You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवाझ शरीफ : तीन वेळच्या पंतप्रधानांचा तुरुंगापर्यंतचा प्रवास
तीन वेळा पंतप्रधान म्हणून पद सांभाळलं, त्यानंतर विरोधात अनेक खटले दाखल झाले आणि आता निवडणूक लढण्यास अपात्र ठरवलं गेलं... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या आयुष्यात असे अनेक चढ-उतार आले.
25 डिसेंबर 1949 साली पाकिस्तानमधल्या एका समृद्ध घराण्यात मोहम्मद नवाझ शरीफ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्यापारी होते.
सत्तरच्या दशकात नवाझ शरीफ सत्तेच्या मैदानात आले. जनरल झिया यांच्या काळात त्यांचा अर्थमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश झाला.
1985 साली पंजाब प्रांताचे ते मुख्यमंत्री झाले. 1988 मध्ये झालेल्या निवडणुकीत इस्लामी जम्हूरी इत्तेहाद (IJI) नावाच्या पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली. इस्लामाबादमध्ये ते जास्त हस्तक्षेप नाही करू शकले पण आपला पंजाबचा बालेकिल्ला कायम ठेवत ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचं सरकार कोसळल्यावर 1990 च्या निवडणुकांत IJI ची धुरा त्यांच्या हातात आली. याच निवडणुकांत त्यांच्या पक्षाने विजय मिळवला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले.
पण फक्त तीन वर्षांत तत्कालीन राष्ट्रपती गुलाम इस्हाक खान यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांचं सरकार बरखास्त झालं.
या निर्णयाला शरीफ यांनी सुप्रीम कोर्टात आवाहन दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुन्हा अस्तित्वात आलं. मात्र हेही फार काळ टिकलं नाही. राष्ट्रपतींशी त्यांचे मतभेद कायम होते आणि शेवटी त्यांना सत्तेवर पाणी सोडावं लागलं.
सत्तापालट
1993च्या निवडणुकात पीपीपी (PPP) च्या बेनझीर भुट्टोंनी पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतली. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फारुक लेगारी यांनी त्यांचं सरकार बरखास्त केलं. 1997 मध्ये झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्या आणि प्रत्युत्तरादाखल नवाझ शरीफ सरकारने बलुचिस्तानच्या चगाई मध्ये अणुस्फोट केले. त्याचदरम्यान 1999 मध्ये भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लाहोरमध्ये भेट घेतली आणि दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला.
मात्र यावेळीही नवाझ शरीफ आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी यांनी उठाव करून सत्ता हातात घेतली आणि स्वत: सत्तेवर नियंत्रण मिळवलं.
मुशर्रफ यांनी सत्तेवर येताच शरीफ यांच्यावर अनेक खटले दाखल केले त्यामुळे शरीफ यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यादरम्यान त्यांची पत्नी कुलसूम नवाझ आणि कन्या मरियम या लष्करी सत्तेविरुद्ध उठाव सुरूच ठेवला.
परवेज मुशर्रफ यांच्याबरोबर डील झाल्यावर त्यांची शिक्षा तर माफ झाली पण त्यांना पाकिस्तान सोडून सौदी अरेबियामध्ये आसरा घ्यावा लागला. मात्र 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच पक्षाने चांगली कामगिरी केली नाही.
पाकिस्तानमध्ये पुनरागमन
2006 मध्ये नवाझ शरीफांची भेट त्यांच्या विरोधक बेनझीर भूट्टो यांच्याशी लंडनमध्ये झाली. त्या दोघांनीही परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याची आणि पुन्हा लोकशाही बहाल करण्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला.
सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर नवाझ शरीफ यांनी 2007 मध्ये परत येण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारने त्यांना एअरपोर्टवरूनच सौदी अरेबियालाच पाठवलं. दोनच महिन्यात ते परत आले आणि लाहोर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत झालं.
त्यांनी इतर पक्षांबरोबर विचारविनिमय केला आणि 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची वातावरणनिर्मिती केली. डिसेंबर 2007 मध्ये जेव्हा बेनझीर भूट्टो यांची हत्या झाली तेव्हा सगळ्यात आधी रुग्णालयात जाणारे नवाझ शरीफ होते.
तिसऱ्यांदा सत्तेत
फेब्रुवारी 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता आणि त्यांनी पीपीपी या पक्षाबरोबर युती करून आघाडीचं सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला. पण हेही सरकार फार काळ टिकलं नाही आणि शरीफ यांचा पक्ष सरकारमधून बाहेर पडला.
दोन वर्षांनी मे 2013 मध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या. त्यांच्या पक्षाने विजय मिळवला आणि नवाझ शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी त्यांचा सामना क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी होता.
इम्रान खान यांनी नवाझ शरीफ यांच्यावर निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचाराचा आरोप लावला. 2014 मध्ये राजधानी इस्लामाबाद मध्ये त्यांनी अनेक महिने निदर्शनं केली.
त्याचदरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेतला आणि 2015 मध्ये नरेंद्र मोदीचं लाहोरमध्ये स्वागत केलं. त्याशिवाय चीनबरोबर त्यांनी चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) ची सुरुवात केली.
पतनाची सुरुवात
2016 मध्ये त्यांचं राजकीय पतनाला सुरुवात झाली. पनामा पेपर्स मध्ये त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं नाव समोर आले.
याच परिस्थितीचा फायदा घेत इम्रान खान यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात निदर्शनं करायला सुरुवात केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर सुप्रीम कोर्टाने 2016मध्ये नवाझ शरीफ यांच्यावर लागलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश दिला.
अपात्र ठरवलं
त्याचदरम्यान त्यांचे मतभेद समोर आले. एप्रिल 2017 मध्ये चौकशी समितीने नवाझ शरीफ यांच्याबाजूने निर्णय दिला आणि त्यांच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश दिले.
त्यांच्याविरुद्ध एका दुसऱ्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू झाली आणि 2017 मध्ये त्यांना आरोपी ठरवण्यात आलं त्यांच्यावर आरोप होता की UAE मध्ये नोकरी करण्याची बाब त्यांनी निवडणूक आयोगापासून शपथपत्रात लपवली होती.
त्यांनी दोषी ठरवत संसदेतून अपात्र ठरवलं आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. भ्रष्टाचारच्या अन्य तीन प्रकरणांत त्यांची चौकशी होईल असंही या निर्णयात नमूद करण्यात आलं होतं.
सप्टेंबर 2017 मध्ये पाकिस्तानच्या विशेष भ्रष्टाचारमुक्त न्यायालयाने कारवाई सुरू केली. दहा महिन्यांपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीला कँसर झाल्यामुळे त्यांना लंडनला जावं लागलं.
याचदरम्यान शरीफ यांनी देशभरात रॅली काढत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी कट ठरवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी जुलै महिन्यात त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला.
त्यांना दहा वर्षांची शिक्षा आणि 80 लाख पौंडाची शिक्षा झाली. शिक्षेची सुनावणी झाली तेव्हा लंडनला आपल्या अपार्टमेंटमध्ये होते. याच मालमत्तेमुळे अवैध संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर लागला होता.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)