You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Modi Cabinet Expansion Live: खातेवाटप जाहीर, मनसुख मांडवीय नवे आरोग्यमंत्री तर नारायण राणेंकडे लघु उद्योग
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले आहेत.
मनसुख मांडवीय यांच्याकडे आरोग्य खात्याचा पदभार देण्यात आला आहे. नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते आले आहे. ज्योतिरादित्य शिंदेंकडे सिव्हिल एव्हिएशन खाते आले आहे.
अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रीपदाबरोबरच सहकार खाते ही दिले आहे. शिक्षण खात्याचा पदभार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आला आहे.
किरण रिजिजू हे नवे कायदा मंत्री झाले आहेत तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, डॉ. भागवत कराड यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, तसंच काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
काँग्रेस पक्षाबरोबरची जुनी निष्ठा मोडून ज्योतीरादित्य शिंदे भाजपमध्ये आले. लगेचच मध्य प्रदेशात सरकार पालटलं.
अपना दलच्या अनुप्रिया पटेल, यांनी देखील मोदींची सकाळी भेट घेतली.
तर आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद रिकामं केलं. हे दोघेही आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात महत्त्वाची खाती मिळवण्याचे दावेदार आहेत.
याआधी, 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी या महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळातले नवे कॅबिनेट मंत्री
- नारायण राणे
- सर्वानंद सोनोवाल
- डॉ. वीरेंद्र कुमार
- ज्योतिरादित्य शिंदे
- रामचंद्र प्रसाद सिंह
- अश्विनी वैष्णव
- पशुपती कुमार पारस
- किरेन रिजिजू
- राजकुमार सिंह
- हरदीप सिंह पुरी
- मनसुख मांडविया
- भूपेंद्र यादव
- पुरुषोत्तम रूपाला
- जी. किशन रेड्डी
- अनुराग सिंह ठाकूर
राजीनामा देणारे मंत्री
- डॉ. हर्षवर्धन
- रवी शंकर प्रसाद
- प्रकाश जावडेकर
- रमेश पोखरियाल निशंक
- थावरचंद गेहलोत
- सदानंद गौडा
- संतोष कुमार गंगवार
- रतन लाल कटारिया
- बाबूल सुप्रियो
- प्रतापचंद्र सारंगी
- संजय धोत्रे
- देवश्री चौधरी
महाराष्ट्रातून कोण?
सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री असून रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर हे मंत्रिमंडळात होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते.
नारायण राणे हे आधी शिवसेनेतून काँग्रेस आणि तिथून भाजपमध्ये प्रवास करून आलेत. पण माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं राजकीय वजन आहे. ते उद्धव आणि आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार टीका करत असतात.
खासदार कपिल पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आताच कशासाठी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत आणि घटनेनुसार 81 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात.
आताच्या मंत्रिमंडळात फक्त 21 कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आहेत. बाकी 29 राज्यमंत्री आहेत. त्यामुळे निर्मला सीतारमण, पीयूष गोयल आणि हरदीप पुरी यांच्यासारखे सीनियर मंत्री एकापेक्षा जास्त खाती सांभाळत आहेत.
केंद्रीयमंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल बनवल्याने मंत्रिमंडळात आणखी जागा रिक्त झाली. ते राज्यसभेचे सदस्य होते.
तसंच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर अनेक मंत्रिपदं रिक्त आहेत. काही मंत्री दोन खात्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. यामुळे आताच्या मंत्र्यांचा भार कमी होण्यास मदत होणार आहेत.
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि पुढे गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकाही जवळ आहेत. त्यामुळे या राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.
उत्तर प्रदेश हे तर भाजपसाठी महत्त्वाचं राज्य आहे. तिथल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नुकताच पार्टीने विजय मिळवलाय.
हा फक्त मंत्रिमंडळ विस्तारच नाही तर काही खात्यांमध्ये खांदेपालटही होऊ शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)