You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेसबुक, गुगल, ट्विटर यांना 2019च्या सार्वत्रिक निवडणुका आव्हान का वाटतात #BeyondFakeNews
फेक न्यूजच्या मुद्यावर बीबीसीच्या भारतातील 7 शहरांत #BeyondFakeNews या उपक्रमांतर्गत परिषद घेण्यात आली. दिल्लीत झालेल्या परिषदेत फेसबुक, गुगल आणि ट्वीटर या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भारतात फेक न्यूज ही गंभीर समस्या असल्याचं मान्य केलं. तसेच या समस्येचा सामना कसं करायचं यावर काम सुरू असल्याचंही या कंपन्यांनी सांगितलं.
आयआयटी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात फेसबुकच्या वतीने मनीष खंडुरी, गुगलच्या वतीने ईरीन जे. डब्लू आणि ट्विटरच्या वतीने विजया गड्डे सहभागी झाले होते.
तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपन्यांनी फेक न्यूज रोखण्यासमोरील असलेल्या आव्हानांवर चर्चा केली.
खंडुरी फेसबुकमध्ये फेक न्यूजच्या अनुषंगाने काम पाहतात. ते म्हणाले, "आमच्या प्लॅटफॉर्मच्या अस्तित्वासाठीचा हा मोठा धोका आहे. आम्ही हा विषय अत्यंत गंभीरपणे घेत आहोत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून संवादाच्या गुणवत्ता आमच्यासाठी केंद्रस्थानी आहे. यावर चुकीच्या माहितीचा प्रभाव पडत आहे. आम्ही एक सोशल मीडिया आहोत, आणि आम्हाला समाजात सकारात्मक हस्तक्षेप करायचा आहे. फेक न्यूजच काम अगदी याच्या विरोधात चालतं."
गुगलच्या दक्षिण आशियातील न्यूज लॅबचे प्रमुख इरीन म्हणाले, "ही एक मोठी समस्या असल्याचं गुगलनं स्वीकारलं आहे. यावर उपाय शोधणं हे आम्ही आमची जबाबदारी मानतो. जेव्हा लोक गुगलवर येतात तेव्हा ते उत्तर शोधत असतात. तंत्रज्ञान, पत्रकार आणि इतरांच्या मदतीने आम्ही दर्जेदार कंटेंट देऊ शकतो."
ट्विटरच्या ट्रस्ट सेफ्टी विभागाच्या ग्लोबल हेड विजया गाड्डे, "ट्विटरचा उद्देश लोकसंवाद वाढवा हाच आहे. जेव्हा लोक ट्विटरवर येतात तेव्हा त्यांना काय सुरू आहे हे जाणून घ्यायचं असतं किंवा त्यांना याबद्दल जगाला सांगायचं असतं. जर दर्जेदार कंटेंट देता आला नाही तर लोक आमचं व्यासपीठ वापरायचं बंद करतील."
सोशल मीडियाची जबाबदारी
अमेरिकेतील निवडणुकीत झालेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावर मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेच्या कायदे मंडळासमोर हजर व्हावं लागलं होतं. पण भारतात जेव्हा भारतात लिचिंगच्या घटना घडल्या तेव्हा मात्र त्यांनी सार्वजनिकपणे काहीही खुलासा का केला नाही, असा प्रश्न खंडुरी यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "भारतात जे घडत आहे, त्याबद्दल झुकरबर्ग यांना रस आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मोठी टीम बनवण्यात आली आहे. भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने वॉशिंग्टनमध्ये वॉररूम बनवली आहे."
व्हॉट्सअपवर जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यावर खंडुरी म्हणाले, "आम्हीही सध्या शिकत आहोत. या प्लॅटफॉर्मवर चांगल्या बाबीसुद्धा आहेत. यावर बरीच माहिती शेअर केली जाते. आम्ही भारतात बरंच काही बदलत आहोत. या समस्येला आम्ही गांभीरपणे घेतलं आहे. त्यावर उपाय करण्यासाठी काही बदल केले जात आहेत."
निवडणुकीच्या काळात पसरत असलेल्या फेक न्यूजबद्दल ते म्हणाले, "माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या लोकांची मदत घेत आहोत. फेसबुकवर सध्या असलेल्या माहितीच्या 'स्वच्छते'साठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यावर मोठा खर्च होत आहे. याबद्दल आम्ही धोरणकर्त्यांशीही आम्ही बोलत आहोत. यासाठी आम्ही प्रशिक्षण ही देत आहोत."
तर युट्यूबवर उपलब्ध खोट्या माहितीबद्दल ईरीन म्हणाले, "बरेच लोक बातम्यांसाठी यूट्यूबवर येतात, हे आमच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे यूट्यूबवर आम्ही आवश्यक ते बदल करत आहोत. जेव्हा लोक न्यूज शोधण्यासाठी यूट्यूबर येतील तेव्हा त्यांना विश्वासार्ह माहिती मिळाली पाहिजे."
ते म्हणाले, "जेव्हा आम्ही लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवू तेव्हा ते आमच्या व्यवसायासाठीही फायद्याचं आहे."
विजया गाड्डे म्हणाल्या, "फेक अकाऊंट ओळखता यावं यासाठी आम्ही आमचं तंत्रज्ञान सुधारत आहोत. फेक अकाऊंट आमच्या धोरणांच्या विरोधात आहे. कंटेटबद्दल तक्रार करण्याची सुविधाही आम्ही दिली आहे."
लोकसभा निवडणुकीची तयारी
लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल खंडुरी म्हणाले, "बाहेरील लोकांची मदत, सध्याचा कंटेंट 'स्वच्छ' करणं यासाठी बराच खर्च सुरू आहे. धोरणकर्त्यांशी आम्ही बोलत आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही बोलत आहोत."
ईरीन म्हणाले, "फेक न्यूजशी लढण्यासाठी आम्ही एक बळकट इकोसिस्टम बनवत आहोत. भारतातील 7 भाषांतील 8 हजार पत्रकारांनी प्रशिक्षण देत आहोत."
गाड्डे म्हणाल्या, "अमेरिकेतील निवडणुकांतून आम्ही बरंच शिकलो आहोत राजकीय जाहिरातींमध्ये आम्ही बरीच पारदर्शकता आणली आहे. फेक अकाऊंटबद्दल आम्ही अधिक दक्ष आहोत."
राजकीय पक्षांच्या प्रचारबद्दल बोलताना खंडुरी म्हणाले, "राजकीय पक्षांशी आमचे संबंध दुहेरी आहेत. फेसबुक प्रभावी माध्यम बनल्याचं आम्हाला माहिती आहे."
फेक न्यूजच्या समस्येवर उपाययोजनेसाठी किती दिवस लागतील या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही ही समस्या समजून घेत आहोत. एका दिवसात यावर उपाय नाही सापडणार. बहुतेक सहा महिन्यांतही नाही सापडणार. महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही उपाययोजनांवर काम करत आहोत."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)