You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे सरकारवर एकनाथ खडसेंची टीका, 'डिलिव्हरीचा मुहूर्त दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?'
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. डिलिव्हरीचा मुहूर्त दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार? - एकनाथ खडसे
आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न रखडला आहे. त्यावरून विरोधकांकडून टीकाही केली जात आहे, पण अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
याच मुद्द्यावरुन विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर टीका करताना खडसे म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पाळणा हलला, पण इतर मंत्र्यांचा पाळणा अद्याप हलला नाही. डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही."
खडसे पुढे म्हणाले, "अनेक बंडखोर मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.पण आता सेना भवनातून काहीही ठरत नाही. दिल्लीला जाऊन परवानगी आणावी लागते."
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी मागणीही खडसे यांनी यावेळी केली. ही बातमी लोकमतने दिली.
2. 'हर घर तिरंगा' उपक्रमासाठी मोदींचं जनतेला आवाहन
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे.
याच अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजिन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
यावेळी ट्विट करून नरेंद्र मोदी म्हणाले, "स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवत आहोत. देशातील जनतेला मी आवाहन करतो की, येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी."
ज्यांनी भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही या प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जींच्या घरी ED ची धाड, सापडले 20 कोटी रुपये रोख
पश्चिम बंगाल सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी शुक्रवारी (22 जुलै) अंमलबजाणी संचालनालयाने (ED) धाड टाकली. या धाडीमध्ये तब्बल 20 कोटी रुपये रोख सापडल्याने खळबळ उडाली आहे.
जप्त केलेल्या रोख रकमेचा फोटो ED ने ट्विट केला आहे. पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन आणि बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्ड भरती घोटाळ्याचं हे प्रकरण आहे.
यासंदर्भात तपास करण्यासाठी ही धाड टाकण्यात आली होती, अशी माहिती ED कडून देण्यात आली.
मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरांवर धाडी टाकण्यात येत असताना ED ने विशेष काळजी घेतली होती. सात-आठ अधिकारी सकाळी साडेआठ वाजता चॅटर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. दुपारी 11 पर्यंत त्यांनी धाडीची प्रक्रिया सुरू होती. यावेळी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान चॅटर्जी यांच्या घराबाहेर तैनात होते. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
4. महाराष्ट्रातील नक्षल प्रभावित जिल्ह्यात तीन वर्षांत चारशे कोटींचे रस्ते
देशभरातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमधील रस्त्यांद्वारे संपर्क यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांमधून महाराष्ट्रात तीन वर्षांत सरासरी चारशे कोटी रुपये खर्च करून सुमारे दोनशे किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात विदर्भातील गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड आदी जिल्ह्यांची नक्षल प्रभावित म्हणून नोंद आहे. यापैकी गडचिरोली व गोंदिया हे दोन जिल्हे अधिक प्रभावित आहेत.
या पाश्वर्भूमीवर माहिती घेतली असता केंद्र सरकारच्या ग्रामविकास व रस्ते वाहतूक मंत्रालयाच्याच्या माध्यमातून तीन वर्षांत 200 किमीचे रस्ते बांधणी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. दंगली न करता नामांतर केलं, हे नव्या सरकारच्या पोटात दुखतंय - आदित्य ठाकरे
आम्ही दंगली न करता औरंगाबादचं नामांतर केलं, हेच नव्या सरकारच्या पोटात दुखत आहे, महाविकास आघाडीच्या काळात जातीयवाद किंवा दंगली न होता सरकार चाललं होतं, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सरकार आल्यानंतर रायगडच्या डागडुजीचा पहिला प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला होता. त्यानंतर संभाजीनगर हा शेवटचा प्रस्ताव होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नवं सरकार महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देत असल्याबाबत नाराजीही त्यांनी व्यक्त केली. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)