You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, SSC आणि HSCचे निकाल जुलै-ऑगस्टमध्ये लागणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यंदा 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर निकाल जुलैच्या अखेरच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
त्याप्रमाणे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दुपारी मंत्रालयात एक पत्रकार परिषद घेऊन दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांची घोषणा केली.
कोव्हिड संकटामुळे यावर्षी एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. सर्वांनाच घरूनच ऑनलाईन शाळा करावी लागली. यात सुरुवातीच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. त्यामुळे दहावी आणि बारावीसारख्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाची परीक्षाही आव्हानात्मकच ठरणार आहे.
कोव्हीड-19च्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार तसंच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानिक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)