नागालँडमध्ये 11 नागरिक ठार, महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश

नागालँडमध्ये झालेल्या एका घटनेमध्ये अनेक नागरिक ठार झाले आहेत. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या परिसरात नागालँडमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणाचा तपास स्टेट क्राईम पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय एसआयटी आणि स्टेट क्राईम पोलीस स्टेशन यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.

तपास एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश नागालँडचे मुख्य सचिव जे. आलम यांनी दिले आहेत.

ओटिंगमधील मॉन याठिकाणी झालेल्या या दुर्घटनेमध्ये 11 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आमित शाह आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

घटना नेमकी कशामुळं घडली हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, सुरक्षा दलांची एक मोहीम सुरू असताना चुकून रहिवासी नागरिक मारले गेल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.

या घटनेची उच्तस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री नेफियू रियो यांनीही दिलं आहे.

उच्चस्तरीय एसआयटीद्वारे चौकशी

नागालँडच्या ओटिंगयेथील मॉनमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेनं दुःखी झाल्याचं अमित शाह यांनी ट्विटर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.

"या घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी या घटनेची उच्चस्तरीय विशेष तपास पथकाच्या (SIT) माध्यमातून चौकशी केली जाईल," असं अमित शाह म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे शांतता राखण्याचे आवाहन

निरपराध नागरिकांचे जीव घेणारी ही दुर्दैवी घटना अत्यंत निषेधार्ह आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी व्यक्त केली.

रियो यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय एसआयटी मार्फत चौकशी करून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

बंडखोरांच्या हालचालींबाबत मिळाली होती माहिती

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार मॉन जिल्ह्यातील तिरूमध्ये बंडखोरांच्या हालचालींसंदर्भात खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे एक ऑपरेशन करण्यात येत होतं.

या प्रकरणातील लोकांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय कोर्ट ऑफ इनक्वायरी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

नागालँडमध्ये लष्कराच्या ऑपरेशनमध्ये सामान्य नागरिकांच्या मृत्यूमुळं तणाव

नागालँडमध्ये लष्कराच्या ऑपरेशनमध्ये सामान्य नागरिकांच्या मृत्यूमुळं तणाव पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार अतिरेक्यांच्या विरोधातील मोहिमेदरम्यान सामान्य नागरिकांनी प्राण गमावले.

मोन परिसर हा नागा समुगाच्याच्या एनएससीएन (के) आणि उल्फाचा बालेकिल्ला समजला जातो.

ही घटना राज्यातील सर्वात प्रसिद्ध "हॉर्नबिल फेस्टिव्हल"च्या तोंडावर घडली आहे. या घटनेसाठी अनेक राजदूत सध्या राज्यात आलेले आहेत. एएनआय या वृत्त संस्थेनं आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं या घटनेत एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)