You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रावसाहेब दानवे : भाजप 2-3 महिन्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल
महाराष्ट्रात येत्या 2-3 महिन्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
"महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असल्याचं," ते पुढे म्हणाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपची साथ सोडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. राज्यातील आघाडी सरकारला येत्या 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे.
भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2019 ला अचानक शपथ घेतली होती. त्यापार्श्वभूमीवर दानवे यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'ऑपरेशन लोटस' सुरू करणारी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली तर, भाजप पुन्हा महाराष्ट्राचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत होतं.
आता, रावसाहेब दानवेंच्या विधानामुळे पुन्हा राज्यात सत्तांतर होण्याच्या घडामोडी सुरू होतील का, अशा चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान 23 नोव्हेंबरला पत्रकारांशी बोलताना, "पुढील चार वर्षं राज्यात निवडणुका होणार नाहीत," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते.
"ती पहाट नव्हती. तो अंध:कार होता. त्या अंध:काराच्या सत्तेची प्रकाशकिरणं पुन्हा दिसणार नाहीत. पुढील चार वर्षं तरी, त्यानंतर निवडणुका होतील. त्यानंतर परत आम्हीच जिंकणार आहोत," असंही ते पुढे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)