You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितेश राणे 'नॉट रिचेबल'? अडचणींमध्ये वाढ होणार?
संतोष परब हल्ला प्रकरणी अटक होण्याची शक्यता निर्माण होताच भाजप आमदार नीतेश राणे अनरिचेबल झालेत. आता शिवसेना पूर्वीसारखी वाघ राहिलेली नाही, आता त्यांना डरकाळ्या नाहीत तर म्यांव-म्यांवच अधिक शोभून दिसतं असं म्हणणारे नितेश राणेच अनरिचेबल झाल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.
राणे कुटुंबीय आणि वाद हे समीकरण आता महाराष्ट्राला काही नवीन नाही. त्यातही आमदार नितेश राणे हे आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात.
तसंच, अनेकदा त्यांच्या तोंडून किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून वादग्रस्त विधानंही होतात, ज्यामुळे त्यांचे विरोधक त्यांच्यावर तुटून पडतात.
मात्र, आता नितेश राणे ज्या वादात सापडले आहेत, त्यात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताच निर्माण झालीय. आताच्या वादाचं कारण ठरलीय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक.
कणकवली तालुक्यातील कारंजेमध्ये संतोष परब या शिवसैनिकावर हल्ला झाला. संतोष परब हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख आहेत.
उदय सामंत म्हणाले...
भाजपाचे आमदार नितेश राणे कालपासून नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.
या संवादात उदय सामंत म्हणाले, नितेश राणे यांच्या अटकेचे प्रकरण आणि निलंबनाच्या मागणीचे प्रकरण वेगवेगळे आहे. कोकणचे आयजी आणि गृहमंत्री लक्ष देत आहेत. 2 वाजता या प्रकरणावर सुनावणी आहे. ज्यांची ज्यांची यात नावं आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.नितेश राणे नॉट रिचेबल आहे हे मी सुद्धा सगळीकडे वाचलं आहे. पोलीस तपास करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रकरणात परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत."
उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना म्हणाले, " मी आणि अजित पवारही दोन दिवसांपूर्वी तिथे होतो. पण आम्ही कोणताही दबाव आणलेला नाही. आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो होतो. आमदारांनी कसं वागलं पाहिजे हे अजित दादांनी सांगितलं. उद्धव ठाकरे, फडणवीस, अजित पवार सगळ्यांचं एकमत होतं की नम्रपणे वागलं पाहिजे. म्हणून काल कारवाईवर चर्चा झाली."
संतोष परब यांच्या मोटर सायकलला मागून इनोव्हा गाडीनं ठोकरलं. तसंच, त्यांच्या छातीवर धारदार चाकूनं हल्ला केला गेला. हल्लेखोरांनी घटनास्थवरून केलेल्या फोनवर नितेश राणेंचं नाव घेतल्याचा आरोप तक्रारीत संतोष परबांनी केलाय.
आपल्याला या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितेश राणेंनी ट्विटरवरून केलाय.
या प्रकरणी सिंधुदुर्गातील शिवसेनाही आक्रमक झालीय. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पण नितेश राणे हे वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. याआधाही आपल्या वक्तव्य किंवा कृत्यांमुळे ते वादात अडकले आहेत. त्यापैकी निवडक सात वाद आपण जाणून घेणार आहोत.
आपण कुत्रे, मांजरी या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करत नाही - अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता आमदार नितेश राणे यांना सुनावलं आहे. अजित पवार म्हणाले, "सदस्यांचं वर्तन विधिमंडळाला शोभेल असं असावं. लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात, तेव्हा तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. आपण कुत्रे, मांजरी या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करत नाही."
अजित पवार पुढे म्हणाले, "या विधीमंडळाने उच्च स्थितीचा इतिहास रचला आहे. सर्व सदस्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. विधीमंडळातील सदस्य कसा वागतो हे बघितलं जातं. गेल्या काही वर्षांपासून काही सदस्यांच्या वर्तणूकीमुळे प्रतिमा काही प्रमाणात ढासळली आहे. ती अधिक ढासळू नये यासाठी सभागृहातल्या सदस्यांनी सभ्य वर्तणूक केली पाहीजे."
