You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंची पहिली सभा पावसामुळं रद्द, प्रचाराचा मुहूर्त कधी?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडणार होते. मात्र राज यांना त्यांची ही सभा पावसामुळे रद्द करावी लागली आहे.
पुण्यातील सरस्वती विद्या मंदिराच्या आवारात राज यांची प्रचारसभा होणार होती. मात्र गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं मैदानात पाणी साचलं होतं.
बुधवारी (9 ऑक्टोबर) पाऊस उघडला होता. सकाळपासून मनसेचे कार्यकर्ते सभेच्या तयारीला लागले होते. मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्यानं राज ठाकरेंच्या सभेवर पाणी पडलं.
"राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील सभेचं नियोजन करण्यात येईल. राज यांची पुढची सभा कोथरुड किंवा हडपसरमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न असेल," असं स्थानिक मनसे नेत्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ईडीनं केलेल्या चौकशीनंतर आपल्या पहिल्या प्रचारसभेत राज ठाकरे नेमकं बोलणार काय याकडे सर्वांचच लक्ष होतं.
2019 ची लोकसभा निवडणूक न लढवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ही घोषणा राज ठाकरेंनी केल्यानंतर पहिल्या प्रचारसभेसाठी 5 ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रचारसभेची तारीख पुढे ढकलण्यात आली.
भाजप आणि शिवसेना यांच्या विधानसभेसाठीच्या प्रचारयात्रा सुरू झाल्या, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही आपापल्या जागावाटपाची चर्चा करत होते. मात्र या सर्व गडबडीत मनसेच्या तंबूत शांतता असल्याने राज ठाकरे हे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक लढवणार नाही का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. मात्र राज यांनी मनसे निवडणूक लढविणार असल्याचं निश्चित केलं.
मनसेनं आपल्या 104 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनसेनं 1 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 27 नावं होती. गांधी जयंतीला मनसेनं आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत 45 नावांचा समावेश होता, तर तिसऱ्या यादीत 32 नावं जाहीर करण्यात आली.
EVM च्या निमित्तानं नवीन सुरूवात
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज ठाकरे नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करताना दिसले. सर्वप्रथम राज ठाकरे दिल्ली दरबारी दाखल झाले. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीची सुद्धा भेट घेतली. EVM ला विरोधासाठी एकत्र येण्याबाबत ही भेट घेतल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
पुढे राज ठाकरे ममता बॅनर्जी यांनाही भेटले. त्यानंतर महाराष्ट्रात EVM विरोधी आंदोलनाला गती देण्याचाही प्रयत्न राज ठाकरेंनी केला.
मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाचे ढग दाटून आले. त्यांना EDची नोटीसही आली आणि 22 ऑगस्टला कोहीनूर मिलप्रकरणी EDने त्यांची जवळपास नऊ तास चौकशी केली.
भारतीय जनता पक्ष ED चा राजकीय हत्यार म्हणून वापर करून घेत आहे, ED च्या चौकशीमुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
निवडणूक लढवणं राज ठाकरेंची अपरिहार्यता
राज ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचं विश्लेषण करताना दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी म्हटलं, "राज ठाकरेंनी जर ही निवडणूक लढवली नसती, तर ते आत्महत्येचं पाऊल ठरलं असतं. कारण पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी 13 आमदार दिले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा एकच आमदार निवडून आला होता. पण चढउतार प्रत्येक पक्षात येतातच. पण पक्षाचा जिवंतपणा टिकवण्यासाठी निवडणूक लढवणं, ही एक अपरिहार्य बाब आहे. कारण आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेत निवडणुकीला सर्वात जास्त महत्त्व असतं. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे."
"आता जरी त्यांच्यावर आरोप, ईडीची चौकशी असे विषय असले तरी राज ठाकरेंविषयीचं तरुणांच्या मनातलं आकर्षण कमी झालेलं नाही. नाशिक, पुणे, औरंगाबादचा शहरी भाग यामध्ये तरुणांच्या मनात राज ठाकरेंविषयी आकर्षण आहे. आज ना उद्या हा माणूस आपल्याला चांगलं नेतृत्त्वं देईल, असं तरुणांच्या मनात आहे. त्या भावनेचं भांडवलं करून बऱ्याच ठिकाणी तरुणांची मतं अनेक ठिकाणी निर्णायक ठरू शकतात. कारण विधानसभेची आघाडी चार हजार - तीन हजार इतकी कमी असते. बऱ्याचदा छोट्या फरकाने विजय होतो. ज्याठिकाणी मनसेचा प्रभाव आहे किंवा निर्माण होईल त्याठिकाणी मनसेची मतं महत्त्वाची - निर्णायक ठरू शकतात. पण राजकीय अस्तित्त्व टिकण्यासाठी त्यांनी ही निवडणूक लढवणं, हा अपरिहार्य भाग आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)