उत्तर प्रदेशात वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू, राजस्थानातही मुसळधार पाऊस #5मोठ्याबातम्या

आज वेगवेगळी वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. उत्तर प्रदेशात वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळून 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजमध्ये सर्वाधिक 13 मृत्यू झाले आहेत.

बीबीसी हिंदीने ही बातमी दिली आहे.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार समीरात्मज मिश्र यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशमध्ये रविवारी (11 जुलै) मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या.

वीज कोसळल्यामुळे अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्रयागराज इथे वीज कोसळण्याच्या घटनेची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आणि रविवारी (11 जुलै) मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली.

राजस्थानमध्येही मुसळधार पावसामुळे झालेल्या अपघातांत कोटा जिल्ह्यात चार तसंच धौलपूरमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. बातम्यांनुसार हे मृत्यू वीज पडल्यामुळेच झाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.

2. नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

देशात दरवर्षी हजारो नागरिकांना प्राण गमवावे लागतात, त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून एक नवीन नियम बनवला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनवलेला हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे.

नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच रस्ते सुरक्षा ऑडिटची घोषणा केली होती. रस्ते तयार करताना सर्व टप्प्यांमध्ये रोड सेफ्टीच्या उपायांवर लक्ष दिलं जात नसल्याचं गडकरींनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे आता रस्ते निर्मितीच्या सर्व टप्प्यांवर सुरक्षा ऑ़डिट गरजेचं असेल.

सुरक्षा ऑडिट म्हणजे रस्त्यावर पूर्ण श्रमतेनं वाहनं चालविल्यानंतर अपघातांची शक्यता किती आहे, याची चाचपणी केली जाते.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

3. लखनौमध्ये एटीएसची कारवाई, दोघांना अटक

लखनौमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला एटीएसने वेढा कारवाई करत या दोघांना अटक केली.

हे दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली असून, एटीएसच्या हाती मोठ्याप्रमाणावर स्फोटके देखील लागल्याने एकप्रकारे घातपातचा मोठा कट उधळला गेल्याचे सांगितले जात आहे.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

4. मुंबईत कोव्हिड रुग्णांची संख्या घटली, 85 टक्के बेड रिकामे

मुंबईत कोव्हिड रुग्णांची संख्या घटल्याने 85 टक्के कोव्हिड बेड रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात अनेक रुग्णालयांनी नियमित ओपीडी, नॉन कोव्हिड रुग्ण उपचार, शस्त्रक्रिया अशा प्रक्रिया सुरू केल्या आहेत.

सध्या कोव्हिडपेक्षा नॉन कोव्हिड रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

मुंबईतील 23 हजार 270 कोव्हिड बेड्सपैकी सध्या 19 हजार 411 बेड रिकामे आहेत. त्यांपैकी 18 हजार 300 हून अधिक बेड हे जंबो, खाजगी, सरकारी आणि पालिका रुग्णालयातील होते.

ही बातमी सकाळने दिली आहे.

5. मान्सूननं ओढ दिल्याने देशातील अनेक भागात पेरण्यांचा खोळंबा

देशातील अनेक भागात पावसाचं प्रमाण तुरळक असल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला फटका बसला आहे.

आतापर्यंत 49 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत हे प्रमाण 11 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी 55 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

भारतीय हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 1 जून ते 10 जुलैदरम्यानच्या कालावधीचा विचार करता पावसाची तूट ही 7 टक्के इतकी आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)