नरेंद्र मोदी सुरक्षा त्रुटी प्रकरणात सीमेपलिकडील दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय - सॉलिसीटर जनरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षा त्रुटी प्रकरणात सीमेपलिकडील दहशतवाद्यांचा हात आहे का, असा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात NIA च्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येऊ शकते, असं भारताचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीप्रकरणी आज (7 जानेवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान तुषार मेहता बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरयाणाच्या उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्याचा रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधानांची सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असं मत या प्रकरणात याचिका दाखल करणारे वकील मनिंदर सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर फजिती झाल्याचं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं.

तर पंजाब ही घटना खूपच गांभीर्याने घेत असल्याचं अॅटर्नी जनरल डी. एस. पटवलिया यांनी यावेळी सांगितलं.

जबाबदार कोण ते शोधलं जाईल - अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतल्या त्रुटींना 'जबाबदार कोण हे शोधलं जाईल' आणि 'असा निष्काळजीपणा सहन करता येणार नाही' असं केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. गृह मंत्रालयाने याबाबतचा सविस्तर अहवाल मागवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीमुळं त्यांना सभेला जाता आलं नसल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

''हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर पंतप्रधान मोदी यांचा ताफा एका उड्डाण पुलावर पोहोचला. पण काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचं त्यावेळी समजलं. त्यामुळं पंतप्रधानांना उड्डाण पुलावर 15 ते 20 मिनिटं अडकून राहावं लागलं. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती,'' असं गृह मंत्रालयानं म्हटलं.

गृह मंत्री अमित शहा यांनी याबद्दल ट्वीट केलंय. यात त्यांनी म्हटलंय, "पंजाबातल्या आजच्या सुरक्षा त्रुटींबद्दल गृहखात्याने सविस्तर अहवाल मागवलेला आहे. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सुरक्षेविषयी असा निष्काळजीपणा अस्वीकार्ह आहे. आणि याची जबाबदारी कोणाची ते ठरवलं जाईल."

तर पंतप्रधानांच्या भेटीदरम्यानच्या सुरक्षेतल्या त्रुटींची चौकशी करणार असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटलंय.

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी पूर्ण काळजी घेण्यात आली होती असंही चन्नी यांनी म्हटलंय. कोरोना संसर्गग्रस्ताच्या संपर्कात आल्याने आपण पंतप्रधानांचं स्वागत करण्यास जाऊ शकलो नाही आणि त्यांना परतावं लागलं याचा आपल्याला खेद वाटत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटलंय.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेतील या चुकीमुळं मोदी यांनी ताफा वळवत पुन्हा बठिंडाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आरोप केले. 'पंतप्रधानांचा जीव धोक्यात घातला गेला आणि पंजाब पोलिस मूकदर्शक बनून पाहत राहिली,' असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.

इराणी यांनी म्हटलं, "काँग्रेसचे खुनी मनसुबे अपयशी ठरले आहेत. आम्ही अनेकदा म्हटलं आहे की, तुम्हाला मोदींचा द्वेष वाटत असेल, पण त्याचा राग देशाच्या पंतप्रधानांवर काढू नका. काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल."

दुसरीकडे काँग्रेसनं म्हटलं की, पंतप्रधान सगळ्यांचे आहेत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे.

...तिथून पाकिस्तानची सीमा केवळ 10 किलोमीटरवर- कॅप्टन अमरिंदर सिंह

या सभेला कॅप्टन अमरिंदर सिंह हेदेखील पोहोचले होते. पंतप्रधान मोदी या सभेला न पोहोचल्यामुळे त्यांनीच सभेला संबोधित केलं.

अमरिंदर यांनी मोदींच्या सुरक्षेमध्ये राहिलेल्या त्रुटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर निशाणा साधला.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यासंबंधी ट्वीटही केलं आहे. त्यांनी म्हटलं, की पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेचं हे अपयश आहे. विशेषतः हे पंजाबच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं अपयश आहे. जिथून पाकिस्तानची सीमा केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे, अशाठिकाणी तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षित रस्ता देऊ शकत नाही? तुम्हाला सत्तेवर राहायचा काही अधिकार नाही. तुम्ही सत्ता सोडायला हवी.

गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल

या विषयाची गंभीर दखल घेतली असून, पंजाब सरकारकडे याबाबत अहवाल मागवण्यात आला असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाब काँग्रेस सरकारवर या मुद्द्यावरून आरोप केला आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं नड्डा म्हणाले, असं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.

पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांनी एसपीजीला पंतप्रधानांच्या ताफ्याच्या मार्गात काहीही अडथळा येणार नाही, असं आश्वासन दिलं होतं, असं नड्डा म्हणाले. तरीही आंदोलकांना पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याच्या मार्गात येऊ दिलं ही सुरक्षेतील मोठी त्रुटी होती, असं ते म्हणाले. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे या प्रकरणी फोनवरूनदेखील बोलले नाहीत, असंही नड्डा यांनी म्हटलं. लोकांना पंतप्रधानांच्या सभेत जाण्यापासून रोखावं असे निर्देश पंजाब पोलिसांना दिले होते, असा आरोपही त्यांनी केला. पीआयबीनं या संपूर्ण प्रकरणावर गृह मंत्रालयाचं निवेदन जाहीर केलं आहे.

''आज सकाळी पंतप्रधान मोदी बठिंडामध्ये उतरले आणि हेलिकॉप्टरद्वारे ते हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला जाणार होते.

पाऊस आणि कमी दृश्यमानता असल्यानं पंतप्रधानांनी 20 मिनिटं वातावरण स्वच्छ होण्याची वाट पाहिली. पण वातावरण स्वच्छ झालं नाही म्हणून अखेर त्यांनी, रस्ते मार्गे शहीद स्मारकापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. पंजाब पोलिसांच्या महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबात दुजोरा मिळाल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला,'' असं त्यात म्हटलं होतं. ''हुसैनीवालापासून 30 किलोमीटर अंतरावर मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावर पोहोचला तर काही आंदोलकांनी रस्ता रोखल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं पंतप्रधान 15 ते 20 मिनिटं या उड्डाण पुलावर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती.''

पंतप्रधान मोदींचा ताफा रोखण्याच्या घटनेत सुरक्षेत गंभीर त्रुटी झाल्याचं, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले. तर पंतप्रधानांना फिरोजपूरच्या सभेत जाण्यास शेतकऱ्यांनी रोखल्याच्या घटनेवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे.

''पंजाबच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना जाहीर करण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा आंदोलकांनी रस्त्यातच अडवला ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. ही सुरक्षेतील गंभीर चूक आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा आणखी खराब बनवला आहे," असं नेते म्हणाल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.

काँग्रेसचं प्रत्युत्तर

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

त्यांनी म्हटलं की, "प्रिय नड्डा जी, सभा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं. जर तुमचा विश्वास नसेल तर हे पाहा. वायफळ वक्तव्यं करण्यापेक्षा स्वतःच्या शेतकरी विरोधी मानसिकतेचा स्वीकार करून आत्मपरीक्षण करा. पंजाबच्या लोकांनी सभेपासून दूर राहात अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)