गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार, मास्क घालणं ऐच्छिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीतमहाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2 एप्रिलपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध हाटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

"पण, याचा अर्थ आता एकदम बिनधास्तपणे वावरावं असा होत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा. मास्क वापरणं ऐच्छिक असेल," असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच मास्क लावला नाही तर आकारण्यात येणारा दंड आता रद्द करण्यात आल्याची माहत्त्वपूर्ण माहिती टोपे यांनी दिली आहे.

यामुळे आता गुढीपाडवा, रमजानचा महिना आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण उत्साहानं साजरा करू शकणार आहोत, असं टोपे म्हणाले आहेत.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, "आज मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.

"गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्साहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा."

शिवसेना नेते आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटलं की, "आज मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी कोरोनाचे निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडवा, रमजान आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करू.सर्वाना शुभेच्छा."

उद्धव ठाकरेंचं आवाहन

मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं कोरोना प्रतिबंधक लस घेणं आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसंच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळातील सेवेबद्दल डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

तर महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी म्हटलं की, "मास्क घालणं सक्तीचं नाही पण आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने चांगलं आहे.

"ज्या देशांमध्ये लसीकरण कमी आहे तिथे कोरोना पुन्हा वाढतेय. पण आपल्याकडे लसीकरण मोठ्याप्रमाणात झालंय. पुरेशा आरोग्य सुविधा तयार झाल्यात. त्यामुळे टास्कफोर्सनेही मास्क ऐच्छिक करण्याची शिफारस केली होती."

दरम्यान, आरोग्य विभागात वय वर्षं 40 ते 50 या वर्षांमधील 22 लाख शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी दोन वर्षांत एकदा 5 हजारांच्या मर्यादेपर्यंत त्यांच्या आरोग्यासाठीच्या आवश्यक चाचण्या करण्यासाठीची मान्यता देण्यात आली आहे. 50 ते 60 या वर्षाच्या दरम्यानच्या कर्मचाऱ्यांना अशा चाचण्या करणं बंधनकारक केलं आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

तसंच कोरोना काळात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीतील सगळे गुन्हे मागे घेणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)