Delhi Assembly Election 2020 : कमी मतदानामुळे सगळ्यांनाच धाकधूक

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (8 फेब्रुवारी) मतदान होत आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. पाच वाजेपर्यंत 45 टक्के मतदान झालं आहे.

मतदानादरम्यान काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा आणि आणि आप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. संतापलेल्या लांबा यांनी आप पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावण्यासाठी हात उगारला. मुलासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याने लांबा चिडल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अलका लांबा चांदनी चौक मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. मूळच्या काँग्रेसच्याच असलेल्या लांबा 2015 मध्ये आपच्या तिकीटावरून निवडून आल्या होत्या. मात्र नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलका यांच्यासमोर आपचे प्रल्हाद सिंह आणि भाजपच्या सुमन गुप्ता यांचे आव्हान आहे.

सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलं मतदान

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज मतदान केलं. सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करणं अत्यावश्यक आहे असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

राहुल गांधी, मनमोहन सिंग, लालकृष्ण आडवाणी यांनी देखील मतदान केलं.

सकाळी 11.26 - कोंकणा सेन शर्माचं दिल्लीकरांना आवाहन

सिने अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने दिल्लीकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तिरस्काराविरोधात मतदान करा.

सकाळी 10.20 वा. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलं मतदान

अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी आणि माजी IRS अधिकारी सुनिता केजरीवाल यांनी मतदान केलं. केजरीवाल यांचे आई-वडिलांनी मतदान केलं. केजरीवाल यांचा मुलगा पुलकित याने पहिल्यांदाच मतदान केलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदान केलं आहे. मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जनता कामाच्या आधारावर मत देईल आणि आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महिलाविरोधी असल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी महिला मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.

इराणी यांच्या ट्वीटला केजरीवाल यांनी ट्वीटनेच प्रत्युत्तर दिलं आहे.

स्मृतीजी, दिल्लीच्या महिलांनी कोणाला मत द्यायचं हे पक्कं ठरवलं आहे. संपूर्ण दिल्लीत महिलांनीच घरातली सगळं मतं कोणाला द्यायची हे ठरवलं आहे. कारण घर त्यांनाच चालवायचं असतं.

सकाळी 10.15 वा. मतदान करायला पोचला नवरदेव

दिल्लीत मतदानासाठी उत्साह दिसून येतोय. शकरपूर भागातल्या एमसीडी प्राथमिक शाळेत मतदान करण्यासाठी एक नवरदेवही पोचला. आजच लग्न असल्याने सगळी तयारी करून हा नवरदेव मतदान करण्यासाठी आला.

सकाळी 9.51 वा. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन केजरीवाल निघाले मतदानाला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मतदानासाठी निघाले आहेत. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून सुनिल यादव आणि काँग्रेसचे रोमेश सभरवाल उभे आहेत.

सकाळी 9.39 वा. अमित शाह यांचं मतदारांना आवाहन

दिल्लीला स्वच्छ हवा, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि प्रत्येक गरिबाला घर देऊन दूरोगामी विचार आणि प्रबळ इच्छाशक्ती असणारं सरकारचं या शहराला जगातील सर्वोत्तम राजधानी बनवू शकते.

मी दिल्लीच्या जनतेला आवाहन करतो की खोटं आणि व्होटबँकेच्या राजकारणापासून दिल्लीला मुक्त करण्यासाठी मतदान अवश्य करा.

सकाळी: 9.14 वा. शाहीनबागमध्ये मोठी रांग

दिल्लीतील शाहीन बाग या ठिकाणी CAA विरोधी आंदोलन सुरू आहे. या भागात सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येनी मतदानासाठी हजेरी लावली आहे. आम आदमी पक्षाकडून अमानतुल्लाह खान, काँग्रेसकडून परवेज हाशमी आणि भाजपकडून ब्रह्म सिंह हे रिंगणात उभे आहेत.

11 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारीला संपत आहे.

अरविंद केजरीवाल यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन

कॅनॉट प्लेसच्या प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचा आशीर्वाद घेतला. देश आणि दिल्लीच्या विकासासाठी प्रार्थना केली. हनुमानजी म्हणाले, "चांगलं काम करत आहेस. अशीच जनतेची सेवा करत रहा. फळ माझ्यावर सोड. सगळं चांगलं होईल."

अरविंद केजरीवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ते हनुमानाचे भक्त आहेत.

दिल्ली मतदारांचा कौल कुणाला असेल?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 13 हजार 750 पोलिंग बूथवर जवळपास 1.46 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

2015 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळविला होता. भाजपला तीन जागांवर यश मिळालं होतं, तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. आम आदमी पक्षाचा भर शिक्षण, आरोग्य, स्वस्त वीज आणि पाणी या गोष्टींवर होता, तर भाजपनं स्वच्छ दिल्ली, आरोग्य आणि सर्वांना घरं देण्याचं आश्वासन दिलं.

काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये हॉस्पिटल, महिलांना आरक्षण आणि मोफत सुविधांवर भर दिला होता.

पण दिल्ली विधानसभेचा प्रचार या मुद्द्यांपेक्षाही शाहीन बाग इथे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात (CAA) सुरू असलेल्या आंदोलनाभोवतीच केंद्रित झाला. याच मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले.

केजरीवाल विरुद्ध मोदी

आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंच नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे दिल्लीतील लढत ही अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी असल्याचं चित्र निर्माण झालं.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते जेपी अग्रवाल यांच्या मते विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नावे मतं मागून भाजपला मतं मिळू शकणार नाहीत.

ते म्हणतात, "मोदींना पुढे करण्याचा अर्थ भाजप केंद्रातील मुद्द्यांच्या आधारे दिल्लीची निवडणूक लढू पाहत होतं. नरेंद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार नाहीयेत. ते दिल्लीच्या तीन-चार नेत्यांचं नाव घेतात. पण त्यांनी मनोज तिवारी, विजय गोयल, विजेंद्र गुप्ता यांचं नाव घेतलं नाही."

केजरीवाल यांच्या नावाच्या जादूमुळे निवडणुकीचं चित्र बदलेलं, असंही अग्रवाल यांना वाटत नाही. त्यांच्या मते निवडणुकीत मुद्दे आवश्यक आहेत. कोणी काय काम केलं, हे लोक पाहतात.

आम आदमी पक्षाचे नेते दिलीप पांडेय यांना मात्र जेपी अग्रवाल यांचं मत मान्य नाहीये. पांडेय यांच्या मते चेहरा आणि काम हे दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)