You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानला निष्पाप लोकांचं रक्त दिसत नाही : सुषमा स्वराज
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे सुरू असलेल्या 73व्या महासभेला संबोधित करताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी इंडोनेशियातील भीषण भूकंपात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
काय म्हणाल्या सुषमा?
- भारत अनेक वर्षं दहशतवादाचे चटके सोसतो आहे. शेजारी देशाकडूनच आम्हाला दहशतवादाचा फटका बसतो आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी मिळते. तसं करून वागत नसल्याची बतावणी केली जाते.
- ओसामा बिन लादेन त्यांच्याच देशात लपला होता. 9/11चा मास्टरमाइंड मारला गेला, पण 26/11 अर्थात मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतो आहे, निवडणुका लढवतो आहे. भारताविरुद्ध गरळ ओकतो आहे.
-भारताने पाकिस्तानाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मी स्वत: इस्लामाबादला जाऊन चर्चेची फेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी आमच्या पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यात आला.
-गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या याच सभेत पाकिस्तानने प्रत्युत्ताराचा अधिकार वापरत काश्मीरमध्ये भारत कसा मानवी हक्कांचं उल्लंघन करत आहे, असं दाखवणारे फोटो समोर आणले होते. नंतर कळालं की ते फोटो दुसऱ्याच कोणत्या देशाचे होते. आमच्या कुठल्याही आरोपांना पाकिस्तान असंच खोटे पुरावे दाखवून खोडून पाडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.
-मानवी हक्कांचं उल्लंघन करणारे तर दहशतवादीच असतात, दुसरे कुणी नाही. हे लोक युद्ध भडकावण्यासाठी निष्पाप लोकांचे जीव घेतात. आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे मानवी हक्कांचे संरक्षक असूच शकत नाहीत. पाकिस्तान अशाच हत्यारांचं संरक्षण करतो, त्यांना निष्पाप लोकांचं रक्त दिसत नाही.
-भारतात आयुष्मान भारत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 50 कोटी नागरिकांना आजारपणाच्या काळात 5 लाखांपर्यंत मदत केली जाईल. याच्या बरोबरीने प्रधानमंत्री आवास योजनाही सुरू करण्यात आली आहे. 14 कोटी 9 लाख लोकांना घरासाठी सबसिडी देण्यात आली आहे.
-संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे. देशात वित्त समावेशकता अंतर्गत जनधन योजना अमलात आणण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींच्या खात्यात थेट मदत देण्यात येते.
-हवा, पाणी प्रदूषण आणि कट्टरवाद जगासमोरचं मोठं आव्हान आहे. विकसनशील आणि अविकसित देशांना याचा सर्वाधिक फटका बसतो. विकसित देशांनी पुढाकार घेऊन अन्य देशांना मदत करायला हवी. पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही जागरुक आहोत. 2022 पर्यंत भारत स्वास्थपूर्ण आणि स्वच्छ देश असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)