You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितेश राणेः आदित्य ठाकरे यांचं 'म्यांव म्यांव' अशा आवाजात स्वागत का झालं?
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेत येत असताना आज विधिमंडळांच्या पायऱ्यांवर 'म्यांव म्यांव' असा आवाज काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांचे आमदार आंदोलन करत असताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे जवळ येताच 'म्यांव म्यांव' असा आवाज काढला.
याबद्दल विचारले असता नितेश राणे म्हणाले, "ज्याला जी घोषणा सूट होते तीच द्यायची असते. आता शिवसेनेच्या वाघाचं मांजर झालंय. डरकाळीचे दिवस गेले. त्यामुळे आता म्यांव म्यांव घोषणा दिल्या."
"जर मुख्यमंत्री आजारी असले तर ऑफिशियल बुलेटिन काढायला हवं. ते आजारी असतील एवढी गुप्तता का? गुप्तता बाळगल्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांचा स्वतः सोडून कोणावरही विश्वास नाही, त्यामुळे ते कोणाकडेही चार्ज देत नाहीत," असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपदासाठी विरोधी पक्षाने सुचवले रश्मी ठाकरेंचे नाव, त्यावरून का झाला गदारोळ?
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे असं विरोधी पक्षाने म्हटल्यावर वातावरण तापले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांच्या बैठकीचं नेतृत्व मुख्यमंत्री करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र मुख्यमंत्री या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मार्गदर्शन केले आणि सत्ताधारी आमदारांशी अधिवेशनातील विषयांवर चर्चा केली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का? हा प्रश्न वारंवार विचारण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पदभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या पदाचा भार दुसऱ्या व्यक्तीकडे का देत नाही असा प्रश्न विचारला आहे. त्याचप्रमाणे काही नावेही सुचवली आहेत.
विरोधी पक्षातील नेत्यांनी यासाठी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही नाव सुचवले आहे. भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीपदाबाबत वातावरण मुद्दाम तापवत आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
आदित्या ठाकरेंना धमकी
उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (23 डिसेंबर) चांगलाच गाजला. आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या जयसिंह राजपूत याला कर्नाटकातील बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे.
या धमकी प्रकरणाचं कनेक्शन कर्नाटकात असल्यामुळं याचं आणखी काही कनेक्शन आहे का, याचा शोध घेण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या जयसिंह राजपूत याला कर्नाटकातील बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी बेंगळुरूतून त्याला अटक केली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फोन लागला नाही म्हणून त्यांना मेसेजद्वारे धमकी दिली होती.
तूने सुशांत सिंह राजपूत को मारा, अगला नंबर तेरा है' अशा प्रकारची धमकी आदित्य ठाकरेंना देण्यात आली होती. या धमकीनंतर आदित्य ठाकरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)