अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? असा आहे आजवरचा प्रवास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी तयार झाली आहे.
त्यांच्या जाण्यानंतर आता उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडण्यात यावं, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची उद्या (31 जानेवारी) दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजेच अजित पवार यांना निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना पक्षाचा उत्तराधिकारी कोण असेल, याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.
"अजित पवारांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे," असं नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, "विधिमंडळाचे नेते आणि उपमुख्यमंत्री ही जागा अजितदादांकडे होती. याबाबत आम्हाला उद्या निर्णय करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही लवकर निर्णय घेऊ. यासाठी आमच्या पक्षाच्या आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय जनभावना लक्षात घेऊन निर्णय करायचा आहे."
"सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केलेली नाही. पण पक्षाचा निर्णय आमदारांचा निर्णय आणि आमची स्वतःचीही भावना आहे की आम्ही योग्य निर्णय केला पाहीजे. आम्हाला सुनेत्रा वहिनींशीही बोलावं लागेल, पार्थ पवार जय पवार यांच्याशी बोलावं लागेल. आमची देखील तशीच भावना आहे. योग्य निर्णय व्हावा अशी इच्छा आहे."
महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "सुनेत्राताईंना हे पद देण्याची मागणी माध्यमांमध्ये आणि अनेक लोकांकडून होत आहे. त्या चूक आहेत असं मला वाटत नाही पण शेवटी उद्याच्या (31 जानेवारी) बैठकीतच हा निर्णय होईल."
"सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या कामांकडे आम्ही लक्ष देतो आहोत. उपमुख्यमंत्री पदाची जागा सुनेत्रा पवारांच्या रूपाने कशी भरता येईल याकडे आमचं लक्ष आहे. उद्याची बैठक ही विधिमंडळ पक्षप्रमुख ठरवण्याची आहे. कदाचित एकमत झालं तर उद्याच्या उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो," असंही भुजबळांनी नमूद केलं.
एकूणातच, राजकीय वर्तुळातून अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण या चर्चेला तोंड फुटलेलं असताना सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
त्यानिमित्ताने पाहूयात, त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास...
राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार सुरुवातीची अनेक वर्षं थेट राजकारणापासून लांब राहिल्या तरी बारामतीच्या प्रचाराची धुरा कायमच त्यांच्याकडे राहिली होती.
मुलगा पार्थ पवार मावळ मधून लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिला त्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय भूमिका बजावायला लागल्या. 2024 मध्ये आधी लोकसभा निवडणुकीत त्या नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्या राज्यसभेत खासदार झाल्या.
त्यांच्या खासदारकीनंतर पवार कुटुंबात एकूण तीन खासदार आणि दोन आमदार झाले. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढे काय? या मुद्द्याची चर्चा होत असताना अजित पवारांकडे असलेली राजकीय खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवावीत आणि नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे दिलं जावं अशी मागणी पुढे येत आहे.
माहेर आणि सासरचा राजकीय वारसा
सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण.
धाराशिवमधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं लहानपण गेलं.
वडील स्वातंत्र्यसैनिक आणि गावचे पाटील असल्याने राजकारण आणि समाजकारणाचा वसा हा तिथूनच आपल्यात आल्याचं सुनेत्रा पवार सांगतात. लोकांची घरी कायम उठबस असल्यामुळे त्यातूनच आपण घडत गेल्याचं त्या नोंदवतात.
पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातून सुनेत्रा आणि अजित पवारांचे लग्न ठरले. 1980 मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीला आल्या. तेव्हा अजित पवारांनीही राजकारणात प्रवेश केलेला नव्हता. अजित पवारांचे राजकारण सुरू झाले आणि सुनेत्रा पवार मात्र सुरुवातीची काही वर्ष घरात रमल्या होत्या.
अजित पवारांना त्यांच्या दुधाच्या व्यवसायात त्या मदत करत होत्या.
1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले. तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले. त्यावेळी देशात कंप्युटर क्रांतीची बुम होती. सुनेत्रांनी कंप्युटर शिकण्याचा आग्रह धरला आणि शिकूनही घेतलं.

