You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'तुमचा सरकारवर विश्वास आहे का?' पाहा काय म्हणतात बीबीसीचे वाचक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
'विरोधकांनी केंद्र सरकारवर अविश्वास दाखवला आहे तर वाचकांचा सरकारवर विश्वास आहे का?' असा प्रश्न आजच्या 'होऊ द्या चर्चा' सदरात आम्ही वाचकांना विचारला होता.
त्यावर आलेल्या या काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया -
अनिकेत कदम सविस्तर मुद्द्यात मत व्यक्त करत 'आपला केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे', असं लिहितात.
1) या पूर्वीच्या सरकारने जे कित्येक वर्षं केलं ते आता बदललं जातंय, हा त्यांचा पोटशूळ आहे.
2) एवढी वर्षं एकाच पक्षाने अक्षरशः राज्य केलं. आता दुसऱ्या कुणाला तरी करू दया, कारण कितीही जाहिरातबाजी झाली तरी एका मताने प्रॅक्टिकली खरंच फरक नाही पडत.
3) आपण भारतीय नागरिक म्हणून 45 वर्षांत जे बदलू शकलं नाही ते 5 वर्षांत बदलेल अशी अपेक्षा ठेवतोय.
तर दुसऱ्या बाजुला, सरकारवर आपला अजिबात विश्वास नाही असं तुषार लिहितात, "100 दिवस विश्वास ठेवला 15 लाख येणार होते, 'अच्छे दिन' येणार होते. 'अच्छे दिन' सोडा, 15 लाख पण नाही आले. मग विश्वास उडून गेला सरकारवरचा."
मुळात सर्व पक्ष एका माळेचे मणी आहेत, अशी टीका हर्षल जाधव करतात. "कोणत्याही पक्षाला जनतेची काहीच पडली नाही आहे. आपल्याला खिसे भरायला मिळतायत ना, जनता मेली तरी चालेल आपण मजेत राहायचं. कधी कधी सभेत, पत्रकार परिषदेत चार अश्रू ढाळायचे. मग जनता त्या रडण्याला भुलून पुढच्या निवडणुकीत त्यांना मतदान करणार. वर्षानुवर्षं हे चक्र असचं सुरू आहे"
सरकारवर विश्वास ठेवण्याचं कारणच नाही, असं दादाराव तायडे यांना वाटतं. "EVM, पैसा, ताकदीचा वापर करून सत्ता काबीज केली, त्या सरकारबाबत विश्वासाचा मुद्दा येतोच कुठे? गरिबाला गाजर दाखवण्याचा सरकारचा एक कलमी कार्यक्रम आहे."
उपसाहात्मक बोलत राहुल लिहितात की, "हे सरकार सामान्य लोकांशी काम करणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे."
मिलिंद म्हात्रे लिहितात, "आमचा आता कोणत्याच पक्षावर विश्वास राहिलेला नाही. फक्त आता निवडणुकूत राष्ट्रपती राजवट हा पर्याय उपलब्ध असावा."
"उद्योगांसाठी या सरकारपासून प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे आपला विश्वास आहे," असं सचिन जगताप लिहितात.
"काँग्रेसवरही नाही आणि भाजपवरही नाही, फक्त मनसेवर आपला विश्वास आहे," असं विशाल कोल्हे लिहितात. पण त्यांना प्रत्युत्तर देत पुण्यशील गेडाम लिहितात, "मनसे पक्ष हा केवळ नाशिक, मुंबई आणि पुण्यापर्यंतच ताकद आहे. त्यांनी केंद्रापेक्षा राज्याकडे लक्षं द्यावे." नरेंद्र मंत्रीही असंच उत्तर देतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)