राजस्थानमध्ये भाजप सरकार येईल, महाराष्ट्रातले उद्धव ठाकरेंचे सरकार जाईल: रामदास आठवले

राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींचा दाखला देत राजस्थानमध्ये भाजपचं सरकार येईल आणि राजस्थाननंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच सरकार जाईल असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीटद्वारे केलं आहे.

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. त्याचसोबत, सचिन पायलट यांचे समर्थक मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षालाही पदावरून काढण्यात आलं आहे.

सचिन पायलट यानंतर कोणतं पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पायलट यांनी उंदरांप्रमाणे बुडतं जहाज सोडून जाऊ नये असं वक्तव्य नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

उद्धव ठाकरेंचे सरकार जाणार - रामदास आठवले

दरम्यान, सध्याच्या या घडामोडींचा दाखला देत भाजपसोबत सत्तेत असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे.

आठवले म्हणतात, "सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही. मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार गेलं. याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपचं सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभं राहावं."

आठवले पुढे महाराष्ट्राबद्दल बोलताना म्हणतात, "मध्यप्रदेशात जे झालं तेच राजस्थानात होईल. राजस्थानात भाजपचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राची वेळ येईल. महाराष्ट्रातलं सरकार फार टिकणार नाही. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार लवकरात-लवकर जाईल आणि महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल."

रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती इथे नक्कीच घेतली जाईल. मात्र, आठवलेंच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)