द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा : राष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशी होते? 11 प्रश्नांची उत्तरं..

यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटानेही मुर्मू यांना आपला पाठिंबा देऊ केला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात संयुक्त पुरोगामी आघाडीकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजय मिळवणारे उमेदवार देशाचा 15वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

या निमित्ताने भारताच्या राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते त्याबाबतच्या 11 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.

1. राष्ट्रपतीपदाची निवडणूक नेमकी कशी होते?

राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो.

विधान परिषदेच्या सदस्यांचा यामध्ये समावेश होत नाही. तसंच राज्यसभा आणि लोकसभेत नियुक्त करण्यात आलेले सदस्य या मतदान प्रक्रियेचा भाग नसतात.

महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचं मूल्य वेगवेगळं असतं. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मताचं मूल्य एक सारखंच असतं. पण वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या आमदारांच मूल्य वेगवगेळं असतं. ते त्या त्या राज्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं.

राष्ट्रपति भवन

फोटो स्रोत, RASHTRAPATI BHWAN

याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा राज्यातील एका आमदाराच्या मताला जास्त वेटेज तर मणिपूर, गोवा, त्रिपुरा सारख्या लोकसंख्येनी लहान असलेल्या राज्यांतील आमदारांच्या एका मताला कमी वेटेज असतं.

उत्तर प्रदेशातील एका आमदाराला 208 इतकं वेटेज असतं तर देशातील प्रत्येक खासदाराला 708 इतके वेटेज असतं.

2. महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचं मूल्य किती?

त्या त्या राज्यातल्या आमदारांचं वेटेज किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या राज्यांची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येनं भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला नंतर परच 1000 नं भागलं जातं. त्यातून जो आकडा उत्तर म्हणून येतो तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचं वेजेट असतं. यासाठी 1971 ची जगगणना आधार मानली जाते.

1971 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या पाच कोटी, चार लाख होती. म्हणजेच 5 कोटी चार लाख भागिले 288 त्यातून येणाऱ्या संख्येला 1000 ने भागल्यानंतर 175 आकडा येतो म्हणजेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या मतांचं मूल्य हे 175 आहे.

भारतात एकूण 776 खासदार आहेत. त्यांचे वेटेज 5 लाख 49 हजार इतके आहे. भारतात विधानसभेतील आमदारांची संख्या 4120 इतकी आहे. त्यांचे वेटेज 5,49,474 इतके आहे. दोन्ही समूहांचे एकत्रित मतदान 10,98,882 इतके आहे. म्हणजेच अंदाजे 11 लाख.

या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर होत नाही.

3. इतर राज्यांतील आमदारांचं मूल्य किती?

उत्तर प्रदेश - 208

केरळ - 152

मध्य प्रदेश - 131

कर्नाटक - 131

पंजाब - 116

बिहार - 173

गुजरात - 147

झारखंड - 176

ओडिशा - 149

4. दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांना सारखीचं मतं मिळाली तर?

याबद्दल भारतीय संविधानात काहीच सांगण्यात आलेलं नाही. भारतीय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडीसाठी 1952 मध्ये कायदा करण्यात आला आहे, त्यातसुद्धा याबद्दल स्पष्टता नाही. अशी स्थिती तापर्यंत उद्भवलेली नाही हेही खरं आहे.

5. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर राजकीय कारकिर्द संपुष्टात येत? पुन्हा निवडणूक लढवता येत नाही?

राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवता येते. संविधानात याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

तसंच कार्यकाळ संपल्यानंतर राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याचा प्रश्न नाही. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर ती व्यक्ती पाहिजे तर राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू शकते.

पण हेही तितकच खरं आहे की देशाचं सर्वेच्च पद भूषवल्यानंतर ती व्यक्ती राज्यपाल, खासदार किंवा आमदार होणं पसंत करणार नाही. कारण ही सर्व पदं राष्ट्रपतीपदापेक्षा कनिष्ठ आहेत.

राष्ट्रपति भवन

फोटो स्रोत, PRESIDENT OF INDIA WEBSITE

6. भारतात सर्व अधिकार पंतप्रधानांकडे असतात मग राष्ट्रपतीपद का महत्त्वाचं?

भारतात असं नाही की सर्वच्या सर्व अधिकार पंतप्रधानांकडे असतात. प्रत्येकाच एक कार्यक्षेत्र आहे. राष्ट्रपतींच्या हातात संपूर्ण कार्यपालिकेचे अधिकार असतात, ज्यांचा वापर ते स्वतः किंवा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करू शकतात.

