You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन वाद : भारतीय सैनिकांनी गोळीबार केल्याच्या चीनच्या आरोपाला भारतानं काय उत्तर दिलं?
भारतीय लष्करानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याकडून गोळीबार झाल्याचं म्हटलं आहे. चिनी लष्कराकडून सरळसरळ सामंजस्याच्या अटीशर्थींचं उल्लंघन केलं जात आहे, आक्रमकता दाखवली जात आहे, असं भारतानं म्हटलं आहे.
भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, सोमवारी (7 सप्टेंबर) चिनी सैनिक (पीएलए) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या एका ठाण्याच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न करत होते आणि आमच्या सैनिकांनी जेव्हा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हवेत गोळीबार करत आमच्या सैनिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.
भारतीय लष्करानं म्हटलं की, चीनच्या या कृत्यानंतरही भारतीय सैनिकांनी संयम बाळगला आणि जबाबदारीनं वर्तन केलं.
चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडने आपल्या निवेदनानं स्वतःच्या देशाची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतीय लष्करानं केला आहे.
त्यापूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) सोमवारी (7 सप्टेंबर) भारतीय सैनिकांनी कायद्याचं उल्लंघन करत सीमेवर तैनात चिनी सैनिकांवर वॉर्निंग शॉट्स फायर केले, असा आरोप चीननं केला होता. भारतीय सैनिकांनी LAC ओलांडल्याचा दावाही चीनकडून करण्यात आला.
चिनी सैनिक चर्चा करायला तयार होते, असंही चीनकडून म्हटलं गेलं होतं.
चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं चिनी लष्कराच्या एका प्रवक्त्याच्या हवाल्यानं वृत्त देताना म्हटलं, की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैनिकांना नाइलाजानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी लागली.
भारतीय वृत्तसंस्था ANI नं LAC वर पूर्व लडाखमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त दिलं आहे.
चिनी लष्कराचे प्रवक्ते सीनियर कर्नल जांग शियुली यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं, "भारतीय सैनिकांनी भारत-चीन सीमारेषेवरील पश्चिम भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि पँगोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील शेनपाओ पर्वतरांगांच्या भागात घुसले."
चिनी लष्कराच्या निवेदनानुसार दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीचं उल्लंघन भारतीय सैन्यानं केलं आहे. त्यामुळे या भागातील तणाव वाढला आहे.
यामुळे दोन्ही देशांतील गैरसमज वाढतील आणि ही गंभीर, परिस्थिती चिघळवणारी कारवाई असल्याचं चिनी सैन्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.
प्रवक्ते जाँग यांनी म्हटलं, "अशापद्धतीच्या धोकादायक हालचाली तातडीनं बंद कराव्यात, अशी मागणी आम्ही भारतीय सैन्याकडे करत आहोत. ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आहे, त्यांना तातडीने परत बोलावलं जावं, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास व्हावा आणि ज्या सैनिकांनी वॉर्निंग शॉट्स फायर केले आहेत त्यांना शिक्षा दिली जावी. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जावी."
भारत-चीन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक
चिनी लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, की चिनी सैनिक आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं रक्षण करतील.
भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या आधीच हा वाद निर्माण झाला आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मंगळवारी (8 सप्टेंबर) चार दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर जात आहेत. जयशंकर शांघाय सहयोग संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी मॉस्कोला जात आहेत.
शांघाय सहयोग संघटनेमध्ये भारत आणि चीनसह आठ सदस्य देश आहेत.
याच दौऱ्यात एस जयशंकर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक करतील.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार एस जयशंकर मॉस्कोला जाताना तेहरानमध्ये थोडा वेळ थांबून इराणचे परराष्ट्रमंत्री जव्वा जरीफ यांचीही भेट घेऊ शकतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)