बजरंग दलाच्या शिबिरात 'त्रिशूल दीक्षा' आणि एअरगनचं प्रशिक्षण, नेते म्हणाले... #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. बजरंग दलाच्या शिबिरात 'त्रिशूल दीक्षा' आणि एअरगनचं प्रशिक्षण?

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो आणि व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात कार्यकर्त्यांच्या हातात काही शस्त्र असून ते सराव करताना दिसत आहेत.

कार्यकर्त्यांना बजरंग दलाकडून 'त्रिशूल दीक्षा' आणि एअरगनचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पोन्नमपेट येथे साई शंकर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये 5 ते 11 मे दरम्यान बजरंग दलाकडून 'शौर्य' शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचे समजतं. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावर यासंदर्भातले फोटो व्हायरल झाल्यानंतर संबंधित शिबीर मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आयोजित करण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण बजरंग दलाकडून दिलं जात आहे. दलाचे नेते रघू सकलेशपूर यांनी सोमवारी (16 मे) दावा केला ही हे शिबीर कार्यकर्त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी होतं.

ते म्हणाले, "5 मे ते 11 मे दरम्यान कोडगू जिल्ह्यातील पोन्नमपेट याठिकाणी एका खासगी शाळेत बजरंग दलाने कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यात 166 जण सहभागी झाले होते. मानसिक आणि शारीरिक लवचिकता सुधारण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. पहाटे पावणे पाच ते रात्री सव्वा दहा या वेळेत प्रशिक्षण पार पडलं."

"बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एअरगन आणि 'त्रिशूल दीक्षा'चं प्रशिक्षण घेणं आर्म अॅक्टचं उल्लंघन ठरत नाही." असा दावा रघू सकलेशपूर यांनी केला आहे.

तसंच इंग्रजी वृत्तपत्र 'द टेलीग्राफ'शी बोलताना बजरंग दलाने असंही स्पष्ट केलं की, "याठिकाणी कुठेही शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही आणि एअरगनमधून एकही गोळी झाडलेली नाही."

2. केतकी चितळेच्या अडचणी वाढणार?

अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर तिच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पोलिसांनी तपासासाठी केतकीचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे.

सोमवारी (16 मे) ठाणे पोलीस केतकीच्या कळंबोली येथील घरात पोहोचले. तिच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी तिची इलेक्ट्रॉनीक उपकरणं जप्त केली असून सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास केला जाणार आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीविरोधात ठाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

ठाणे पोलीस आणि सायबर पोलिसांची तीन पथकं या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही पोस्ट करण्यामागे केतकीचा काय हेतू होता याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

3. शिल्लक राहणारी मंत संभाजीराजेंना देऊ - शरद पवार

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या संघटनेची घोषणा केल्यानंतर राज्यसभेच्या जागेसाठी अपक्ष म्हणून उभं राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

राज्यसभेतील सहा जागांसठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यात भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याचं संख्याबळ पक्षांकडे आहे.

संभाजीराजे यांना अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदन आमदारांची आणि निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

नांदेड येथे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद आहे यावर अवलंबून आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही. त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे 10.12 मतं जादा शिल्लक राहतात. शिवसेना आणि काँग्रेसचीही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे उर्वरित मतं आम्ही सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना देऊ."

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मतं शिल्लक राहतात. तसंच पाठिंबा दिलेल्या आमदारांचे संख्याबळ मिळून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मतं शिल्लक राहतात.

4. 'बाबरी पडली तेव्हा शिवसैनिक तिथे होते' - नारायण राणे

बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळी तिथे होते की भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी होते यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या वादात उडी घेतली आहे.

मी तिथे गेलो नव्हतो, पण शिवसैनिक बाबरी पडली तेव्हा तिथे होते असा खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे तेव्हा अदृश्य होते, ते राजकारणात नव्हते असंही नारयण राणे म्हणाले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "मी स्वत: त्या ठिकाणी गेलो नाही कारण मला गर्दीत चेंगरुन जाण्याची भीती होती. बाबरी पडताना त्या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होते. पण उद्धव ठाकरे त्या वेळी राजकारणातही नव्हते, ते अदृश्य होते."

5. आसाममध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, भूस्खलनामुळे 3 जणांचा मृत्यू

देशात अनेक राज्यांमध्ये तापमान प्रचंड वाढलं असताना आसाममध्ये मात्र मुसळधार पावसामुळे सहा जिल्ह्यातील जवळपास 57 हजार नागरिकांना फटका बसला आहे. तसंच भूस्खलनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

त्रिपुरा, मिझोरम आणि दक्षिण आसामशी जोडलेल्या 25 हून अधिक रेल्वे भूस्खलनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

200 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी शिबीर सुरू केली आहेत. कछार भागात सर्वाधिक नुकसान झाल्याचं बोललं जात आहे.

याठिकाणी निमलष्करी दल, अग्निशमन, आपत्कालीन व्यवस्था, एसडीआरएफने आतापर्यंत 2200 हून अधिक लोकांना वाचवलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)