You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : नगरच्या जागेचा पेच...डॉ. सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी, मुंबई
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली असली तरी काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे.
नगर दक्षिणची जागा त्यांपैकीच एक. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी दावा सांगितला असून या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते थेट भाजपच्या वाटेवर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनं नगर दक्षिणची जागा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडावी अशी विनंती काँग्रेसकडून करण्यात आलीये. पण राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नाही. दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्यानं हा प्रश्न थेट राहुल गांधी सोडवणार असल्याची चर्चा आहे.
जर हा प्रश्न दिल्लीत सुटला नाही तर डॉ. सुजय विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'राजकारणात मी स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो. जर वेळ आली तर मी तो घेईन,' असं डॉ. सुजय विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यामुळेच सुजय विखे-पाटलांच्या भाजप प्रवेशाचे अंदाज लावले जात आहेत.
'सुजय यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी'
"नगरची जागा काँग्रेससाठी सोडावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादीला केली आहे. त्यासंबंधी चर्चाही सुरू आहेत. त्यामुळे सुजय-विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल आतापासूनच चर्चा करण्यात काही अर्थ नाही," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बीबीसी मराठीला दिली.
"सुजय विखे-पाटील यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. राजकारणात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात," असंही तांबे यांनी म्हटलं. विखे-पाटील कुटुंबीयांचे काँग्रेसशी असलेले संबंध पाहता सुजय भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, अशी आशाही सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली आहे. नगरच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचा एकही सदस्य गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसंच उरलेल्या चारही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला क्रमांक दोनची मतं आहेत. दुसरीकडे शिर्डीचा मतदासंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने मागण्याला काही अर्थच नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल," असं पवार यांनी म्हटलं आहे.
सुजय यांच्यामुळे नगरची जागा चर्चेत
"सुजय विखे पाटील गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात काम करत आहेत. पण नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. सुजय विखे-पाटील आता 37 वर्षांचे आहेत. आपली राजकीय कारकीर्द लवकर स्थिर व्हावी असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. मात्र गोष्टी इतक्या सोप्याही नाहीत," असं मत स्थानिक पत्रकार अशोक तुपे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते आहेत. काँग्रेसचे नेते आहेत. त्यांची अधिकृत भूमिका अजूनही कळलेली नाही. मात्र निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच नगरची जागा चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यात विखे कुटुंबाला यश मिळालं आहे. हा दबावतंत्राचाही भाग असू शकतो. कारण पवार आणि विखे-पाटील कुटुंबातील वाद सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी विखे-पाटील हे दबावतंत्र वापरत असतील," असंही तुपे यांनी म्हटलं.
"सुजय विखे-पाटील यांनी भाजपमधून निवडणूक लढवली तर ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी होईल. राष्ट्रवादीने जर सुजय विखे-पाटील यांना जागा सोडली तर ही निवडणूक 'काँटे की टक्कर' असेल," असं मत ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
कोण आहेत सुजय विखे-पाटील?
डॉ. सुजय विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे पुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे पेशाने न्यूरोसर्जन आहेत.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तसंच विखे-पाटील फाऊंडेशनचे ते प्रमुख आहेत.
२०१३ पासून डॉ. सुजय विखे-पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक कॉंग्रेस अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.
बाळासाहेब विखे पाटील यांच्या जनसेवा फाऊंडेशनमार्फत त्यांनी मतदारसंघात 'लेक वाचवा' अभियान तसंच जलक्रांती अभियान राबवलं. त्याचबरोबर अपघात विमा योजना सुरू केली. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील समीकरणं
२००४ ला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख हे नगर दक्षिणमधून लोकसभा निवडून आले. त्यानंतर २००९ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे सर्वांचंच लक्ष नगर दक्षिणच्या जागेकडे असतं. ही जागा राष्ट्रवादीतल्या गोटातली असली तरी २००९ पासून वारंवार या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे.
२००४ ला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख इथून निवडून आले. २००९ ला राष्ट्रवादीकडून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी निवडून आले.
२०१४ ला राष्ट्रवादीकडून राजीव राजळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांना पराभूत करत पुन्हा भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले होते.
अहमदनगर मतदारसंघावर राष्ट्रवादीची चांगली पकड होती. पण मागच्या १० वर्षात स्थानिक तडजोडींमुळे ती कमकुवत झाल्याचं ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.
२००९ नंतर नगरच्या दोन्ही मतदारसंघात शिवसेना-भाजपने वर्चस्व मिळवलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)