राष्ट्रपतींची प्रमुख जबाबदारी ही पंतप्रधानांची नियुक्ती आणि संविधानाचं रक्षण करणं आहे. हे काम ते त्यांच्या विवेकाने करतात. कुठलाही आधिनियम त्यांच्या मंजुरीशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. वित्तविधेयक सोडून ते इतर कुठलंही विधेयक पुर्नविचारासाठी संसदेला परत पाठवू शकतात.

7. राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण लढवू शकतं?

राष्ट्रपतीपदाची उमेदार व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्या व्यक्तीचं वय कमीतकमी 35 असावं.

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या सर्व पात्रतांची पूर्तता केलेली असावी.

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सादर करण्यासाठी पन्नास इलेक्टोरल कॉलेज प्रस्तावक आणि पन्नास इलेक्टोरल कॉलेज अनुमदेक गरजेचे असतात.

संघराज्यांच्या कार्यकारी अधिकारींची पूर्तता करणे हे राष्ट्रपतींचं मुख्य कर्तव्य आहे. लष्कराच्या प्रमुखांची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपती करू शकतात.

8. राष्ट्रपतींना पदावरून कसं हटवलं जाऊ शकतं?

राष्ट्रपतींवर महाभियोग चालवून पदच्युत करता येऊ शकतं. यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. या प्रस्तावावर एक चतुर्थांश सदस्यांची सही असणं गरजेचं असतं. त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होते.

हा प्रस्ताव पारित करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतीयांश मतं मिळवण्याची गरज असते. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतीयांश मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला तर राष्ट्रपती पदावरून पदच्युत झाल्याचं मानलं जातं.

राजेंद्र प्रसाद

फोटो स्रोत, Getty Images

9. किती उमेदवार निवडणूक लढवू शकतात?

दोन पेक्षा जास्त उमेदवार ही निवडणूक लढवू शकतात. पण त्यांनी उमेदवारीसाठीचे 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक इलेक्टोरल कॉलेजची पुर्तता करावी ही अट आहे.

10. दयेच्या अर्जावर राष्ट्रपती स्वतः निर्णय घेतात का?

मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती दयेच्या अर्जावर निर्णय घेऊ शकतात. पण मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना नेमका काय सल्ला दिला आहे हे कोर्टातसुद्धा विचारता येऊ शकत नाही.

11. राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे का?

आतापर्यंत डॉ. नीलम संजीव रेड्डी हे एकमेव राष्ट्रपती बिनविरोध निवडले गेले आहेत. तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती आहे जे दुसऱ्यंदा यापदी निवडले गेले होते.

राम नाथ कोविंद

फोटो स्रोत, EPA

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोण आहेत?

रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्याआधी ते बिहारचे राज्यपाल होते. तसंच त्यांनी राजकारणात येण्याआधी सर्वोच्च न्यायालयात वकिलीसुद्धा केली आहे.

वकिली ते खासदारकीपर्यंत वेगवेगळ्या पदांवर आणि क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यातल्या परौंख गावात झाला.

त्याचं शिक्षण कानपूरमध्ये झालंय. आधी ते कॉमर्स ग्रॅज्युएट झाले नंतर त्यांनी कानपूर विद्यापिठातून कयद्याची डिग्री घेतली. 1977 ते 1979 दरम्यान ते दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सराकरचे आधिवक्ता म्हणून कार्यरत होते. 1978 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारचे एडवोकेट-ऑन-रिकॉर्ड म्हणून नियुक्त झाले होते.

1994 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. मार्च 2006 पर्यंत ते राज्यसभे सलग 12 वर्षं खासदार होते.

8 ऑगस्ट 2015 मध्ये बिहारचे राज्यपाल झाले. त्यानंतर ते देशाचे 14वे राष्ट्रपती झाले.

भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती

  • डॉ. राजेंद्र प्रसाद (1884-1963)
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888-1975)
  • डॉ. झाकिर हुसैन (1897-1969)
  • वराहगिरी वेंकट गिरी (1894-1980)
  • डॉ. फखरुद्दीन अली अहमद (1905-1977)
  • नीलम संजीव रेड्डी (1913-1996)
  • ग्यानी झैल सिंह (1916-1994)
  • आर. वेंकटरमन (1910-2009)
  • डॉ. शंकर दयाल शर्मा (1918-1999)
  • के. आर. नारायन (1920 - 2005)
  • डॉ. एपीजे अब्दुल कलाम (1931-2015)
  • प्रतिभादेवी सिंह पाटिल (birth - 1934)
  • प्रणब मुखर्जी (1935-2020)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)