फोटो स्रोत, Facebook
पवारांच्या काटेवाडीतून सामाजिक कार्याची सुरुवात
सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती काटेवाडीमधूनच. अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेलं एक गाव दाखवलं. त्यातून प्रेरणा घेऊन काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात झाली.
याबाबत बोलताना सुनेत्रा पवार सांगतात, "मी सर्वपक्षीय लोकांची मीटिंग बोलावली. मी मीटिंग बोलावली म्हटल्यावर काय असेल असं सगळ्यांनाच वाटलं. मी माझा मानस बोलून दाखवल्यावर मात्र सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. लोकांना वाटलं मोठ्या घरच्या बायकांना एक्झिबिशन भरवायचं तशी ग्रामस्वच्छता करायची आहे का? पण मी वारंवार येत राहिले आणि त्यानंतर लोकांनाही याचं गांभीर्य लक्षात आलं."

त्यावेळी काटेवाडीमध्ये 80 टक्के लोकांकडे शौचालयेही नव्हती. त्यातून आणि निर्मलग्राम आणि मग ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.
यानंतर त्यांनी राज्यातील 86 गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचे नेतृत्व केले. या माध्यमातून त्यांनी 'निर्मलग्राम स्वयं सहायता' चळवळ राबवली. काटेवाडी निर्मलग्राम तर झालेच शिवाय त्याचे मॉडेल आणि इको व्हीलेज म्हणूनही त्यांनी रुपांतर केले. याच्या बरोबरीनेच बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी 'प्रोजेक्ट मेघदूत'ही राबवला.
परिसरातील स्त्रियांना रोजगार मिळण्यासाठी बारामती मध्ये टेक्सटाईल पार्कला सुरुवात झाली. जवळपास 15 हजार महिला या टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात. या टेक्सटाईल पार्कचं चेअरमनपद 2006 पासून सुनेत्रा पवारांकडे आहे. याच्या बरोबरीनेच त्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर देखील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या विद्या प्रतिष्ठान संस्थेचं काम सुनेत्रा एकहाती सांभाळतात.
एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन करून त्यांनी पर्यावरण क्षेत्रात देखील काम सुरू केलं. या संस्थेच्या माध्यमातून त्या जलसंधारण आणि झाडं लावण्याची कामं करतात. पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचं कामसुद्धा त्यांची ही संस्था करते.
2019 ची निवडणूक आणि कौटुंबिक वाद
2019 च्या निवडणूकीत पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आणि पवार कुटुंबातल्या वादाबद्दल चर्चेला सुरुवात झाली.
पार्थ यांच्या निवडणूक लढवण्याला विरोध असून त्यावरुन पवार कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 'पुणे मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं.
या मुलाखतीत सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या, " दरवेळी विधानसभेचा प्रचार मी, माझी नणंद (सुप्रिया सुळे) आणि माझी मुलं मिळून करतो. अजित पवार प्रचाराला दोनदा येतात. बारामतीतल्या लोकांना त्यांनी काय केलं आहे, हे सांगण्याची गरज नाही. पवारांमुळे आज बारामती इथपर्यंत पोहोचली आहे. आत्ताची (2019) ची परिस्थिती वेगळी आहे. कारण पवारांना टार्गेट केलं जात आहे, केस दाखल केल्या आहेत. कोणतेही आरोप सिद्ध होत नाहीयेत. याला लोक उत्तर देतील.
मी कोणत्याही वादाच्या केंद्रस्थानी कधीच राहिले नाही. मला काही हवं असतं तर ते मी मागू शकले असते. माझ्या मुलांनी राजकारणात यावं वाटलं असतं तर मी त्यांना त्यासाठी तयार केलं असतं. पण व्यक्तिशः मला राजकारणात फारसा रस नाही."
बारामतीच्या 'वहिनी' आणि राजकारण
सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार जरी बारामतीमध्ये सक्रिय असल्या तरी राजकारणाशी मात्र त्यांचा थेट संबंध येत होता तो अजित पवारांसाठी केलेल्या निवडणूक प्रचारच्या किंवा इतर वेळच्या कामांच्या निमित्ताने.
दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकासकामांकडे लक्ष देत असले तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी मात्र बहुतांशी सुनेत्रा पवारच निभावत असायच्या. यामुळेच बारामती परिसरात 'वहिनी' ही त्यांची ओळख बनली.

