You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही'- चिपळूण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चिपळूणचा दौरा केला. त्यांनी चिपळूण बाजारपेठेत तसंच घरोघरी जाऊन पूरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. कोणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, "राज्य सरकारला जे काही शक्य आहे ते आम्ही करू, मदत कार्यात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ देणार नाही. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तशा सूचना दिल्या आहेत."
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणांचा आढावा घेतल्यानंतर आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
चिपळूण येथे पूरग्रस्त भागाची पाहाणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे स्थानिक प्रशासनासोबत मिळून पूरग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करत आहेत.
दरम्यान, व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडचणी आणि समस्यांचा आढावा घेत त्यांचं सांत्वन केलं.
सर्व नागरिकांची भेट घेऊन मुख्यमंत्री रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनासोबतच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही पॅकेज जाहीर करतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)