You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन : सोनिया गांधी- अहंकारी सरकारने कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं अहंकारी सरकार सत्तेत आलं आहे. या सरकारला अन्नदात्यांच्या अडचणी दिसत नाहीयेत. तात्काळ कृषी कायदे परत घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
"लोकशाहीत जनतेच्या भावनांकडे फार काळ दुर्लक्ष करून चालत नाही हे सरकार आणि सरकारमधल्या नेत्यांना समजायला हवं. प्रदीर्घ काळ चालू ठेऊन आंदोलकांना थकवून टाकण्याचे सरकारचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.
अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार बाजूला ठेऊन तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीशर्तींविना मागे घ्यायला हवेत. शेतकरी कडाक्याच्या थंडीत आणि पावसात आंदोलनाला बसले आहेत. कृषी कायदे मागे घेतले गेले तर आंदोलन थांबेल. कायदे मागे घेणे हाच राजधर्म असेल आणि आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल", असं गांधी म्हणाल्या.
"लोकशाहीचा अर्थ असा होतो की लोकांच्या भावना समजून घेणे हे मोदी सरकारने लक्षात घ्यावं. 39 दिवस शेतकरी कडाक्याच्या थंडीत आणि पावसात आंदोलन करत आहेत. देशातल्या शेतकऱ्याची ही अवस्था पाहून मन विदीर्ण होतं.
सरकारच्या निष्ठुरतेमुळे आतापर्यंत पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे. सरकारचा आंदोलनाप्रती पवित्रा बघून काहींनी आत्महत्याही केली आहे.
मात्र मोदी सरकार, स्वत: पंतप्रधान आणि सरकारमधील एकाही मंत्र्याने शेतकऱ्यांप्रति काहीही म्हटलेलं नाही. मी देवाकडे प्रार्थना करते की शेतकरी बांधवांना त्यांचे आप्तस्वकीय गेल्याच्या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळावं?", असं गांधी म्हणाल्या.
दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन सुरू होऊन आता 40 दिवस झाले आहेत. एका बाजूला थंडी आणि दुसऱ्या बाजूने पावसाचा मारा झेलत शेतकरी आंदोलन अजूनही सुरूच आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी (1 जानेवारी) दिल्लीचं तापमान गेल्या 15 वर्षांत सर्वात कमी होतं.
त्यानंतर शनिवार आणि रविवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये जास्तच वाढ झाली.
येत्या तीन दिवसांत दिल्ली NCR परिसरात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी दिली.
येत्या काही दिवसांत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दिल्लीचं तापमान 7 ते 8 डिग्रीच्या आसपास राहील. NCR परिसरात येत्या रविवारी तर दिल्ली शहरात सोमवारी गारा पडण्याची शक्यता आहे, असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.
वाऱ्याचा वेग येत्या शनिवारी 15 किलोमीटर प्रतितास तर सोमवारपर्यंत 25 किमी प्रतितास इतका असेल.
पावसानंतर हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण झाल्याने दिल्लीच्या प्रदूषणाची पातळीही अत्यंत गंभीर बनली आहे. शनिवारी दिल्लीचं एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 443 होतं.
अशा हवामानातही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठामपणे उभे आहेत.
शनिवारी झालेल्या पावसामुळे आंदोलनस्थळी गैरसोय निर्माण झाली होती.
सिंघु बॉर्डरवर स्टेजजवळ काही शेतकऱ्यांच्या गाद्या अंथरल्या होत्या. त्या सगळ्या गाड्या भिजल्याने कार्यक्रम चालवण्यात अडचणी आल्या.
जेवण बनवण्याच्या ठिकाणी काही ठिकाणी तंबूतून पाणी गळू लागलं होतं. त्यामुळे संपूर्ण परिसरात चिखल जमा झाला. त्यामुळे लोकांना जेवण बनवून देण्यातही अडचणी आल्या.
सिंघू बॉर्डरवर लंगर सेवेसाठी काम करत असलेल्या साहब सिंह यांनी हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली.
लाकडं भिजल्याने जेवण बनवणं अवघड बनलं आहे. आम्ही कसं तरी करून काही लाकडं वाचवली. ती कोरडी लाकडं आणि गॅस सिलेंडर यांच्यामार्फत काम सुरू आहे. पण आता जेवण वाटप करताना अनेक अडचणी येत आहेत.
आधी लोक चटईवर बसून जेवायचे. पण त्या पूर्णपणे भिजल्या आहेत. लोकांना चिखलाने भरलेल्या रस्त्यावर उभे राहून जेवावं लागत आहे.
द हिंदू वृत्तपत्राच्या मते, शेतकऱ्यांनी सगळी सोय केली आहे. पावसाचं पाणी आत येऊ नये, यासाठी ट्रकवर प्लास्टीक लावलं आहे.
सुखजित सिंह नामक एक शेतकरी द हिंदूशी बोलताना म्हणाले, "पुढच्या काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आम्ही सगळी तयारी करत आहोत. पण कपडे वाळवण्यात अडचणी येतात. डासांचा त्रास वाढतो. चिखलाने कपडे खराब होतात. पण आम्ही इथून हटणार नाही. तसंही कृषि कायदे मागे घेतले नाहीत, तर परत जाण्यासारखं काहीच वाचणार नाही.
तर सोशल मीडियावरही अनेकजण पावसानंतरची आंदोलनाची स्थिती समजावून सांगत आहेत. त्या ठिकाणचे फोटो आणि व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
मुक्त पत्रकार संदीप सिंह यांनीही असाच एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला.
परमजीत सिंग यांनी शनिवारी सकाळचा सिंघु बॉर्डरवरचा एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला.
सोशल मीडिया वापरकर्त्या कमलप्रीत कौर यांनीही सिंघु बॉर्डरवरचा पावसाचा व्हीडिओ शेअर केला. मोदी सरकारला लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांना हे सगळं सहन करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. शेतकऱ्यांचं धाडस आणि धैर्याला सलाम, असं त्या म्हणाल्या.
आज होत असलेल्या पावसानंतरचे आंदोलनस्थळाचे फोटोही लोकांकडून शेअर केले जात आहेत.
ट्रॅक्टर 2 ट्विटर या अकाऊंटवरून आजचे (रविवार) फोटो शेअर करण्यात आले.
कृषि कायद्याच्या मुद्द्यावर शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या सहा फेरी झाल्या आहेत. 30 डिसेंबरच्या चर्चेत पराली जाळल्यानंतर शेतकऱ्यांना शिक्षा आणि वीज बिलात सवलत मिळण्याच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या.
पण वादग्रस्त कृषि कायदे आणि MSP साठी कायदेशीर तरतूद करण्याबाबत अजूनही मतभेद आहेत.
चर्चेच्या पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा घेऊन येऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पुढच्या टप्प्यातील चर्चा 4 जानेवारीला होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)