उदयपूर : प्रेषित अवमान प्रकरणातून झालेल्या हत्येचा तपास NIA कडे देण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानाचा बदला म्हणून करण्यात आल्याचं आरोपींनी व्हीडिओ बनवून सांगितलं.

ANIने दिलेल्या बातमीनुसार या घटनेनंतर उदयपूरमध्ये काही भागात जाळपोळ आणि निदर्शनं सुरू झाली आहेत.

उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सर्व पक्षांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातून झालेल्या कन्हैयालाल यांच्या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी NIA कडे देण्याचे आदेश गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत.

ते ट्विटरवर लिहितात, "उदयपूरमध्ये झालेल्या निर्घृण हत्येचा मी निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. मी सर्व पक्षांना शांततेचं आवाहन करत आहे.

मी सगळ्यांना विनंती करतो की या घटनेचा व्हीडिओ शेअर करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये. व्हीडिओ शेअर केल्यास समाजात घृणा पसरवणाऱ्यांचा उद्देश साध्य होईल."

ANI ने दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या युवकाने गेल्या काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. बीबीसीने या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.

या संपूर्ण घटनेविषयी बोलताना उदयपूरचे पोलीस अधीक्षक म्हणाले, "ही अतिशय निर्घृण हत्या आहे आणि या हत्येची सखोल चौकशी करण्यात येईल. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची टीम पाठवण्यात आली आहे."

तर उदयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली आहे.

NIA करणार तपास

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास संस्थेकडून करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने ट्वीट करून याची माहिती दिली.

ट्वीटमध्ये म्हटलंय, "राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या निघृण हत्येप्रकरणाचा तपास NIA ने आपल्या हातात घ्यावा, असे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत. या प्रकरणात कोणत्या संघटनेचा किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा सहभाग आहे का, याचा तपास केला जाईल.

गृह मंत्रालयाने यानंतर NIA चं एक पथकही घटनास्थळी पाठवलं आहे. दहशतवादाच्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आहे.

उदयपूर पोलिसांचं काय मत आहे?

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून हत्या झाली अशी चर्चा होत आहे. त्यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक म्हणाले, "आम्ही सगळे रेकॉर्ड तपासत आहोत. आम्ही सध्या घटनास्थळाचा आढावा घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांशीसुद्धा चर्चा करत आहोत."

एक व्हीडिओही यासंदर्भात व्हायरल होत आहे. त्यात मुस्लिम व्यक्ती पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यासाठी उचकवत असल्याचं दिसत आहे.

घटनेनंतर पोलीस महासंचालक हवा सिंह घुमारिया यांनी म्हटलं, "घटनास्थळी 600 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला असून सर्वच जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.

आरोपींना अटक

या हत्याकांडातील दोन्ही आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर दोन्ही आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

आरोपींची ओळख पटवल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी 10 पथके तैनात करण्यात आली होती.

या खटल्यात आरोप निश्चित केले जातील आणि न्यायालयाकडून कडक शिक्षा देण्यात येईल. सर्वांनी शांतता राखावी, असं प्रशासनाने म्हटलं.

कन्हैयालाल कोण आहे?

उदयपूरच्या धानमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हैया लाल तेली टेलरिंगचं दुकान चालवायचा.

मंगळवारी दुपारी त्याच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने लोक पोहोचले आणि त्याला दुकानातून बाहेर काढलं आणि तलवारीने त्याचा गळा कापला.

कन्हैया लालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे.

घटनेनंतर हिंदू संघटनांमध्ये रोष आहे आणि त्यांनी शहरातले बाजार बंद केले आहेत. तसंच अनिश्चतिकालीन बंद पुकारण्याचं आवाहन केलं आहे.

हिंदू संघटना संतप्त

घटनेनंतर हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यांच्याकडून शहरातील बाजारपेठांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या प्रकरणानंतर सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन केलं आहे. यानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला.

राजस्थानचे पोलीस महासंचालक एम. एल. लाठर यांनी सर्व माध्यमांना उदयपूर प्रकरणाचा व्हीडिओ न दाखवण्याचं आवाहन केलं.

अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंह घुमरिया यांनीही हा व्हीडिओ व्हायरल करू नये, असं आवाहन नागरिकांना केलं. शिवाय, हा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

राजकीय प्रतिक्रिया

राजस्थानात ही घटना समोर आल्यानंतर विरोधी पक्षांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी याविषयी म्हटलं, "उदयपूरमध्ये एका निर्दोष तरुणाची दिवसा ढवळ्या निघृण हत्या करण्यात आली. राज्य सरकारच्या निर्ढावलेपणामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढल्याचं स्पष्ट आहे. राज्यात धार्मिक उन्माद आणि हिंसेची स्थिती निर्माण झाली आहे. आरोपी इतके बिनधास्त आहेत की त्यांनी पंतप्रधानांबाबतही हिंसक वक्तव्य केलं."

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही उदयपूर हत्येवर प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "उदयपूरमध्ये झालेल्या निघृण हत्येच्या घटनेमुळे मला धक्का बसला. धर्माच्या नावे असा उन्माद सहन केला जाणार नाही. अशा प्रकारच्या राक्षसी कृत्याने दहशत पसरवणाऱ्यांना तत्काळ कठोर शिक्षा मिळावी."

MIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही हत्येचा निषेध नोंदवला.

उदयपूरमध्ये झालेली हत्या निंदनीय आहे. या हत्येला कुणीच समर्थन देऊ शकत नाही. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, अशी आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही नेहमीच हिंसेचा विरोध केला आहे."

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं,

"ही स्पष्टपणे एक हत्या आहे. याला सभ्य समाजात कोणतंही स्थान नाही. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी."

क्रिकेटपटू इरफान पठाणनेही या हत्येचा निषेध केला. ट्विटर अकाऊंटवरून तो म्हणाला, "तुम्ही कोणता धर्म मानता याला महत्त्वा नाही. पण एका निर्दोष व्यक्तीला हानी पोहोचवणं म्हणजे संपूर्ण मानवतेला हानी पोहोचवण्याप्रमाणे आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)