You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजीराजे मराठा आरक्षणावर म्हणतात, भाजपची भूमिका मला लागू होत नाही
एकीकडे कोरोना व्हायरस आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या सगळ्यां घडामोडींदरम्यान 11 ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली MPSC परीक्षाही राज्यसरकारने पुढे ढकलली आहे.
ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचं कारण पुढे केलं आहे. कुणाच्याही दबावाखाली सरकारने पुढे ढकलली, असं समजू नये, हे स्पष्टीकरण सरकारने दिलं असलं तरी याची वेगळी कारणं आहेत.
11 ऑक्टोबरची MPSC पुढे ढकलण्याची मागणी सर्वप्रथम राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली होती. मुंबई येथे आयोजित मेळाव्यात MPSC पुढे न ढकलल्यास राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता.
या सर्व गोष्टींमुळे सध्या संभाजीराजे छत्रपती यांचं नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने या मुलाखतीच्या माध्यमातून केला. यावेळेस त्यांनी भाजप आणि त्यांच्या भूमिकेबद्दलचे मतही स्पष्ट केले.
प्रश्न - MPSC परीक्षा पुढे ढकलल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. यावर इतर काही तोडगा निघाला नसता का?
उत्तर - मागच्यावर्षी एमपीएससीच्या ज्या नियुक्त्या केल्या त्यांना सरकारने अजून का रुजू करून घेतलं नाही. वयोमर्यादा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय.
मराठा समाजातही अनेक गरीब विद्यार्थी आहेत. त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण परीक्षा पुढे ढकलण्याचा आग्रह आम्ही धरला आणि दोन-तीन महिन्यांचा प्रश्न आहे. मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतोय. हा प्रवास वेगळा आहे.
प्रश्न - मराठा आंदोलनात एकवाक्यता नाही. यासाठी शरद पवार, उदयनराजे भोसले अश्या नेत्यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहीजे असं वाटतं?
उत्तर - जसं 58 मोर्चांसाठी सर्व एकसंघ होते तसं सर्वांनी एकत्र यावं अशी मी विनंती करतो. या सगळ्याचा पुढाकार घेणं, हे कितपत प्रॅक्टीकल असेल मला माहिती नाही. पण जे सकल 58 मोर्चे निघाले होते. त्या सर्व संघटनांनी एकत्र यावं अशी माझी विनंती आहे.
प्रश्न - मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी राज्य सरकार कमी पडलं असं भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. तुम्हालाही असचं वाटतय की सरकार बाजू मांडायला कमी पडलं?
उत्तर - मराठा आरक्षण हे राजकारणाच्या पलिकडचं आहे. एकदा मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी एकत्र यावे आणि समाजाला दिशा द्यावी. कोर्टाची स्थगिती कशी थांबवता येईल हे बघितलं पाहीजे. दोघांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून बोलण्यापेक्षा एकत्र येऊन मार्ग काढावा.
प्रश्न - प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावर टीका केली आहे, त्याबाबत काय सांगाल?
उत्तर - मला त्यांना काहीही उत्तर द्यायचं नाही.
प्रश्न - तुम्ही हे नेतृत्व भाजपचे खासदार म्हणून करताय की छत्रपती म्हणून करता? कारण तुमची आणि भाजपची भूमिका वेगळी असते?
उत्तर - मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. नरेंद्र मोदींनी माझी शिफारस केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण भाजपची भूमिका मला लागू होत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)