"जर आमदारांनी काही चुकीची वर्तणूक केली तर सदस्यांना तास बाहेर ठेवा. किंवा 1-2 दिवस निलंबित करा. हा अधिकार अध्यक्षांचा आहे. एकदम 12-12 महिने बाहेर पाठवू नका. एवढं करा," असंही अजित पवार म्हणाले.
1) नितेश राणेंच्या 'म्याव म्याव'चे विधिमंडळात पडसाद
चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारविरोधात भाजप आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. त्यावेळी आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करत असताना, तिथं पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून 'म्याव म्याव' असं म्हटलं.
नितेश राणे यांच्या या विधानावरून आज (27 डिसेंबर) विधानसभा सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पुढे येत घोषणाबाजी सुरू केली.
2) अभियंत्यावर चिखल ओतला
खरंतर वादग्रस्त विधानं करणं हे नितेश राणेंबाबत नवीन नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी नितेश राणेंची एक कृती चांगलीच चर्चेत आली होती. ती म्हणजे सिंधुदुर्गातील अभियंत्याच्या अंगावर चिखल ओतणं.
झालं असं होतं की, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे पडल्यानं आणि चिखल उडत असल्यानं आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर संताप व्यक्त केला होता.
नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या घटनेचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं. अत्यंत चुकीची कृती असल्याचं राणे त्यावेळी म्हणाले होते.
3) उद्धव ठाकरेंना 'पनौती' म्हटलं
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून 'पनौती' सुरू झाल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली होती.
"उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात 2020 व 2021 मध्ये चक्रिवादळ. 2020 व 2021 मध्ये कोरोना मृतांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर, अजूनही वाईट गोष्टी सुरूच आहेत. सर्व वाईटच होतंय," असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी ट्विटरवरून केलं होतं.
"पनौतीयोंका बाप है ये बॉस," असं नितेश राणे याच ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं होतं.
4) आदित्य ठाकरे यांचा 'पेंग्विन' म्हणून उल्लेख
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नितेश राणे हे अनेकदा 'पेंग्विन' म्हणून उल्लेख करतात. शिवसैनिकांचा अशा उल्लेखांमुळे राणे कुटुंबीयांवर राग दिसून येतो.
मुंबईतील भायखळा प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांची मानली जाते. त्यामुळे त्याआधारे नितेश राणे हे आदित्य ठाकरेंवर टीकेदरम्यान कायम 'पेंग्विन' शब्दाचा उल्लेख करतात.
कोरोना काळात पेंग्विनच्या देखभालीवर खर्चाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर नितेश राणे यांनी याच शब्दाचा उल्लेख करत आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता.
5) रामदास कदमांना 'कुत्रा' म्हटलं..
"नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर भाजप झालं. आता आठवलेंचा पक्ष बाकी आहे," अशी टीका रामदास कदम यांनी डिसेंबर 2018 मध्ये केली होती.
या टीकेला उत्तर देताना नितेश राणे यांनी रामदास कदम यांना 'कुत्रा' म्हटलं.
नितेश राणे यांनी ट्विटवरून म्हटलं की, "स्व. मान. बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे. रामदास कदमांच्या रूपात. सतत भोकत असतो. त्याला हे माहित नाही. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत."
6) 'सोनिया गांधीसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा'
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य सरकारवर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
"मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे," असं राणे यांनी म्हटले.
"नुसतं ठाकरे लावलं म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको," असंही नितेश राणे यांनी म्हटले.
7) नितेश राणेंवर जेव्हा शब्द मागे घेण्याची वेळ आली...
यंदा पावसाळी अधिवेशनावेळी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.
पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना, "आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल," असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.
त्यानंतर नितेश राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांनी ट्वीट करून आपण शब्द मागे घेत असल्याची माहिती दिली. तसंच, कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नसल्याचंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)