केरळ पूर : 'आमच्या यशात केरळचं मोलाचं योगदान' म्हणत UAE आलं मदतीला धावून

केरळमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या हानीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यासाठी 500 कोटींचं मदत पॅकेज जाहीर केलं.

गेल्या शंभर वर्षांतली ही भीषण पूरस्थिती असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटलं आहे. पुराच्या थैमानामुळे गेल्या दहा दिवसांत केरळमध्ये 194 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी शक्य असेल त्या मदतीचं आवाहन केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनेही मदतीचा हात पुढे केला आहे.

"UAEच्या यशात केरळच्या लोकांचं मोलाचं योगदान आहे. आमची ही जबाबदारी आहे की या कठीण समयी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आम्ही एका मदतकार्य समितीची स्थापना केली आहे आणि आम्हीसुद्धा विनंती करतो की सर्वांनी यासाठी भरभरून योगदान द्यावं," असं UAEचे अध्यक्ष मोहंमद बिन राशिद अल मक्तूम यांनी ट्विटरवर सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचे आभार मानले. "शेख यांचे खूप खूप आभार. त्यांची ही विशेष कृती दोन्ही देशांमधल्या घनिष्ठ संबंधांची प्रचिती देते."

दरम्यान, शुक्रवारी रात्रीच पंतप्रधान मोदी केरळला पोहोचले. शनिवारी सकाळी त्यांनी केरळचे राज्यपाल सथाशिवम, मुख्यमंत्री पिनरायी विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांच्यासह पूर परिस्थतीची हवाई पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी "केरळच्या पूरग्रस्त लोकांना त्यांच्या धाडसासाठी आणि जिद्दीसाठी सलाम" केला. "मी बचावकार्यात झटणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि स्वयंसेवकांचंही कौतुक करतो. तसंच देशभरातून मदतीसाठी धावून येणाऱ्या लोकांचेही खूप खूप आभार."

पुरात अडकलेल्यांना वाचवणं आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.

आर्थिक मदतीची घोषणा

ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, केरळला 500 कोटींची मदत मिळणार असून धान्य, औषधं अशा गरजेच्या वस्तू देखील केंद्राकडून पुरवल्या जाणार आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 100 कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्याशिवाय ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ही सगळी रक्कम 'पंतप्रधानांच्या नॅशनल रिलीफ फंडा'तून देण्यात येणार आहे.

तसंच, फसल बिमा योजनेअंतर्गत बाधित शेतकऱ्यांना पैसेही मिळणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी 'नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया'ला(NHAI) राज्यातले महत्त्वाचे मार्ग तत्काळ दुरुस्त करून पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यांची कच्ची घरं या पुरात वाहून गेली असतील त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी ट्वीट करून दिली.

नौदलाच्या दक्षिण विभागातल्या कार्यालयात या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी एक उच्चस्तरीय आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीनंतर हे निर्णय घेण्यात आले.

"गेल्या शंभर वर्षातला हा सगळ्यांत भयंकर पूर आहे. पाण्याचं प्रमाण वाढल्याने 80 धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते. बेघर झालेल्या लोकांसाठी 1,500 हून अधिक आश्रयस्थळं उभारण्यात आली आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी ट्वीटद्वारे दिली.

दोन लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भूस्खलनामुळे मातीखाली दबून अनेकांचा मृत्यू झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे.

भारतीय लष्करानं उभारले पूल

भारतीय लष्करानं मदतकार्य करण्यात आघाडी घेतली आहे. लष्करानं 38 ग्रामीण भागांना जोडण्यासाठी 13 तात्पुरते पूल उभारले आहेत. लष्करानं आतापर्यंत 3627 नागरिकांना पुरातून वाचवलं आहे. यात 22 जण विदेशी नागरिक आहेत.

दरम्यान, भूस्खलनामुळे केरळमधल्या इडुकी शहरांतून कुमिली शहराकडे जाणार मार्ग पूर्णतः ठप्प झाला आहे. हा रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, सततच्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.

केरळमधल्या आलप्पुझा या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळून वाहणारी अचनाकोविल नदी दुथडी भरून वाहत आहे. या भागात सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे नदीला पूर अजूनही कायम आहे.

कोल्लाकडावू गावातले शेतकरी शौकत सांगतात की, "इथला संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. माझ्याकडे जे काही होतं ते सर्वकाही पाण्यात वाहून गेलं आहे. प्रत्येक तासागणिक इथली पाण्याची पातळी वाढत चालली आहे."

बचावकार्यास वेग

NDRF आणि लष्कर यांनी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)