Mahatma Gandhi-Nathuram Godse: महेश मांजरेकर बनवणार नथुराम गोडसेवर सिनेमा

महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या दिवशीच, त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर चित्रपट तयार करण्याची घोषणा करण्यात आली.

वास्तव, नटसम्राट असे एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट तयार करणारे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

महेश मांजरेकर यांनी काल (2 ऑक्टोबर) एक टीझर पोस्टर रिलीज करत चित्रपटाची घोषणा केली आहे. या पोस्टरवर नथुराम गोडसेकडून महात्मा गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

हिंदुत्ववादी संघटना किंवा विचारसरणीच्या माध्यमातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलं जात असल्याचे आरोप गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यात महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

हृदयाच्या जवळ असलेली गोष्ट

महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीप सिंग आणि राज शांडील्य यांच्यासह चित्रपट सादर करत असल्याची घोषणा केली आहे.

'आजपर्यंत कुणीही सांगायचं धाडस केलं नाही, अशा गोष्टीसाठी सज्ज व्हा,' अशा आशयाची पोस्ट करत मांजरेकरांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली.

"नथुराम गोडसे यांची गोष्ट कायम माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहिलेला आहे. अशा प्रकारचा चित्रपट करण्यासाठी प्रचंड धाडस गरजेचं असतं," असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

"मला परखड भाष्य करणारे विषय आणि कसलीही तडजोड न करता त्याची मांडणी केलेले चित्रपट नेहमीच आवडतात."

"महात्मा गांधींची हत्या केलेला व्यक्ती याखेरीज लोकांना गोडसेंबद्दल फार काही माहिती नाही. मात्र ही गोष्ट सादर करताना आम्ही कुणाचं उदात्तीकरण करणार नाही किंवा कुणाच्या विरोधातही काही बोलणार नाही. योग्य आणि अयोग्य याचा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडू," असं मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

'हीच योग्य वेळ'

निर्माते संदीप सिंग यांनीदेखील सुरुवातीपासूनच या विषयावर चित्रपट तयार करण्याची इच्छा होती, असं म्हटलं आहे.

नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्याबाबतच्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. सिनेमाच्या रुपानं वस्तुस्थिती मांडणारी गोष्ट सादर करण्याचा हेतू असल्याचं संदीप सिंग म्हणाले.

आजच्या पिढीला इतिहासातील विस्मरणात गेलेल्या या पात्रांची माहिती व्हावी, म्हणून सिनेमाच्या रुपानं ती पात्र समोर आणणार असल्याचं ते म्हणाले.

"अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या गोष्टींना प्रोत्साह मिळत असलेल्या काळात आपण सध्या आहोत. त्यामुळं चित्रपटासाठी हा योग्य वेळ असल्याचं आम्हाला वाटलं," असं मत निर्माते राज शांडील्य यांनी मांडलं.

आव्हाड म्हणाले कोण महेश मांजरेकर?

महेश मांजरेकरांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

"महेश मांजरेकर कोण आहेत, त्यांचं भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये काय योगदान आहे?" असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

लोकांच लक्ष वेधून घेण्यासाठी हे सर्व नाटक असल्याचंही आव्हाड म्हणाले आहेत

'मोदीजी, तुमची परवानगी आहे का?'

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनीही या चित्रपटावर टीका केली आहे. मोदींच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे, आता बापूंची हत्या करणाऱ्या दहशतवादी गोडसेचं उदात्तीकरण करण्यासाठी चित्रपट तयार करत आहेत, असं संजय सिंह म्हणाले.

पंतप्रधान मोदीजी तुम्ही हा चित्रपट तयार करण्याची परवानगी दिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

'अनारकली ऑफ आरा' आणि She असे चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक अविनाश दास यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

बापूंमध्ये मारेकऱ्यांनाही माफ करण्याची शक्ती होती, त्यामुळंच ते कायम मोठे राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावरील इतर प्रतिक्रिया

राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. भारताने आणि विवेकी महाराष्ट्राने महेश मांजरेकर यांना नाकारले पाहिजे, असं परुळेकर म्हणाले. परुळेकरांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्वीट करत याबाबतची मतं मांडली.

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मी नक्की पुरस्कार करतो. जज लोया किंवा गुजरात रायट्स या चित्रपटाची घोषणा करुन दाखवा ना! नि:शस्त्र महात्म्याचा खून करणाऱ्या अधम शार्प शूटरचं पाच मिनिटाचं कुप्रसिद्ध आयुष्य, त्यावर तीन तासांचा हिंदूराष्ट्र मसाला टाकून जे बनतं तो चित्रपट नाही. ती सुपारी होय," असं ट्वीट परुळेकरांनी केलं.

"नथुराम गोडसेचा कोणताही विचार नव्हता. गोडसे हा स्वतंत्र भारतातला पहिला अतिरेकी होता. तो सावरकरांचा अंधभक्त होता. सावरकरांचे विचार व तत्वज्ञान हेच त्याचं जग होतं. त्याचा स्वतंत्र विचार नव्हता. नथुराम गोडसे नि त्याचं काम हे अधम माणसाचं होतं. तो भारताचा आद्य कसाब होय," असंही परुळेकरांनी ट्विटमध्ये म्हटलं.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. सर रिचर्ड ॲटनबरोंनी 'गांधी' बनवला. त्याला अनेक ॲास्कर पुरस्कार मिळाले. गोडसेवर महेश मांजरेकर सिनेमा बनवताहेत. गांधी आणि गोडसे यात हाच फरक आहे!, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

दीपक लोखंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "मांजरेकर फिल्म काढू शकतो, ते स्वातंत्र्य त्याला आहे तसंच त्याचा निषेध करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बघू या कोण कोण निषेध करतं ते."

छोटा शकीलच्या फोनवर भाई, भाई करणाऱ्या मांजरेकरसोबत राहणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ट्विटरवर इतरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी महेश मांजरेकरांवर संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी त्यांच्या बाजूनं प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मांजरेकरांना पाठिंबा दर्शवणाऱ्यांनी हिंदुत्वाशी या चित्रपटाचा संबंध जोडला.

काही युजर्सने मांजरेकरांच्या या निर्णयावर टीका केली.

पैशासाठी काहीही करायला तयार होतात, अशा प्रतिक्रियाही ट्विटरवर व्यक्त करण्यात आल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)