाने बजरंग पुनियानेही ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न उरी बाळगलं.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार राजेश राय सांगतात, "मी बजरंग पुनियाला पहिल्यांदा भेटलो ते सोनीपतमध्ये. त्यावेळी योगेश्वर दत्तही त्याच्यासोबत होते. त्यांच्यावर योगेश्वर दत्तचा खूप पगडा होता."

हा पगडा इतका होता की बजरंग पुनियाने 2014 साली योगेश्वर अकॅडमीत प्रवेश घेतला आणि मग मागे वळून बघितलं नाही. गेल्या सात वर्षात बजरंग पुनियाने ज्या-ज्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं ते अभूतपूर्व असं आहे.

2017 आणि 2019 सालच्या एशियन चॅम्पियनशीप, 2018 साली एशियन गेम्स आणि आणि 2018 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बजरंग पुनियाने गोल्ड मेडलची कमाई केली.

त्याच वर्षी झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्ये त्याला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. ऑलिम्पिकपूर्वी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुनियाने 6 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. या सर्व यशामध्ये योगेश्वर दत्त यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार राजेश राय सांगतात, "एका उत्तम खेळाडूचं मार्गदर्शन काय कमाल करू शकतं हे एका उदाहरणावरून समजून घेता येईल. 2018 सालच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारचं नामांकन बजरंग पुनियालाही होतं. मात्र, त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही."

"त्यावेळी ते बंगळुरूमध्ये प्रशिक्षण घेत होते. दुःखी होते. फोनवर म्हणाले कॅनॉट प्लेसवर पत्रकार परिषद घेईल आणि पुरस्कार मिळाला नाही, या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करेन."

राजेश राय यांच्या मते हे सगळं खूप घाईत घडलं आणि योगेश्वर दत्त यांना उशिरा कळलं. त्यांनी बजरंग पुनियाला समजावलं की तू फक्त खेळत रहा. पुरस्कार आज नाही तर उद्या मिळेलच. कोर्टाचे खेटे घालू नको. त्याने काहीच फायदा होणार नाही.

या सल्ल्याचा फायदा असा झाला की बजरंग पुनियाला 2019 सालचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारही मिळाला आणि कुस्तीच्या खेळात नावही चमकलं.

दरम्यानच्या काळात आपल्या खेळाविषयी त्याच्या एका वक्तव्याची बरीच चर्चा झाली. पुनियाने गमतीत म्हटलं होतं, "ये ढाई किलो का हाथ जब किसी पर पडता है तो गोल्ड मेडल आ ही जाता है."

यावरून पुनियावर सिनेमाचा प्रभाव आहे, असं कुणीही म्हणेल. मात्र, पुनियाने गेल्या दहा वर्षात एकदाही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघितलेला नाही. एवढंच नाही तर 7 वर्ष त्यांच्याकडे मोबाईल फोनही नव्हता.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत बजरंग पुनियाने सांगितलं होतं, "2010 साली मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला सुरुवात केली. त्यावेळी योगी भाई (योगेश्वर दत्त) मला म्हणाले होते की या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. आज माझ्याकडे मोबाईल आहे. पण योगी भाईंसमोर मी तो वापरत नाही. ते 10 तास माझ्या सोबत असतील तर मी 10 तास फोनविनाच असतो."

योगेश्वर दत्त यांच्या सल्ल्याचाच परिणाम आहे की वेगवेगळ्या स्पर्धांसाठी जगभरातले 30 देश फिरूनही बजरंग पुनियाने एकाही देशातील एकही पर्यटन स्थळ बघितलेलं नाही. संघातले इतर खेळाडू फिरायला जात. पण, बजरंग पुनियाने सगळं लक्ष फक्त आणि फक्त कुस्ती आणि सरावावर केंद्रीत ठेवलं.

बजरंग पुनियाचं ट्वीटर अकाऊंट आहे आणि तो ट्वीटही करायचा. पण टोकियो ऑलिम्पिकची तयारी सुरू केल्यापासून 2018 सालापासून त्याने एकही ट्वीट केलेलं नाही. त्याच्या ट्वीटवरूनही बजरंग पुनियाच्या विनम्र स्वभावाची झलक बघायला मिळते.

एका ट्वीटमध्ये तो लिहितो, "वाईट काळ सर्वात मोठा जादूगार आहे. एका क्षणात सर्व चाहत्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा काढून टाकतो."

आणखी एका ट्वीटमध्ये तो लिहितो, "मी श्रेष्ठ आहे, हा आत्मविश्वास आहे. मात्र, केवळ 'मीच' श्रेष्ठ आहे, हा अहंकार आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)