फोटो स्रोत, Facebook/Sunetra Pawar
राजकारणात मात्र त्या यापूर्वी थेट सक्रिय नव्हत्या. पण अजित पवारांसाठीच्या बारामतीच्या प्रचाराचे नियोजन आणि दौरे मात्र बहुतांश वेळा त्याच करत असत. गावभेटी, बैठका दौरे आणि महत्वाच्या लोकांना भेटणे या सगळ्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची.
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे राज्यभर प्रचार करत असताना प्रचाराची सुरुवात आणि समारोप यासाठी बारामतीमध्ये येणार आणि बाकी वेळी कुटुंब प्रचारात उतरणार असं समीकरण असायचं.
पक्ष आणि कुटुंबातील फूट
पण पार्थ पवारांच्या निवडणूकीत उतरण्याच्या निमित्ताने मात्र पवार कुटुंबात वाद असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.
पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी म्हणून सुनेत्रा पवार आग्रही होत्या अशी चर्चा होती. त्याच वेळी पवारांचे दुसरे नातू आणि राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहित पवार यांचाही राजकारणात प्रवेश झाला होता.

फोटो स्रोत, Facebook/Sunetra Pawar
आधी जिल्हा परिषद सदस्य आणि मग कर्जतमधून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी रोहित पवारांची आई सुनंदा पवार आणि पार्थ पवारांची आई सुनेत्रा पवार यांच्यात वाद सुरु असल्याचा दावा केला जात होता. पण त्यांनी मात्र कायमच हा दावा फेटाळून लावला.
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून मात्र ही फूट फक्त पक्षातलीच नव्हती तर कुटुंबातलीही होती हे स्पष्ट झालं.
थेट निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली आणि सुनेत्रा पवार सक्रीय झाल्या. सुरुवात झाली ती वेगवेगळ्या भेटीगाठी आणि कार्यक्रमांमधून. नंतर त्यांचा प्रचाररथ बारामती मधून फिरायला लागला
त्यानंतर बारामतीमध्ये निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी असणार हे स्पष्ट झालं. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या.
मतदारसंघासाठी महत्वाचे मानले जाणारे भोरचे थोपटे असतील की दौंडचे कुल कुटुंबीय या सगळ्यांचाच भेटी सुनेत्रा पवारांनी घेतल्या. प्रत्येक ठिकाणी 'दादांची पत्नी म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलंतच पण सुनेत्रा वहिनी म्हणून आपलंसं केलंत' अशी भावनिक साद घालत त्यांनी भाषणं केली.
आव्हानात्मक निवडणूक
पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक सोपी मात्र नक्कीच नव्हती. त्यांच्यासमोर आव्हान होतं ते नणंद सुप्रिया सुळेंचं.
गेली पंधरा वर्षं खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंचं संसदेतलं काम कायम वाखाणलं गेलं आहे. पण गावात लोक संपर्काच्या बाबत मात्र त्या काहीशा कमी पडत असल्याची टीकाही त्यांच्यावर होत होती.
सुनेत्रा पवारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे विरोधात उभं राहिलेल्या कुटुंबाचंच. एकीकडे भावनिक आव्हान करणारे अजित पवार, तर दुसरीकडे विरोधात बोलणारे अजित पवारांचेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवार, असं चित्र बारामती मतदारसंघात दिसले.

फोटो स्रोत, Facebook/Sunetra Pawar
पवार कुटुंबापैकी अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे एकत्र प्रचार करताना दिसले. दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असल्याचं दिसून आलं.
सुनेत्रा पवारांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून शरद पवार वयाच्या या टप्प्यावरही इतरांना संधी देत नाहीत हा मुद्दा आणला गेला, तर वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवारांवर ही वेळ आणली असा मुद्दा सुप्रिया सुळेंच्या प्रचारात वापरला गेला.
त्यामुळेच सुनेत्रा पवार मतदारांना भावनिक आवाहन करताना दिसल्या.
"बारामती मधला प्रत्येक व्यक्ती हा आम्हा लोकांच्या कुटुंबातला सदस्य आहे. त्यामुळे कुठं गेलं तरी तेवढंच प्रेम मला देता. हे प्रेम खूप मोठं आहे माझ्यासाठी."
या निवडणुकीच्या काळात शरद पवारांनी त्यांच्यावर 'बाहेरून आलेल्या' अशी टीका केली होती. त्यावेळी त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा भावूक झाल्या होत्या.
या निवडणूकीत पराभव झाला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्या जागेवर 13 जून 2024 ला उमेदवारी अर्ज दाखल करत नंतर सुनेत्रा पवार खासदार झाल्या.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घरातील लग्नांच्या निमित्ताने सुनेत्रा पवार कुटुंबा समवेत दिसल्या. त्यानंतर आधी महापालिका आणि नंतर जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र दिसलं.
जिल्हा परिषद निवडणूकीत सर्व उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढत होते. या निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार बारामती मध्ये येत होते. त्यावेळेस विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











