You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र राजकारण मीम्स: शरद पवार, फडणवीस, उद्धव ठाकरेंपासून ते भगत सिंह कोश्यारी आणि अमित शहा, सगळेच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक नाट्यमय वळणं आली. पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांसोबतच मतदारही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. अखेर सरकार स्थापन तर झालं नाही, मात्र सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे.
कोणत्याही लहान-मोठ्या सणासाठी वा दिवसासाठी सध्या व्हॉट्सअॅपवरून उठसूठ शुभेच्छा दिल्या जातात. आणि महाराष्ट्रात काल राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानंतर अर्थातच काहींना यावरूनही गंमत सुचली.
"ही संधी तरी पुन्हा कधी मिळणार," असं म्हणत लोकांनी चक्क राष्ट्रपती राजवटीच्या शुभेच्छा पाठवल्या.
निवडणुकीपूर्वीच्या प्रचारसभांमध्ये कुस्तीचा मुद्दा खूप गाजला होता.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, "विधानसभा निवडणूक समोर आली आहे. अशात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणीही दिसत नाही. शरद पवार यांची अवस्था तर शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे - 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे मेरे पिछे आओ,' असं शरद पवार म्हणतात आणि मागे वळून पाहतात तेव्हा कुणीही नसतं."
त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी "कुस्ती बरोबरीच्या पैलवानांबरोबर खेळतात लहान मुलांशी नाही", असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला होता.
आता सत्तापेचात याच कुस्तीच्या मुद्द्यावरूनही एक मीम करण्यात आलंय.
निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षांतर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण भाजपमध्ये गेले. याबद्दलचं शरद पवारांवरचं मीमही व्हायरल झालं.
सत्तास्थापनेसाठी करण्यात येणारे प्रयत्न, त्यासाठी होणाऱ्या चर्चा आणि शेवटच्या क्षणी फिस्कटणारे बेत, हे सगळं पाहून कोणाला तरी मित्रांच्या ग्रूपमध्ये नेहमी आखल्या जाणाऱ्या पण प्रत्यक्षात कधीही न घडणाऱ्या 'गोवा ट्रिप'ची आठवण आली.
सरकारस्थापनेसाठीचं आमंत्रण राज्यापालांद्वारे तीन पक्षांना देण्यात आलं, पण तीनही पक्षांचे नेते राजभवनावर जाऊन परतले. हे म्हणजे दहीहंडीच्या 'सलामी' सारखं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
निकालांनंतर सुरुवातीला भाजप-शिवसेनेच्या सरकारस्थापनेविषयी चर्चा सुरू असताना, अमित शहांनी यामध्ये कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. त्यानंतर भाजपने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं सांगत चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला आणि पुढच्या नाट्याला सुरुवात झाली. दूरवर बसून ही सगळी मजा पाहणारे अमित शहा एका मीममध्ये दिसतात.
एकमेकांच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणारे तीन पक्षप्रमुख आणि शिवसेनेचा वाघ यांचं थेट 'लायन किंग' स्टाईलमधलं सतीश आचार्य यांनी रेखाटलेलं व्यंगचित्रंही अतिशय लोकप्रिय झालं.
या सगळ्या गदारोळात मनसेचा एकमेव आमदार कुठेच चित्रात आलेला नाही. चाणाक्ष नेटकऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.
शिवसेना सत्ता स्थापन करणार म्हणून अरविंद सावंतांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेचा प्रस्ताव तेव्हा बारगळला. त्यानंतर लगेचच अरविंद सावंतांवर कोटी करणारं मीम फिरू लागलं.
इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना विविध पक्ष नेत्यांच्या राजभवनावरही फेऱ्या झाल्या. आणि यामुळे अर्थातच राज्यपालांवरची काही मीम्सही व्हायरल झाली.
तर क्रिकेट सामना सुरू असताना पाऊस पडल्यास वापरण्यात येणाऱ्या डकवर्थ लुईस नियमाची आठवणही सोशल मीडियाला आली.
सत्तास्थापनेच्या आणि मुख्यमंत्री निवडीच्या या सगळ्या घडामोडींची तुलना थेट लहान मुलांच्या डायपरशीही करण्यात आली.
तर कुणीतरी बॉलिवुडच्या गाण्याचा आधार घेत सध्याच्या या राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य केलंय -
तुमच्याकडे याव्यतिरिक्त काही भारी मीम्स आलेत का? कमेंट्समध्ये नक्की टाका.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)