You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभय देओल: 'भारतातल्या नेपोटिजमची बीजं ही जातीमध्येच आहेत'
माझे काका, ज्यांना मी प्रेमाने डॅड म्हणतो ते चित्रपट क्षेत्रात हिट होण्यापूर्वी एक आऊटसाईडरच होते. पडद्यामागे काय काय घडतं यावर गेल्या काही दिवसात चर्चेला तोंड फुटलं आहे याचा मला आनंद आहे.
अभिनेता अभय देओलने काका धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या फोटोसह इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. प्रदीर्घ अशा पोस्टमध्ये अभयने घराणेशाही हा हिमनगाचा छोटा तुकडा असल्याचं म्हटलं आहे.
अभय लिहितो, मी माझ्या घरच्यांबरोबर एक चित्रपट केला- माझा पहिला चित्रपट. मला ज्या सुखसोयी मिळाल्या त्याकरता मी त्यांचे आभार मानतो. कारकीर्दीत स्वत:ची वेगळी वाट जोपासण्यासाठी मी अतिरिक्त मेहनत घेतली आहे. ज्यासाठी डॅड यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. माझ्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत.
अभय देओलचा पहिला चित्रपट सोचा न था हा होता. धर्मेंद्र यांच्या विजेता फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली होती.
अभयच्या मते घराणेशाही आपल्या संस्कृतीत प्रत्येक ठिकाणी आहे. राजकारण असो, व्यापारउद्योग असो किंवा चित्रपट व्यवसाय असो.
मला ही गोष्ट कळून चुकली होती म्हणूनच मी कारकीर्दीत नेहमी नवे दिग्दर्शक आणि नव्या निर्मात्यांबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला. कदाचित म्हणूनच मी असे चित्रपट करू शकलो ज्यांना आऊट ऑफ बॉक्स अर्थात प्रवाहावेगळे चित्रपट म्हटलं जातं. माझ्या सहकलाकारांनी आणि काही चित्रपटांनी दिमाखदार यश मिळवलं याचा मला खूप आनंद होतो.
भारतातली घराणेशाही- जात
घराणेशाही प्रत्येक देशात आहे मात्र भारतात तिने वेगळं रुप धारण केलं आहे.
अभय म्हणतो, बाकी कशापेक्षाही भारतात जातीची भूमिका सगळ्यांत महत्त्वाची ठरते. मुलगा वडिलांचं काम पुढे सांभाळणार का? मुलगी लग्न होऊन गृहिणी होणार का? हे जातीवरच ठरतं.
आपल्याला बदल घडावा असं वाटत असेल, सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर एका इंडस्ट्रीवर लक्ष केंद्रित करून आणि बाकीच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपले चित्रपटकार, नेते, उद्योग जगतातील धुरीण आपल्याच समाजाचा भाग आहेत. तेही आपल्यासारखीच माणसं आहेत. आपण ज्या व्यवस्थेत जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, काम करतो त्याच व्यवस्थेचा तेही भाग आहेत. ते आपल्याच संस्कृतीचं प्रतिबिंब आहेत.
प्रतिभा, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो- त्या व्यक्तीला प्रतिभा सिद्ध करण्यासाठी एका संधीची आवश्यकता असते.
अभय पुढे लिहितो, गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण हे शिकलो की कोणत्याही कलाकाराला डोक्यावर उचलून घेण्याचे आणि त्याच कलाकाराला अपयशामुळे खोल गर्तेत ढकलून देण्याचे अनेक प्रकार असतात. आज अनेक अभिनेते-अभिनेत्री स्वत:हून या विषयावर बोलत आहेत.
आपल्या अनुभवांविषयी खुलेपणाने बोलत आहेत. मी गेली काही वर्ष यासगळ्याबाबत बोलतो आहे. मी एकटा तेवढंच करू शकत होतो. प्रवाहाविरुद्ध बोलणाऱ्या एका कलाकाराला लक्ष्य करणं सोपं असतं. अनेकदा असं बोलण्याचा मला फटका बसला आहे. परंतु सगळेजण एकत्र येऊन बोलू लागले तर त्यांना रोखणं अवघड असतं. कदाचित आपण एकत्र येण्याची वेळ आली आहे.
याआधीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभय देओलने पुरस्कार सोहळ्याचा किस्सा कथन केला होता. एका पुरस्कार सोहळ्यात जिंदगी मिलेगी ना दोबारा चित्रपटातील भूमिकेसाठी अभय आणि फरहान अख्तर यांना सहाय्यक अभिनेत्यांच्या यादीत टाकण्यात आलं होतं. हा चित्रपट म्हणजे हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर या तीन मित्रांची गोष्ट असते. हृतिक आणि कतरिना कैफ अशी जोडी असल्याने पुरस्कार सोहळ्यात मुख्य अभिनेता श्रेणीसाठी हृतिकचा विचार झाला तर अभय आणि फरहान यांना सहाय्यक अभिनेता करण्यात आलं.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधल्या घराणेशाहीवर उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत इथल्या कामाचा अनुभव किंवा वारा नसणाऱ्या कलाकारांना, प्रतिभावान असूनही संधी दिली जात नाही असं अनेक कलाकारांनी खुलेपणाने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)