You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयपूर : कन्हैयालाल यांची हत्या अशी झाली, प्रत्यक्षदर्शीने सांगितला सगळा घटनाक्रम
राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर एका टेलरची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं देशात खळबळ उडाली आहे.
कन्हैयालाल नावाच्या टेलरच्या हत्येचा हा सगळा प्रसंग त्यांचे सहायक गिरीश शर्मा यांनी सांगितली. दैनिक भास्करनं गिरीश शर्मांनी सांगितलेल्या या घटनेची लीड स्टोरी केली आहे.
ते सांगतात-
मी गेल्या दहा वर्षांपासून उदयपूरच्या भूत महल (मालदास स्ट्रीट) मध्ये शेठजी (कन्हैय्यालाल) यांच्याकडे टेलरिंग करायचो. मंगळवारी (28 जून) दुपारी दोन-तीनच्या सुमारास दोन तरूण (मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद) दुकानात आले. झब्बा-पायजमा शिवणार का, असा प्रश्न विचारला.
शेठजी म्हणाले- हो, शिवतो की!
रियाज झब्बा-पायजम्याचं माप द्यायला लागला. गौस शेजारी उभा होता. मी आणि माझा दुसरा सहकारी राजकुमार कपडे शिवत होतो. तेवढ्यात ओरडण्याचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर त्यांनी शेठजींवर हल्ला केला होता. मी बाहेर पळालो. शेजारच्या दुकानात पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्या डोक्यातून आणि डाव्या हातातूनही रक्त वाहायला लागलं होतं. शेठजी दुकानात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरातून रक्त वाहात होतं. माझ्यासोबत राजकुमारही कसाबसा बाहेर पडला.
शेठजी नेहमी म्हणायचे की, कपडे असे शिवायला हवेत, ज्यामुळे माणूस एकदम सजलेला दिसायला हवा.
पण ज्यांना सजवण्यासाठी ते माप घेत होते, तेच त्यांना कफनमध्ये गुंडाळायला कारणीभूत ठरतील याची कोणाला कल्पना होती.
शेठजींनी 10-15 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यावर वादही झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडून नेलं होतं आणि ते प्रकरण नंतर तिथेच संपलंही होतं. मारणाऱ्यांनी आधी सोशल मीडियावर पोस्ट टाकून गळा चिरण्याची धमकी दिली होती हे जास्त गंभीर होतं. त्यांनी त्याप्रमाणेच कृती केली. सोशल मीडियावर आपल्या कृत्याची कबुलीही दिली.
रियाज आणि गौस कोण आहेत?
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद रियाज मूळ भीलवाड्याचा रहिवासी आहे. तो उदयपूरमध्ये खांजीपीर भागात भाड्यानं राहतो. मशिदींमध्ये सेवा करण्याचं काम तो करतो.
गौस मोहम्मद राजसमंदचा आहे. तोसुद्धा उदयपूरच्या खांजीपूर भागात भाड्याने राहतो. वेल्डिंग आणि जमिनीशी संबंधित व्यवहारांचं काम तो करतो.
या दोघांनी कन्हैयालाल साहूंची मंगळवारी दुपारी दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. आरोपींनी या घटनेचा व्हीडिओ केला आणि पंतप्रधान मोदींनाही धमकी दिली आहे.
कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांना 31 लाख रुपयांची मदत आणि दोन्ही मुलांना नोकरीचं आश्वासन देण्यात आलं आहे.
हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली धानमंडी ठाण्याचे एएसआय भंवरलाल यांना निलंबित करण्यात आलंय.
पोलिसांनी काय म्हटलं?
राजस्थानच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उदयपूरमध्ये मंगळवारी (28 जून) दुपारी एका टेलरच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत ज्या लोकांची नावं येतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
विरोधकांनी ही घटना म्हणजे पोलिसांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. मृत कन्हैयालाल यांनी त्यांना मिळालेल्या धमकीबद्दल पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी म्हटलं होतं की, कन्हैयालाल आणि त्यांना धमकी देणाऱ्या लोकांना परस्परांत तोडगा काढायला लावला.
उदयपूरच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तासांसाठी मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आलं आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आलं.
कन्हैयालाल याचा मृतदेह बुधवारी (29 जून) सकाळी पोस्टमार्टमनंतर त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आला. कन्हैयालाल यांच्या अंत्यसंस्कारांवेळी प्रचंड गर्दी निर्माण झाली होती.
उदयपूरचे पोलिस अधीक्षक मनोज कुमार यांनी सांगितलं की, हत्येनंतर कोणताही गैरप्रकार घडला नाहीये आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.
त्यांनी म्हटलं, " आरोपींविरोधात कारवाई होईल. मी सर्व लोकांना कायद्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन करत आहे."
राजस्थान पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक दिनेश एमएन यांनी राज्यात शांतता आहे, असं म्हटलं.
उदयपूरचे विभागीय आयुक्त राजेंद्र भट्ट यांनी म्हटलं की, मृत कन्हैयालाल यांच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून 31 लाख रुपये देण्यात येतील.
चौकशी सुरू
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलं की, या घटनेचे संदर्भ खोलवर असू शकतात. त्याचा तपास करण्यासाठी एका विशेष चौकशी पथक नेमण्यात आलं आहे. प्रभारी मंत्री उदयपूरला पोहोचले आहेत.
जोधपूरमध्ये माध्यमांशी बोलताना अशोक गहलोत यांनी म्हटलं, "एसआयटीनं आपलं काम सुरू केलं आहे. जयपूरला पोहोचल्यावर आम्ही आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मीटिंगही करत आहोत. ज्यांनी मारला आहे, त्यांची योजना काय आहे, काय षड्यंत्र आहे, कोणाशी लागेबांधे आहेत, यात काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था गुंतल्या आहेत का, या सगळ्याचा शोध घेत आहोत."
राजस्थान सरकारचे एक मंत्री सुभाष गर्ग यांनी सांगितलं की, या प्रकरणी अटकसत्र सुरू झालं आहे. पोलिसांना 6 तासांत आरोपींना पकडलं आहे. अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाला सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)