निवडणूक: चार राज्यं, एक केंद्रशासित प्रदेशात राज्यात 475 जागांसाठी 10 कोटी लोक मतदान करणार

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आणि आसाम या चार राज्यांत आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होत आहे. 10 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. मंगळवारी 475 जागांसाठी मतदान होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात 31, आसाममध्ये अंतिम टप्पा 40, केरळमध्ये सर्व 140, तामिळनाडू सर्व 234 तर पुद्दुचेरीत सर्व 30 जागांसाठी मतदान होत आहे.

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधील सर्वच जागांसाठी एकगठ्ठा मतदान होत असल्याने मंगळवारी निवडणूक मोहिमेचा मोठा टप्पा पूर्ण होईल. आसाममध्ये निवडणुकीची रणधुमाळी आज थंडावेल.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे मंगळवारच्या मतदानानंतरही या राज्यात मतदानाचे आणखी पाच टप्पे बाकी आहेत. पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिल रोजी मतदानाचे सगळे टप्पे संपणार आहेत.

चार राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा सर्वच ठिकाणचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत.

केरळमध्ये ई. श्रीधरन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मोठ्या संख्येने मतदान करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तामिळनाडूत कमल हासन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी मतदान केलं. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

भाजप वि. तृणमूल असा बंगालमध्ये मुकाबला

पश्चिम बंगालमध्ये दक्षिण परगण्यातील सात जागा, हावडामध्ये सात, हुगळीत आठ ठिकाणी मतदान होत आहे. भाजप, तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात तिरंगी मुकाबला होतो आहे. भाजप नेते स्वपन दासगुप्ता, तृणमूलचे अशिमा पात्रा यांच्यासह सीपीएमचे कांती गांगुली यांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल.

निवडणूक आयोगाने 10,871 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत आणि याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतरची पहिलीच निवडणूक

तामिळनाडूत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात एआयडीएम आणि 2011 नंतर सत्तेपासून दुरावलेल्या डीएमके या पक्षांमध्ये मुकाबला आहे. एआयएडीएम, भाजप आणि पट्टाली मक्कल कच्छी हे एकत्र आहेत तर डीएमके, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची आघाडी आहे.

जयललिता आणि करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका आहेत. डीएमके अर्थात द्रविड मुनेत्र कळघम आणि एआयडीएमके म्हणजे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम यांच्यातील मुकाबला तामिळनाडूतील राजकारणाचं वैशिष्ट्य आहे.

मुख्यमंत्री पलानीस्वामी, डीएमके नेते स्टॅलिन, के. पनीरसेल्वम, कमल हासन यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होईल.

भाजप 20 तर पट्टाली मक्कल कच्छीने 23 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. अन्य जागांवर एआयडीएमकेचे उमेदवार आहेत.

दुसरीकडे काँग्रेस 25 जागा लढवत आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि विदुतलाई चिरुतागल कच्छी हे प्रत्येकी सहा जागा लढवत आहेत.

मेट्रो मॅन ई.श्रीधरन बाजी मारणार?

केरळमध्ये 140 जागांसाठी 2.74 कोटी मतदार 957 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करतील.

केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी पक्ष युडीएफ यांच्यात खो-खोचा खेळ रंगतो. 1980 पासून हेच समीकरण राहिलं आहे. सलग दोन वेळा सत्तेत राहणं कोणत्याही पक्षाला जमलेलं नाही.

मुख्यमंत्री पिनराई विजयन, आरोग्यमंत्री शैलजा, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्यासह अनेक नेत्यांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या. राहुल आणि पर्यायाने काँग्रेससाठी केरळच्या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

आसाममध्ये कोणाचं पारडं जड?

आसाममध्ये बारा जिल्ह्यात 40 जागांसाठी 337 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, बोडोलँड पीपल्स फ्रंट, आसाम गण परिषद, आसाम जातीय परिषद असे अनेक पक्ष रिंगणात आहेत.

निवडणुका सुरळीतपणे व्हाव्यात यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 320 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार?

पुद्दुचेरीत काँग्रेसच्या नेतृत्वात सेक्युलर गणतांत्रिक मोर्चा यांच्यासमोर एनडीए आघाडी आहे. पुद्दुचेरीत 30 जागांसाठी 324 उमेदवार रिंगणात आहेत.

गेल्या वर्षी काँग्रेसचं सरकार पडल्यापासून पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)