You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्या - सुषमा स्वराज
पाकिस्ताननं मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.
एएनआयया वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात बोलताना सुषमा स्वराज यांनी ही मागणी केली आहे.
"इम्रान खान एक चांगले शासक आहेत असं काही लोक म्हणतात, ते खरंच एवढे उदार असतील तर त्यांनी मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावं," असं सुषमा स्वराज म्हणाल्या आहेत.
मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनचा विरोध
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा एकदा विरोध केला आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला दिलेल्या एका नोटमध्ये चीननं याबाबत अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनने नकाराधिकाराचा वापर करत मसूदची अप्रत्यक्ष पाठराखण केली आहे.
मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारी रोजी मांडला होता.
पाच देशांकडे सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व आहे - अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, चीन आणि रशिया. यांपैकी कोणताही एक सदस्य आपल्या नकाराधिकाराचा वापर करून कोणताही प्रस्ताव हाणून पाडू शकतो. चीननं त्याचाच वापर केला आहे.
सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रांची एक महत्त्वाची संस्था आहे आणि तिच्यावर जगात शांतता कायम ठेवण्याची मुख्य जबाबदारी आहे.
चीनने यापूर्वीही मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याला विरोध केला होता. 2016 आणि 2017 मध्ये आलेल्या प्रस्तावांना चीनने रोखलं होतं.
चीन पाकिस्तानला मदत करण्यासाठी मसूदला वाचवत आहे, असा त्यावेळी आरोपही त्यावेळी झाला होता.
काश्मीरमधल्या पुलावामामध्ये झालेल्या स्फोटात 40 निमलष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती.
मसूद अझहरवर कारवाई करण्याची भारताने वारंवार मागणी केली असून त्याच्याविरुद्ध पाकिस्तानकडे पुरावेही दिले असल्याचं भारताचं म्हणणं आहे. आम्ही पुराव्यांचा अभ्यास करू, असं पाकिस्ताने परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.
संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे राजदुत सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट करून ज्या देशांनी मदत केली त्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)