You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नक्षली हल्ला : अमित शाह यांची छत्तीसगडमध्ये जाऊन जवानांना श्रद्धांजली
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात शनिवारी (3 एप्रिल) नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 22 जवानांचा मृत्यू झाला. नक्षल ऑपरेशनचे डीजी अशोक जुनेजा यांनी बीबीसीला ही माहिती दिली. शनिवारी झालेल्या या चकमकीपासून एक जवान अजूनही बेपत्ता आहे.
चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुकमा-बिजापूर बॉर्डवर पोहोचले आहेत. ANI च्या माहितीनुसार, अमित शाह आणि भूपेश बघेल यांनी चकमकीत प्राण गेलेल्या जवानांना जगदलपूर येथे श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर अमित शाह हे जगदलपूरमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तसंच, जखमी जवानांचीही ते भेट घेणार आहेत. सीआरपीएफ कॅम्पचाही ते दौरा करतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चकमकीनंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजियन्स ब्युरोचे संचालक अरविंद कुमार आणि गृह मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात शनिवारी (3 एप्रिल) नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 22 जवानांचा मृत्यू झाला. नक्षल ऑपरेशनचे डीजी अशोक जुनेजा यांनी बीबीसीला ही माहिती दिली.
दिल्लीत पोहोचण्याआधी गुवाहाटीमध्ये अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, "जवानांच्या कुटुंबाना शब्द देतो की, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही."
बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांच्या माहितीनुसार, "नक्षली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 22 जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 31 जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. एक कोब्रा जवान अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे."
केंद्रीय राखीव पोलीस दला (CRPF) चे महासंचालक कुलदीप सिंह यांनी सांगितलं, "या ऑपरेशनमध्ये कुठल्याही प्रकारे इंटेलिजियन्सची चूक नाही. बिजापूरमधल्या चकमकीत 25 ते 30 नक्षलवादी ठार झाले आहेत."
बिजापूर चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावं :
- दीपक भारद्वाज (पोलीस उपनिरीक्षक)
- रमेश कुमार जुर्री (हेड कॉन्स्टेबल)
- नारायण सोढी (हेड कॉन्स्टेबल)
- रमेश कोरसा (कॉन्स्टेबल)
- सुभाष नायक (कॉन्स्टेबल)
- किशोर एंड्रिक (असिस्टंट कॉन्स्टेबल)
- सनकूराम सोढ़ी (असिस्टंट कॉन्स्टेबल)
- भोसाराम करटामी (असिस्टंट कॉन्स्टेबल)
- श्रवण कश्यप (हेड कॉन्स्टेबल)
- रामदास कोर्राम (कॉन्स्टेबल)
- जगतराम कंवर (कॉन्स्टेबल)
- सुखसिंह फरस (कॉन्स्टेबल)
- रमाशंकर पैकरा (कॉन्स्टेबल)
- शंकरनाथ (कॉन्स्टेबल)
- दिलीप कुमार दास (निरीक्षक)
- राजकुमार यादव (हेड कॉन्स्टेबल)
- शंभूराय (कॉन्स्टेबल)
- धर्मदेव कुमार (कॉन्स्टेबल)
- शखामुरी मुराली कृष्ण (कॉन्स्टेबल)
- रथू जगदीश (कॉन्स्टेबल)
- बबलू रंभा (कॉन्स्टेबल)
- समैया माडवी (कॉन्स्टेबल)
सर्वांत मोठ्या माओवादी हल्ल्यांपैकी एक
या घटनेत नक्षलवादीदेखील जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आपल्या साथीदारांना तीन ट्रॅक्टरमध्ये भरून नेल्याची माहिती जुनेजा यांनी दिली.
घटनास्थळावर उपस्थित असलेल्या विविध सूत्रांकडून बीबीसीने माहिती गोळा केली असता, हे समजले की 1 किमीच्या परिघात अनेक ठिकाणी जवानांचे मृतदेह पडले होते. नंतर एसटीएफच्या टीमने ते ताब्यात घेतले.
गेल्या काही काळात घडलेला हा सर्वांत मोठा नक्षलवादी हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, "छत्तीसगढ मध्ये माओवाद्यांशी लढताना जीव गमावलेल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. आपल्या सैनिकांचं योगदान कधीही विस्मृतीत जाणार नाही. हल्ल्यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना," असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.
नक्षल ऑपरेशनासाठी निघालेले जवान
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, माओवादी आणि सुरक्षा दलात जवळपास चार तास चकमक सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुकमा आणि बिजापूरच्या वेगवेगळ्या भागात सीआरपीएफ, डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स आणि कोब्रा बटालियन यांचे 2059 जवान नक्षल ऑपरेशनसाठी निघाले होते.
यात नरसापूर कॅम्पमधील 420 जवान, मिनपा कॅम्पमधील 483 जवान, उसुर कॅम्पमधील 200 जवान, पामेड कॅम्पमधील 195 जवान आणि तर्रेम कॅम्पमधील 760 जवान सहभागी होते.
जखमी जवानांवर रायपूरमध्ये उपचार सुरू
या चकमकीत 37 जवानांना बिजापूर आणि रायपूरमधील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी शनिवारी रात्री रायपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या जवानांची भेट घेतली.
ज्या सात जवानांना रायपूरमध्ये हलवण्यात आलं होतं, ते आता धोक्याच्या बाहेर आहेत. एका बेपत्ता जवानाचा अद्याप शोध सुरू आहे.
दरम्यान, 2 फेब्रुवारी 2021 रोजी लोकसभेत नक्षली हल्ल्यांची माहिती देण्यात आली होती. नक्षल प्रभावित परिसरात नक्षली हल्ल्यात घट झाल्याचा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला होता. 2018मध्ये देशात 833 नक्षली हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. तर 2019मध्ये ही संख्या कमी होऊन 670 वर आली होती. 2020मध्ये 665 नक्षली हल्ल्याच्या घटना झाल्याचं रेड्डी यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)