ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर; अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार

फोटो स्रोत, Getty Images
अंधेरी पोटनिवडणुकीत अखेर भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुकाबला होणार होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं. मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही लढणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता बिनविरोध झाल्यानं सगळ्यांचे आभार मानते. गेले काही दिवस माझ्यासोबत प्रचारासाठी धावपळ करत होते, त्या सगळ्यांचे आभार. माझे पती रमेश लटके यांचे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय असेल", असं ऋतुजा लटके यांनी सांगितलं.
"हे भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे", असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलं.
"या निवडणुकीसंदर्भात जो निर्णय होईल त्याचा परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होणार होता. या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार घडला तो सामान्य माणसाला आवडलेला नाही. विजय मिळणार याची खात्री असती तर माघार घेतली नसती", असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
"महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. दिवंगत व्यक्ती जाते, घरातलं कुणी उभं राहतं तेव्हा आम्ही उमेदवारी देत नाही. भाजपने आडमुठेपणा केला. लटके मॅडमचा राजीनामा अडकवण्यात आला. त्यावेळी ज्या पद्धतीने त्रास देण्यात आला ते आम्ही पाहिलं. भाजपने मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मुरजी पटेल यांनी महानगरपालिकेत खोटं जात प्रमाणपत्र दिल्याने वाद निर्माण झाला होता. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हे सगळं आधी करता आलं असतं. घमासान झालं नसतं. लटके मॅडमना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याचं काय करणार"? असं शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली होती.
एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर ही निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील थेट लढत मानली जात होती. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुकीचं महत्त्व वाढलं आहे.
दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह बाकी पक्षांनी उमेदवार दिलेला नाही.
भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी मुंबईत दाखल झाले आहेत. अंधेरी पूर्व येथून उमेदवारी मागे घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी बैठक आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूकसंदर्भात भाजपची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा प्रभारी सी टी रवी यासोबतच मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी,अतुल भातखळकर, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, अमित साटम, मुंबईतील आमदार उपस्थित आहेत.
अंधेरी पूर्व पोट-निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे.
"भाजपने अंधेरी पूर्व येथील पोट-निवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांच्यासाठी ही जागा सोडावी," असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज यांच्या या भूमिकेवर सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
पण, हे करताना त्यांनी कुठेही राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये. आधी शरद पवारांनी काय म्हटलं ते जाणून घेऊया.
निवडणूक बिनविरोध करण्याचं पवारांचंही आवाहन
"अंधेरी-पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी," असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केलं आहे.
"गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार दिला नव्हता. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. यातून महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"राज ठाकरे यांनी काय लिहिलं, तो राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला पत्रव्यवहार आहे, त्याविषयी मला काही माहिती नाही," असं पवार पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनीही मांडली भूमिका
उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडताना म्हटलं, "राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच पण त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते.
"रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला."
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेलं आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्याने कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही.

फोटो स्रोत, ShivSena/facebook
"शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा त्यांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे.
"ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावरील भूमिका स्पष्ट केली.
"आज सकाळी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मनसेकडून पाठिंबा मागितला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी ही निवडणूक लढवू नका अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले. आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे. तसेच निवडणुकीबाबत मी एकटाच निर्णय घेऊ शकत नाही," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फोटो स्रोत, Getty Images
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडताना म्हटलं, "आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका," असे ट्वीट करून राज ठाकरे यांनी आपले पत्र त्यासोबत जोडले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते, शिवसेना शाखाप्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांची पत्नी ऋतुजा लटके या आमदार होतील हे भाजपने पाहावे. त्या आमदार झाल्यावर दिवंगत नेत्याच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आपली भावना आहे," असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील इतर प्रमुख राजकीय नेत्यांनीही या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली.
सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, "राज ठाकरेंनी निवडणूक लढवू नये, असं पत्र लिहिलं. पण तसं काही नाही. लोकशाहीत निवडणूक लढवणं हा आमचा अधिकार आहे. राज ठाकरेंचं निवडणूक लढवू नये, असं मत असलं तरी ती लढवली पाहिजे, असं आमचं मत आहे. त्यामुळेच भाजपने तिथे उमेदवार उभा केला आहे. रिपाइंने त्यांना पाठिंबा दिलेला आहे."
राज ठाकरेंचं पत्र म्हणजे भाजपची खेळी आहे, असं मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं.
ते म्हणाले, "अर्ज करून झालं. प्रचाराला सुरुवात झाली आहे. आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने भाजपनेच राज ठाकरेंना सांगितलं असावं. तुम्ही आता आम्हाला पत्र द्या. आम्हाला थेट माघार घेता येणार नाही. मग राज ठाकरेंच्या पत्रानंतर आम्ही माघार घेतली, असं ते म्हणतील."

