You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्णब गोस्वामींना ज्या प्रकरणामुळे अटक झाली ते अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय आहे?
पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बुधवारी (4 नोव्हेंबर) रोजी सकाळी सहा वाजता पोलिसांनी घरात शिरून गोस्वामींना अटक केली. त्यानंतर त्यांना अलीबाग कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता आणि त्यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि आम्हाला या प्रकरणात न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.'
काही आठवड्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली होती की 'वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू झाली आहे.
अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक आणि त्यांच्या मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार त्याची चौकशी होणार असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय, अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे.
पण अर्णब यांच्या कंपनीने एक पत्रक जारी करून अक्षता नाईक यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते, मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची का नाही, असा सवाल विचारत सोशल मीडियावर मोहीम सुरू होती.
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे इत्यादी बरेच नेतेमंडळीही या मोहिमेत सहभागी झाले होते.
सोशल मीडियावरून चालवण्यात येणाऱ्या #JusticeForAnvay मोहिमेबद्दल जाणून घेण्याआधी हे नेमकं प्रकरण काय आहे, हे आपण समजून घेऊया.
अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.
अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.
त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.
रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली.
त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हीडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत, 26 मे 2020 रोजी सांगितलं की, "आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत."
मात्र, 3 ऑगस्ट 2020 रोजी अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावरून आणखी एक व्हीडिओ जारी केला आणि या प्रकरणात कुठलाच तपास झालं नसल्याचं सांगितलं.
"अर्णब गोस्वामी माझ्या पती आणि सासूच्या आत्महत्येला जबाबदार आहे. आधीच्या सरकारनं ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही न्याय मिळाला नाहीय," असा आरोप करणारा व्हीडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.
या व्हीडिओनंतर पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झालीय. सोशल मीडियावर #JusticeForAnvay ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी झाले आहेत.
अर्णब गोस्वामी यांचं म्हणणं काय आहे?
दोन-अडीच महिन्यांपूर्वी म्हणजे 5 ऑगस्ट 2020 रोजी अक्षता नाईक यांनी ज्यावेळी अर्णब गोस्वामी यांच्यावर आरोप करणारा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला, त्याच्या दोन दिवसांनी म्हणजे 7 मे रोजी रिपब्लिक टीव्हीच्या ट्विटर हँडलवरून अर्णब गोस्वामी यांची भूमिका मांडणारे पत्र जारी करण्यात आलं.
ARG आऊटलायर मीडियाने अक्षता नाईक यांचे सर्व आरोप फेटाळले. ARG आऊटलायर मीडिया ही अर्णब गोस्वामी प्रमुक असलेल्या रिपब्लिक टीव्हीची मुख्य कंपनी आहे.
"अक्षता नाईक या सत्याला तोडून-मोडून मांडत आहेत. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडशी (अन्वय नाईक यांची कंपनी) असलेला सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहेत," असं ARG आऊटलायर मीडियाने पत्रकात म्हटलं आहे.
तसंच, "अक्षता नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे पोलिसांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे. कुठलेही अवैध कृत्य झाले, याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत," असेही ARG आऊटलायर मीडियाने म्हटलंय.
"अक्षता नाईक यांनी सत्या चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आऊटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकराणी कायदेशीर कारवाई करू," असा इशाराही अर्णब गोस्वामींच्या ARG आऊटलायर मीडियाने दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)