तापसी पन्नूने आयकर विभागाच्या कारवाईवरून व्यक्त केला सरकारच्या हेतूवर संशय?

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून छापे टाकले जात आहेत.

याप्रकरणी तापसी पन्नूने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. तापसीने आयकर विभागाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

तापसी पन्नूने तीन ट्विट करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याकडेही लक्ष वेधलं.

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलं, "तीन दिवसांच्या सखोल तपासानंतर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

एक- "पॅरिसमधील माझ्या कथित बंगल्याच्या चाव्या. कारण उन्हाळा जवळ आला आहे."

दुसऱ्या ट्विटमध्ये तापसीने छाप्यामागचं कारण सांगत लिहिलं, "अडीच कोटी रुपयांची कथित पावती. भविष्यात मला अडकवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. या पैशांबद्दलचे आरोप मी आधीच फेटाळले आहेत.

तिसऱ्या ट्विटमध्ये तिने लिहिलं, "3. आमच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांच्या माहितीनुसार, 2013 मध्ये आमच्या इथे पडलेला छापा, माझी आठवण."

या ट्विटच्या शेवटी तापसीने लिहिलं, "ताजा कलम - मी आता तितकीशी स्वस्त राहिले नाहीये"

तापसीची सरकारवर टीका

तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी छापा टाकण्यात आल्यानंतर सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

विरोधातील आवाज दाबण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्यात येत असल्याची टीका करण्यात येत आहे.

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे दोघेही सरकारविरुद्ध स्पष्टपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही तापसी पन्नूने सरकारवर निशाणा साधला होता.

4 फेब्रुवारीच्या आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिलं होतं, "जर एक ट्वीट आपल्या एकतेवर परिणाम करत असेल, एखादा विनोद आपल्या धार्मिक भावनेला ठेच पोहोचवत असेल तर तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रोपगंडा टीचर बनण्याऐवजी तुमच्या व्हॅल्यू सिस्टिमला मजबूत करण्यासाठी काम केलं पाहिजे.

आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रेटा थुनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. त्या विषयावर बोलताना तापसी पन्नूने वरील ट्विट केलं होतं.

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या संपत्तींवर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर त्याबाबत टीका होऊ लागली होती.

यावर स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं, "जेव्हा इतर सरकारच्या कार्यकाळात छापे पडतात तेव्हा त्याबद्दल कुणी बोलत नाही. पण या सरकारच्या काळात छापा पडतो, तेव्हा असं होत नाही. 2013 मध्येही छापा पडला होता. तेव्हा याचा मुद्दा बनला नव्हता."

टॅक्स चोरीचा तपास

बुधवार, 4 मार्चला आयकर विभागाच्या तपास पथकाने तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या संपत्तींवर तपास मोहीम सुरू केली होती.

या तपासादरम्यान मुंबई आणि पुण्यात सुमारे 30 ठिकाणी धाड टाकण्यात आली. याशिवाय सेलिब्रिटी आणि एका टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यकारींच्या ठिकाणीही छापे मारले गेले.

बातम्यांनुसार, आयकर विभागाच्या या धाडीदरम्यान फँटम फिल्म्सद्वारा टॅक्स चोरी करण्याच्या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

ही कंपनी 2018 मध्येच बंद करण्यात आली होती. अनुराग कश्यम, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधु मोंटेना या चौघांच्या मालकीची ही कंपनी होती.

आयकर विभागाचा दावा

एका बाजूला, या धाडींच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली जात आहे, तर दुसरीकडे. आयकर विभागाने या छापेमारीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर मारलेल्या छाप्यामध्ये काही गैरव्यवहारांची माहिती मिळाली असल्याचं विभागाने म्हटलं आहे.

प्रत्यक्षात तिकीट खिडकीवर होणारी कमाई कागदोपत्री कमी दाखवल्याबद्दल अनेक पुरावे आपल्याला मिळाल्याचंही विभागाने म्हटलं.

या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित कर्मचारी 300 कोटी रुपयांच्या फरकाबाबत स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.

फँटम फिल्म्सच्या व्यवहारांवर 350 कोटी रुपयांचा टॅक्स बसतो, असंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय, तापसी पन्नूकडे 5 कोटी रुपयांचा रोख व्यवहार झाला होता. याची पावती मिळाल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)