सचिन वाझेंवरून देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात दिवसभर रंगला राजकीय 'सामना'

संजय राऊत, सामना, सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुकेश अंबानी, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय द्वंद्व पाहायला मिळत आहे.

सामनातील रोखठोक सदरात शिवसेना खासदार आणि संपादक संजय राऊत यांनी सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या सरकारने कोरोना काळात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण देत निलंबित सचिन वाझे यांना पोलीस दलात सामावून घेण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंचं निलंबन मागे घेणं, अत्यंत चुकीचं आहे. कुणावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्न नाही. ज्यांनी घटना घडवली असा आरोप आहे तेच जर तपास अधिकारी असतील, तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि एनआयए असा वाद घालण्याला अर्थ नाही."

"हा मोठा प्लॉट आहे, यात अनेक लोक आहे. त्यामुळे यातून अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. पहिल्यांदा हा जाब विचारयला हवा की त्यांना का घेतलं? त्यांना एवढं महत्त्वाचं पद का दिल गेलं?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

"राज्य अस्थिर करण्याचा आरोप अत्यंत दूधखुळा आणि हास्यास्पद आहे," असंही फडणवीस म्हणाले.

'अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले?'

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. काही दिवसांनी या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्रातील रेतीबंदर परिसरात आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा विधिमंडळात लावून धरल्यानं सरकारची प्रचंड कोंडी झाली होती.

याच प्रकरणावरून राऊत यांनी शंका उपस्थित करत फडणवीसांना टोला लगावला आहे. "अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले?," असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राऊत लिहितात, मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर 'गमावलेला आत्मविश्वास' असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण 'फोकस' विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळ्यात मोठे यश.

सचिन वाझे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सचिन वाझे

महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. खून, आत्महत्या, मृत्यू, बलात्कार यावर सत्ताधारी आणि विरोधकांत रणकंदन सुरू आहे असं राऊत यांनी लिहिलं आहे.

राऊत पुढे लिहितात, "पूजा चव्हाण या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. मनसुख हिरेन याचा मृत्यू हा खून असल्याचे सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा बळी मिळवला, पण अन्वय नाईक व मोहन डेलकर या दोन आत्महत्यांसंदर्भात विरोधी पक्ष काहीच मनापासून बोलायला तयार नाही.

"मोहन डेलकर हे तर सातवेळा निवडून आलेले खासदार. त्यांनी आत्महत्या केली. संसदेच्या विशेष हक्कभंग समितीसमोर डेलकरांनी सांगितले, दादरा-नगर हवेलीचे प्रशासन माझा अपमान आणि छळ करीत आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस मला आत्महत्या करावी लागेल. डेलकर यांनी ही आत्महत्या मुंबईत येऊन केली. संसदेच्या विशेष हक्कभंग समितीसमोर केलेले निवेदन हाच पुरावा मानून गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी. ती का होत नाही?," असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत, सामना, सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुकेश अंबानी, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती.

मुकेश अंबानी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव देशासाठी किती महत्त्वाचा आहे हे देशवासीयांना गेल्या पंधरा दिवसांत नव्याने समजले हे बरे झाले असं राऊत यांनी लिहिलं आहे. ते पुढे म्हणतात, "विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या मते गाडीचा मालक मनसुख व सचिन वाझे हे चार महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या.

"एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय?

संजय राऊत, सामना, सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुकेश अंबानी, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अर्णब गोस्वामी

मुंबई पोलिसांनी तोंड काळे केले असे वक्तव्य फडणवीस यांनी केले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे. सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत 'एनआयए'ला केंद्राने घुसवले ते कशासाठी? केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे म्हणून हे घडू शकले! महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे.

संजय राऊत, सामना, सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुकेश अंबानी, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

काही वर्षांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी केणी या इसमाच्या मृत्यूचे प्रकरण उचलून धरले होते. ते प्रकरणसुद्धा पोकळ पुराव्यांवरच उभे होते व शेवटी ते कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल असं राऊत म्हणतात.

मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळ्यांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे असे सगळ्यानाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल," अशी चिंता राऊत यांनी व्यक्त केली आहे.

...तर सरकार कोसळेल - कंगणा राणावत

अभिनेत्री कंगना राणावतने याप्रकरणी ट्वीट करून महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

तिने म्हटलंय, "माझ्या एक्स रेनुसार या मागे मोठे कट कारस्थान असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना सत्तेत येताच सचिन वाझेला निलंबित करण्यात आलं होतं. पण नंतर त्यांचे निलंबन मागे घेत पुन्हा पदावर नियुक्ती केली गेली. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास गाडलेले मुडदेही बाहेर येतील. फक्त एवढचं नाही तर महाराष्ट्र सरकारही कोसळेल."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)