फोटो स्रोत, facebook
"ही सगळी पळवाट आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या या राजकारणाला बळी पडू नये," असा सल्ला सावंत यांनी ठाकरे यांना दिला.
तर एक महिन्यानंतर राज ठाकरेंना पत्र लिहिण्याची आठवण झाली का, असा सवाल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
"पण उशिरा का होईना, तुम्ही पत्र दिल्यामुळे भाजपला हे कळलं की आपल्यामुळे आपल्या संस्कृतीचा किती ऱ्हास होत आहे. मात्र, भाजप त्यांचं ऐकेल की नाही माहीत नाही, पण आम्ही मात्र रणशिंग फुंकलं आहे," असं पेडणेकर म्हणाल्या.
ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल सामना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा युती अशा दोन गटात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक होणार आहे.
भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

फोटो स्रोत, SHARDUL KADAM/BBC
ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली.
परंतु ही घोषणा होण्यापूर्वी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या.
मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात त्या कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला.
ऋतुजा लटके या राजकारणात नव्हत्या पण त्यांचे पती रमेश लटके या मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत रमेश लटके विजयी झाले.
2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव केला तर 2019 मध्ये ते शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.

फोटो स्रोत, FACEBOOK
रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय आहेत.
रमेश लटके यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्यानेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाणकार सांगतात.
काँग्रेस ते भाजपा : मुरजी पटेल यांचा प्रवास
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा मुरजी पटेल अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
2019 मध्ये भाजपा-शिवसेना यांच्या युतीने विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यावेळी मुरजी पटेल यांना भाजपाकडून निवडणूक लढवता आली नव्हती. ही जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली आणि रमेश लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत रमेश लटके यांनी जवळपास 16 हजार मतांनी मुरजी पटेल यांचा पराभव केला.
आता पोटनिवडणुकीसाठी मात्र भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट) यांच्या युतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
2015-16 या काळात मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी केसरबेन पटेल या काँग्रेसच्या तिकिटावर 2012 मध्ये नगरसेविका होत्या.
भाजपात प्रवेश केल्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केसरबेन पटेल या दोघांनीही महानगरपालिका निवडणूक लढवली. दोघंही भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक बनले. परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
जनप्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या माध्यमातूनही मुरजी पटेल कार्यरत आहेत. अंधेरी पूर्व एमआयडीसी या परिसरात जनप्रतिष्ठान संस्थेचं कार्यालय आहे.
ही निवडणूक महत्त्वाची का ठरत आहे?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण तापलंय. गेल्या काही काळात वेगाने राजकीय घडामोडी सुद्धा घडल्या.
शिवसेनेत शिंदे गटाने बंड केल्यानंतर संघटना पुन्हा उभी करण्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी चांगली संधी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
शिवसेना कोणाची? या प्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. परंतु या दरम्यान ही पोटनिवडणूक आल्याने या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली.
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हे युद्ध इथेच थांबलं नाही. तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा पक्षाचे दोन स्वतंत्र दसरा मेळावे घेण्यात आले. दोन्ही गटांच्या नेतृत्त्वाने एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून नवीन संकट उभं राहिलं. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी ऋतुजा लटकेंना थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागली.
ही पार्श्वभूमी पाहता ही पोटनिवडणूक आता केवळ मुंबईतल्या एका मतदारसंघाची राहिलेली नाही. तर सुरू असलेल्या राजकीय संघर्षासाठी दोन्ही गटांना या निवडणुकीच्या निमित्ताने खुलं मैदान मिळालं आहे.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "फुटलेल्या शिवसेनेची आता मुंबईत किती ताकद आहे याची लिटमस टेस्ट या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. म्हणून या निवडणुकीला महत्त्व आहे. मोठ्या संख्येने आमदार ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंची ताकद आहे की नाही याचा अंदाज यानिमित्ताने येईल.
"पक्षात फूट पडल्यानंतर जनसमर्थन मिळतंय का हे सुद्धा यात स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली असा आमदारांचा आरोप होता. त्यानंतर आता जनतेच्या दरबारात हा आरोप किती खरा ठरतो आणि मतदार कोणाला साथ देतात हे स्पष्ट होईल."

फोटो स्रोत, ASHISH SHELAR TWITTER
रमेश लटके दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यापूर्वी काँग्रेसचे सुरेश शेट्टी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. असं असलं तरी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुनील यादव यांचा केवळ जवळपास पाच हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2019 मध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली तरी त्यांना जवळपास 45 हजार 800 मतं मिळाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शिंदे गटाच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सुद्धा बदललं आहे. त्यामुळे मतदार या परिस्थितीकडे कसं पाहतात याचा प्राथमिक निकाल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. खरा निकाल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी ही निवडणूक आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








