You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandan: IAF विंग कमांडर अभिनंदन वर्तमानच्या वडिलांचा भावनिक संदेश, सोशल मीडियावरही प्रार्थनांचा पूर
27 फेब्रुवारच्या सकाळी झालेल्या हवाई धुमश्चक्रीत एक भारतीय विमान पाकिस्तानात पाडण्यात आलं. भारताचा एक वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं पाकिस्तानने सांगितलं आहे, तर आपला एक पायलट बेपत्ता असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट केलं.
अभिनंदन वर्तमान असं या पायलटचं नाव असून त्यांचा एक व्हीडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या लष्करानं हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात अभिनंदन चहाचा कप हातात घेऊन पाकिस्तानी अधिकाऱ्याशी बोलत आहेत.
"पाकिस्तानच्या लष्कराने माझी योग्य काळजी घेतली आहे. हे मला अधिकृतपणे सांगावसं वाटतं की पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचं वर्तन अतिशय चांगलं आहे. माझ्या तुकडीनेही प्रतिस्पर्धी सैनिकांप्रति असंच वर्तन केलं असतं," असं बेपत्ता भारतीय वैमानिक अभिनंदन यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत अभिनंदन यांनी आपल्या स्थितीबद्दल वर्णन केलं आहे. मात्र बीबीसी या व्हीडिओच्या सत्यतेबद्दल परीक्षण करू शकत नाही.
"तुम्ही भारतात तुम्ही कुठे राहता? तुमचं मूळ गाव कोणतं" या प्रश्नांना अभिनंदन यांनी "मी या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित नाही," असं सांगितलं. "मी दक्षिण भारतात राहतो."
"तुमचं लग्न झालं आहे का?" या प्रश्नाला अभिनंदन यांनी होकारार्थी उत्तर दिलं. "तुम्हाला चहा आवडला का?" या प्रश्नाला अभिनंदन यांनी "चहा उत्तम झाला आहे," असं सांगितलं.
"तुम्ही कोणतं विमान चालवत होतात?" या प्रश्नाला "मी हे तुम्हाला सांगणं अपेक्षित नाही" असं अभिनंदन यांनी स्पष्ट केलं. "पण तुमच्याकडे तिथे विमानाचे अवशेष आहेत. तुम्ही ते पाहू शकता," असंही त्यांनी पुढे सांगितलं.
कोणत्या मिशनवर ते कार्यरत आहेत, याचंही अभिनंदन यांनी उत्तर दिलं नाही.
कोण आहेत अभिनंदन?
अभिनंदन वर्तमान हे विंग कमांडर पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 19 जून 2004 मध्ये भारतीय वायुसेनेत प्रवेश केला. अभिनंदन MiG21 बिसॉन विमानाचं सारथ्य करत होते.
अभिनंदन यांचे वडील S. वर्तमान हेही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते एअर मार्शलपदी कार्यरत होते.
काही वर्षांपूर्वी भारतातील एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अभिनंदन यांनी देशासाठी काम करण्यामागची भावना व्यक्त केली होती.
अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना होत आहेत. ते सुखरूप मायदेशी परतावेत, यासाठी ठिकठिकाणी दुवा केल्या जात आहेत, सोशल मीडियावरही लोकांनी पोस्टद्वारे आपल्या प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिनंदन यांच्या विडिलांनी एका पत्रात, अभिनंदन यांच्या व्हीडिओवर आणि लोकांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल भावनिक संदेश दिला आहे.
"सर्वांनी व्यक्त केलेली काळजी आणि सदिच्छांबद्दल आभार. मी देवाचेही आभार मानतो, की अभी सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, मानसिकदृष्ट्याही तो ठीक आहे. त्याला धाडसानं बोलताना पाहिलं. तो एक सच्चा शिपाई आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतीलच," असं एअर मार्शल (निवृत्त) वर्तमान पुढे लिहितात.
"त्याचा छळ होऊ नये. तो हाती-पायी सुरक्षितपणे घरी परतावा, अशी प्रार्थना मी करतो. या कठीण काळात आमच्यासोबत ठामपणे उभं राहण्यासाठी आभार. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला बळ मिळत आहे," असं एअर मार्शल वर्तमान (नि.) यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे.
जिनिव्हा कराराअंतर्गत युद्धकैदींना धमकावलं-घाबरवलं जाऊ शकत नाही तसंच त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धकैदींच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची वातावरण निर्मिती आणि उत्सुकता निर्माण केली जाऊ शकत नाही.
अभिनंदन यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर पोस्ट
दरम्यान, अभिनंदन यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यावे, यासाठी सोशल मीडियावरही लोकांकडून सरकारला आवाहन केलं जात आहे. राजकीय नेत्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण अभिनंदन लवकर परत यावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. ट्विटरवर #BringBackAbhinandan आणि #AbhinandanMyHero हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
"आपल्या वायुदलाच्या बेपत्ता वैमानिकाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. तो लवकरच सुखरूप परत येईल, अशी मला आशा आहे. या कठीण काळात आम्ही भारतीय वायुदलासोबत आहोत," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपण अभिनंदन यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.
"भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो. या शूर पुत्राचा सर्व देशाला अभिमान आहे. ते सुखरूप परत येतील असा आम्हाला विश्वास आहे," असं केजरीवालांनी लिहिलं आहे.
जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी अभिनंदन यांनी लवकर आणि सुखरूप घरी परतावं, यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही अभिनंदन यांना परत आणा, असं ट्वीट केलंय.
सध्याच्या घडीला वायुदलाचे पायलट सुखरूप परत येणं महत्त्वाचं आहे. त्यांना पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्याच्या दिशेनंच आता प्रयत्न होणं आवश्यक आहे, असं अक्षय मराठे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टींकडे पुन्हा वळतो. मात्र काही सैनिक हे आपल्या कुटुंबीयांकडे कधीच परतून येत नाहीत. अभिनंदन हे आपल्या घरी, कुटुंबाकडे सुखरूप परत येतील अशी आशा करू," असं ट्वीट रवींद्र रंधावा यांनी केलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)