You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आसामः अतिक्रमण हटवण्याला विरोध करणाऱ्यांवर गोळीबार, दोन ठार
- Author, दिलिपकुमार शर्मा
- Role, बीबीसी हिंदीसाठी, गुवाहाटीवरुन
अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या प्रशासनात आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांमध्ये झालेल्या भांडणात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना आसाममधील दरंग जिल्ह्यातील धौलपूर गावात घडली आहे.
राज्य सरकारने या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली हा तपास होईल असं आसाम सरकारच्या गृह खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
सरकारी जमिनीवरुन अतिक्रमण करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस बाहेर काढण्यासाठी एक मोहीम राबवत होते.
आसाम सरकारने 20 सप्टेंबर रोजी दरंग जिल्ह्यातील सिपाझारमध्ये 4500 बिघा जमीन (अंदाजे 225 एकर) बळकावणाऱ्या 800 कुटुंबांना हटवलं होतं.
अशाच 200 कुटुंबांविरोधात ही कारवाई करण्यात येत होती. तेव्हा हा गोळीबार झाला आहे.
दरंग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा सर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, मोहिमेला विरोध करणाऱ्या लोकांनी दगडफेक सुरू केली.
त्यामध्ये 9 पोलीस जखमी झाले. दोन पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सुशांत बिस्वा सर्मा हे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांचे धाकटे भाऊ आहेत.
सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
या घटनेशी संबंधित एक कथित व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीटीआयच्या माहितीनुसार यातील मृतप्राय व्यक्तीच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा असून कॅमेरा हातात असलेली एक व्यक्ती तिला मारत आहे.
मोहिमेचं छायाचित्रण करण्यासाठी विजयशंकर बनिया या व्यावसायिक छायाचित्रकारांना नेमण्यात आलं होतं. मात्र घटनेनंतर त्या व्यक्तीला अटक केले आहे.
या घटनेत 8 पोलीस जखमी झाले आहेत. सहाय्यक उपनिरीक्षक मोनीरुद्दिन यांना गुवाहाटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत सद्दाम हुसैन आणि शेख फरिद नावाच्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
अतिक्रमण हटवण्याची मोहीम थांबवली जाणार नाही असं मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.
लोक काय म्हणतात?
दरंग जिल्ह्यात उपस्थित असणारे आसाम मायनॉरिटी स्टुडंट्स युनियनचे सल्लागार आइनुद्दिन अहमद यांनी बीबीसीला सांगितलं, "सरकारच्या मोहिमेला विरोध करण्यासाठी सकाळी 5 हजारापेक्षा जास्त लोक गोळा झाले होते."
"जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जेसीबीने घरं तोडत होते, यावेळेस उभयपक्षांमध्ये झालेल्या भांडणाचं रुपांतर गदारोळात झालं आणि पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत."
काँग्रेस म्हणतं, सरकारचा मनमानी कारभार
राहुल गांधी यांनी ट्वीटरवरुन पोलीस कारवाईवर टीका केली आहे.
"आसाममध्ये राज्यपुरस्कृत आग लागली आहे. मी राज्यातील आपल्या भाऊ-बहिणींबरोबर उभा आहे. भारताच्या कोणत्याही माणसाशी असं होता कामा नये", असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)