You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Delhi Exit Poll: पुन्हा केजरीवाल येऊ शकतात, पण जागा कमी होण्याची शक्यता
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. सर्व एक्झिट पोल्समध्ये एक गोष्ट समान आहे की सत्ताधारी आम आदमी पार्टीला पुन्हा बहुमत मिळू शकतं, पण त्यांच्या जागा कमी होऊ शकतात.
एकूण 70 जागांपैकी आम आदमी पार्टी (आप) या सत्ताधारी पक्षाला 2015 सालच्या निवडणुकीत 67 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र त्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळी 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या जागा वाढू शकतील, असं एक्झिट पोल्सचे आकडे सांगत आहेत.
काँग्रेस पक्षाचा भोपळा गेल्या वेळी फुटला नव्हता. याही वेळी त्यांना एक जागा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो.
आज तक- AXISच्या पोलने आम आदमी पार्टीला सगळ्यांत जास्त 59-68 एवढ्या जागा मिळू शकतील असं म्हटलंय. केजरीवालांनी भाजपचा धुव्वा उडवलाय, असं या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.
'एक्झिट पोल खोटे ठरतील'
भाजपचे दिल्लीतले नेते मनोज तिवारी यांनी म्हटलंय की, "हे एक्झिट पोल फेल होतील. आम्हाला 48 पेक्षा जास्त जागा मिळतील. आमचंच सरकार स्थापन होईल. आतापासून ईव्हीमला दोष देण्याचं वातावरण तयार करू नका."
तर आपने दावा केलाय की विजय त्यांचाच होणार आहे. पक्षाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून म्हटलंय की "आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार आहोत."
निकाल 11 तारखेला येणार आहेत. त्यावेळी स्पष्ट होऊ शकेल की हे आकडे किती खरे आहेत. आतापर्यंत एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना साधारणतः हे ओळखता आलं आहे की कोणता पक्ष जिंकतोय, पण आकडे सांगण्याच्या बाबतीत अनेकांच्या चुका झाल्या आहेत.
दिल्ली निवडणूक ही तीन पक्षांमध्ये झाली. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये हा सामना रंगला. आम आदमी पक्षाने ही निवडणूक अरविंद केजरीवाल आणि त्यांनी केलेल्या विकास कामांभोवती ठेवली. आपने आपलं रिपोर्ट कार्डच जनतेसमोर ठेवलं. शिक्षण आणि आरोग्य खात्यांमध्ये केलेल्या सुधारणा बघा असं म्हणत आपने मतं मागितली.
कसा करतात एक्झिट पोल?
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे संचालक संजय कुमार सांगतात, "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते."
"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी हा अंदाज घेतलेला असतो."
"सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते."
पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.
यावर ते सांगतात, "भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही."
"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते."
एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'द वर्डिक्ट…डिकोडिंग इंडियाज इलेक्शन' या पुस्तकात मिळतं.
या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत.
त्यात ते लिहितात, "एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे."
त्यामुळे अगदी तंतोतंत नाही पण एक्झिट पोलमुळे आपल्याला राजकीय परिस्थितीचा अंदाज समजतो.कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)